रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘युवा साधना’ शिबिरात पुणे येथील युवा साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युवा साधना’ शिबिर झाले. पुणे येथील काही युवा साधक या शिबिरात सहभागी झाले होते. त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. श्री. प्रणव अरवतकर

कु. प्रणव अरवतकर

१ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सांगण्यामुळे नियोजन करण्याचे महत्त्व लक्षात येणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना ‘नियोजन का करायचे ?’, यावर शिबिरात मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, ‘‘देवाने दिलेला वेळ १०० टक्के देवासाठी द्यायचा. वेळेचा पूर्ण वापर व्हावा; म्हणून नियोजन करायचे.’’

१ आ. आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर मनातील नकारात्मक विचार नाहीसे होणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘अनिष्ट शक्ती एका विचारातून दुसर्‍या विचारांचे जाळे निर्माण करतात. त्याच वेळी सतर्क राहून कागदावर श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल घालून त्यात मनातील विचार लिहायचे.’’

त्यानुसार प्रार्थना करून मी कागदावर मनातील प्रत्येक नकारात्मक विचार लिहून त्याभोवती नामजपाचे मंडल काढले. तेव्हा मी विचार लिहित असतांनाच ‘मनातील नकारात्मक विचार नष्ट होत आहेत’, असे मला जाणवले. माझी ही कृती पूर्ण झाल्यावर माझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार १ – २ मिनिटांत नष्ट होऊन माझे मन शांत झाले.

त्यानंतर मी दुसर्‍या दिवसाचे नियोजन करतांना माझ्या मनात आलेला ‘मला या नियोजनानुसार कृती करायला जमणार नाही’, हा नकारात्मक विचारही मी त्याच मंडलात लिहिला. दुसर्‍या दिवशी नियोजनानुसार कृती करतांना मला आनंद मिळत होता.

१ इ. नियोजनानुसार प्रयत्न करतांना सकारात्मकता वाढणे : नियोजनानुसार प्रयत्न करतांना मी सकारात्मक स्थिती अनुभवतो. नियोजनानुसार प्रयत्न झाले नाही, तर ‘मी कुठे अल्प पडलो ?’, याचे चिंतन होऊन ते मला स्वीकारता येत आहे. ‘आणखी चांगले प्रयत्न कसे करू शकलो असतो ?’, असे माझे चिंतन होऊ लागले. त्यामुळे माझ्या मनातील विचार न्यून होऊन माझा नामजप गुणात्मक होऊ लागला. स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी मी करत असलेल्या स्वयंसूचना सत्रांतही वाढ झाली.

‘सच्चिदानंदस्वरूप गुरुदेवांनी अशी प्रभावी उपाय पद्धत दिली’, याबद्दल मी त्यांच्या चरणी शरणागत होऊन कृतज्ञता व्यक्त करतो.’

२. कु. आदेश मुटेकर (वय १८ वर्षे)

कु. आदेश मुटेकर

अ. ‘मला आश्रमातील साधकांमध्ये संघभाव जाणवला.

आ. साधकांमध्ये एकमेकांप्रती प्रेमभाव आहे. ओळख नसली, तरीही साधक अन्यांची प्रेमाने विचारपूस करतात.

इ. आश्रमातील चैतन्यामुळे तेथे व्यष्टी आणि समष्टी साधना सहजतेने होते. तेथे माझ्या मनात मायेतील विचार आले नाहीत. ‘आश्रमातच राहून जीवनाचे सार्थक करून घ्यावे’, असे मला वाटले. ‘माझे ध्येय ईश्वरप्राप्ती आहे’, असे मला तीव्रतेने जाणवले.

ई. मी आश्रमात प्रवेश करतांना ‘माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण प्रवेशद्वारावरच नष्ट झाले’, असे मला जाणवले. आश्रमात असतांना ‘स्वतःवर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवत असे.

उ. मी आश्रमात अल्पाहार आणि महाप्रसाद घेतांना ते अल्प प्रमाणात ग्रहण केले, तरीही माझे मन तृप्त होत होते.

ऊ. आश्रमात एवढे साधक असूनही ‘पथ्याचे जेवण वेगळे बनवले जाते’, हे आपल्या बुद्धीपलीकडचे आहे.

‘गुरुदेवांच्या कृपेने मला आश्रमजीवन अनुभवण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

३. कु. विदिशा जोशी (वय १८ वर्षे)

कु. विदिशा जोशी

३ अ. गुरुदेवांच्या कृपेने नकारात्मक विचारांवर मात करता येऊन आश्रमात जाता येणे : ‘मला रामनाथी आश्रमात जायचे आहे’, असे समजल्यावर माझ्या मनात तेथे न जाण्याविषयी नकारात्मक विचार आले. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच मला त्यावर मात करता आली. तेथे गेल्यापासून पाच दिवसांत मला प्रत्येक व्यक्तीकडून अनेक गुण शिकायला मिळाले.

३ आ. ‘आश्रमातील प्रत्येक वस्तू सजीव आहे’, असे मला जाणवले. मी प्रत्येक साधकात गुरुदेवांचे रूप पहायला शिकले. मी घरी आल्यावर असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.’

४. कु. सहर्षा मुदकुडे (वय १८ वर्षे)

कु. सहर्षा मुदकुडे

४ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्याचा झालेला लाभ : ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी शिबिरात साधनेविषयी मार्गदर्शन करतांना सांगितले, ‘‘आपल्याला साधनेसाठी जे आवश्यक आहे, ते देव वेळोवेळी देतच असतो.’’ त्यांचे हे वाक्य माझ्या अंतर्मनावर कोरले गेले आहे. पूर्वी मी इतरांशी तुलना करत असे. त्यामुळे मला निराशा येत असे. आता माझी इतरांशी तुलना झाल्यावर मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे हे वाक्य आठवते. मी देवाला प्रार्थना करते. आता मला आनंदही पुष्कळ मिळतो.

