महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • भिवंडी येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) परिसरा’चे लोकार्पण

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासक उद्गार !

  • छत्रपती शिवरायांचे मंदिर हे राष्ट्रमंदिर असल्याचे वक्तव्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भिवंडी (जिल्हा ठाणे) – काहीही झाले, तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन (प्रशंसा) आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिघळून टाकण्याचे काम करू, हे वचन देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ मार्च या दिवशी दिली. भिवंडी येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) परिसरा’च्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसान कथोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या मंदिराच्या परिसराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की…,

१. औरंग्याच्या कबरीचे संरक्षण करावे लागणे, हे आमचे दुर्दैव !

औरंग्याची कबर कशाला ही गोष्ट ठीक आहे; परंतु भारतीय पुरातत्व विभागाने त्याला ‘संरक्षित स्थळ’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करण्याचे दायित्व राज्य आणि केंद्र सरकार यांच्यावर आहे. (सरकारने ‘संरक्षित स्थळा’च्या निकषांमध्ये पालट करणारा कायदा करून आक्रमकांची सर्व प्रतिके नष्ट करणारा कायदा करावा, अशी राष्ट्रप्रेमी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक) ज्या औरंग्याने आमच्या सहस्रो लोकांना मारले, त्याच्या कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागणे, हे आमचे दुर्दैव आहे.

२. छत्रपती शिवरायांच्या दर्शनाविना कुठल्याच देवाचे दर्शन फळणार नाही !

आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन साधना करू शकतो, याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांनी देव, देश आणि धर्म यांची लढाई जिंकली; म्हणून आपण हिंदु आहोत आणि आपल्या देवदेवतांचे दर्शन करू शकतो. ज्याप्रमाणे हनुमानाचे दर्शन घेतल्याविना प्रभु श्रीरामांचे दर्शन पूर्ण होत नाही, त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या दर्शनाविना कुठल्याच देवाचे दर्शन कधीच आपल्याला फळणार नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतल्याविषयी मी ‘शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट’चे आभार मानतो. तुमच्या कामासाठी मी तुमच्या ठायी नतमस्तक होतो. हे केवळ मंदिर नसून त्याला सुंदर तटबंदी आहे, बुरूज आहे, दर्शनीय प्रवेशाचा मार्ग, बगिचासाठी जागा आणि शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग इथे पहायला मिळतात. येथे छत्रपती शिवरायांसह महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि राजमाता जिजाऊ आहेत. त्यामुळे हे राष्ट्रमंदिरच आहे. त्यातून आपल्याला मोठी प्रेरणा मिळणार आहे.

३. प्रभु श्रीरामासम छत्रपती शिवरायही ‘युगपुरुष’ !

या देशात आपण प्रभु श्रीरामाला ‘युगपुरुष’ म्हणतो. त्यांनी छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातील पौरुषत्व (शक्ती) जागृत केले आणि त्यांच्या भरवशावर जगातील सर्वांत मोठ्या अधर्मी शक्तीचा निःपात केला. त्यामुळे एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभु श्रीराम आमच्यासाठी युगपुरुष आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांनीसुद्धा अठरापगड जातींच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यात पौरुष (शक्ती) निर्माण केले.

४. सिंहासनासाठी नाही, तर देव, देश आणि धर्म यांसाठी लढायचे आहे !

आपल्याला राजासाठी किंवा सिंहासनासाठी लढायचे नसून देव, देश आणि धर्म यांच्यासाठी लढायचे आहे, या गोष्टीचे त्यांनी बीजारोपण केले.

५. शिवरायांच्या १२ गड-दुर्गांना जागतिक वारसास्थळांची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार !

‘एकोप्याने रहाणारा एकसंघ महाराष्ट्र’ हाच छत्रपती शिवरायांना अपेक्षित महाराष्ट्र आहे. जाती-धर्मात दुभंगलेला महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षित नाही. त्यामुळेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जातांना तोच संकल्प घेतला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या १२ गड-दुर्गांना जागतिक वारसास्थळांची मान्यता मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. संगमेश्‍वरला छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बनवणार आहोत. आगर्‍याची कोठी स्मारक म्हणून विकसित करायला देण्यासाठी उत्तरप्रदेश शासनाकडे आम्ही विनंती केली आहे.