
मुंबई – भविष्यातील प्रकल्पांसाठी, तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ मार्च या दिवशी विधान परिषदेत सांगितले.
कोकण रेल्वे महामंडळाविषयी विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या ४ राज्यांच्या सहकार्याने झाली होती; मात्र आर्थिक विवंचना आणि निधीअभावी महामंडळाला भविष्यातील प्रकल्प राबवण्यात अडचणी येत असल्याने या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे विभाग कोकण रेल्वेच्या विविध योजनांत मोठ्या प्रमाणात निधी गुंतवू शकणार आहे. दुहेरी रेल्वेमार्ग निर्माण करणे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबवणे, स्थानकांचे आधुनिकीकरण आणि इतर महत्त्वाची विकासकामे वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. विलिनीकरणानंतर कोकण रेल्वेचे नाव तसेच रहाणार असून त्याचे स्वायत्त अस्तित्व कायम ठेवले जाईल. याविषयी ४ राज्यांनीही या प्रस्तावाला संमती दिली असून लवकरच केंद्र सरकारकडे अंतिम प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.