४ आ. भावस्थितीत रहाता येणे : ‘अखंड भावस्थितीत रहाणे’, हे ध्येय ‘भावसत्संग’ या सत्रात दिले होते. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘देवाने त्याच क्षणापासून मला भावस्थितीत ठेवले आहे. घरी दूरचित्रवाहिनीवर कार्यक्रम चालू असतांना माझ्या मनात कधीतरी नकळत ‘कार्यक्रम बघायचा का ?’, असा विचार येतो. तेव्हा भगवंत लगेच माझ्या लक्षात आणून देतो, ‘तुला हिंदु राष्ट्रासाठी पात्र बनायचे आहे. त्यासाठी अधिकाधिक व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचे प्रयत्न करायचे आहेत.’ त्यानंतर मला ‘दूरचित्रवाहिनीवर कार्यक्रम पहायला नको’, असे वाटते. आता ‘गुरुदेव मला मायेत अडकू देणार नाहीत’, याची निश्चिती वाटून मला त्यांच्या प्रती कृतज्ञता वाटते.

४ इ. आजोबांना दैनिक ‘सनातन प्रभात’ची माहिती सांगणे : प्रायोगिक भागात ‘योग्य पद्धतीने प्रचार कसा करावा ?’, हे सांगण्यात आले. मी घरी आल्यावर एकदा माझे आजोबा वृत्तपत्र वाचत होते. तेव्हा श्रीकृष्णाने माझ्या लक्षात आणून दिले, ‘तुला बाहेर प्रचाराला जावे लागले, तर तू कशी माहिती सांगणार ? याच्या सरावाला घरातूनच आरंभ कर.’ तेव्हा मी प्रार्थना करून आजोबांना दैनिक ‘सनातन प्रभात’ची माहिती सांगितली.

४ ई. साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे : एका साधकाने अपालाताईला (कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) विचारले, ‘‘आवड-नावडचा त्याग करण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करता ?’’ तेव्हा ताईने सांगितले, ‘‘एखादी वस्तू आपल्या समोर असल्यावर ‘मला ती वस्तू हवी कि श्रीकृष्ण हवा ?’, असा मनाला प्रश्न विचारायचा. तेव्हा आपोआपच ‘श्रीकृष्ण’ असे उत्तर येऊन त्या वस्तूप्रतीची आवड-नावड न्यून होत जाते.

५. कु. प्राजक्ता नाईक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे)

कु. प्राजक्ता नाईक

अ. ‘मी रुग्णाईत असल्याने १ दिवस शिबिराला जाऊ शकले नाही. तेव्हा ‘माझे शिबिर चुकले’, या विचाराने मला पुष्कळ वाईट वाटत होते.

आ. नंतर दुसर्‍या दिवशी एका संतांचा सत्संग लाभला. तेव्हा ‘त्यांच्याशी काय आणि किती बोलू !’, असे मला होत होते. संतांचे ते रूप पाहून माझा भाव जागृत होत होता.

इ. मला ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटत होते. ते बोलत असतांना २ – ३ वेळा मला अष्टगंधाचा सुगंध आला.

ई. ही अनुभूती घेतल्यावर ‘१ दिवस शिबिर मिळाले नाही, तरी संतांचा सत्संग लाभला आणि त्यांचे मार्गदर्शन मिळाले. आणखी काय हवे ?’, असे मला वाटत होते.

६. कु. संजना कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय १९ वर्षे)

कु. संजना कुलकर्णी

अ. ‘शिबिराला जायचे आहे’, असे समजल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि आनंद झाला.

आ. आश्रमात आल्यानंतर माझा ‘निर्विचार’ हा नामजप चालू झाला. माझ्याकडून ‘मला आश्रमातील चैतन्य ग्रहण करता येऊ दे’, अशी सतत प्रार्थनाही होत होती.

इ. एका ताईने सांगितले, ‘‘देव ‘आपले शिक्षण किती झाले आहे ?’, हे बघत नाही. तो आपली साधना बघतो.’’ त्यातून मला साधना करण्याचे महत्त्व कळले.

ई. शिबिरात सांगितल्याप्रमाणे मी भाव ठेवून कृती करायला आरंभ केल्यावर ‘देव सतत समवेत आहे’, याची मला जाणीव झाली. ‘मी कृष्णाच्या कुशीत झोपले आहे’, ‘कृष्ण मला जेवण भरवत आहे’, ‘माझ्याभोवती कृष्णाचे सुदर्शनचक्र फिरून संरक्षककवच सिद्ध होत आहे’, असे भावजागृतीचे प्रयोग केल्यावर मला आनंद अनुभवता येत आहे.

उ. ‘कलेतून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, याविषयी मला समजले. मला चित्रकलेची आवड आहे. मी आधी सर्व कलांकडे केवळ मनोरंजन या दृष्टीने पहायचे; पण ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, हे सूत्र कळल्यापासून माझ्याकडून कलेचे सादरीकरण भावपूर्ण करण्याचा प्रयत्न होतो. मला स्पंदनशास्त्राबद्दल अनेक सूत्रे शिकायला मिळाली.

ऊ. ‘समजलेले आचरणात आणणे, म्हणजे खरे शिक्षण’, हे पैलूही शिकायला मिळाले.’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि प.पू. दास महाराज यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने मला चांगले वाटू लागले अन् उर्वरित शिबिरात मला सहभागी होता आले. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक