१ सहस्र ८२६ पानांचे पुरावे देऊनही मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर ‘ईडी’कडून कारवाई नाही !

तक्रारदराने ईडी कार्यालयासमोरच कापला केक !

मुंबई – मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात २ वर्षांत ३ वेळा तब्बल १ सहस्र ८२६ पानांचे पुरावे देऊन तक्रारी प्रविष्ट केल्या; मात्र तरीही ईडी कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने तक्रारदाराने ईडी कार्यालयासमोरच केक कापत ‘तक्रारदिन’ साजरा केला आहे, तसेच आताही कारवाई न झाल्यास आता थेट न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्याची चेतावणी तक्रारदार महेश शंकरपल्ली यांनी दिली आहे. शंकरपल्ली हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत.

१. मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा अपवापर करून मोठ्या प्रमाणात अपप्रकार केले आहेत. त्यांनी अनेकांच्या भूमी हडपल्या असून घोटाळेही केले आहेत, असा आरोप महेश शंकरपल्ली यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

२. त्यांनी ‘सत्तार यांच्या कारनाम्याचे पुरावेही आहेत’, असे सांगितले. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करत महेश शंकरपल्ली यांनी प्रथम ३१ डिसेंबर २०२१ या दिवशी ७८४ पानांची तक्रार ईडी कार्यालयात प्रविष्ट केली होती; मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा १ जानेवारी २०२३ या दिवशी ५६६ पानांची तक्रार ईडी कार्यालयात दिली; मात्र तरीही सत्तार यांच्यावर कारवाई झाली नाही.

३. आता तिसर्‍यांदा महेश शंकरपल्ली यांनी ईडी कार्यालयात ४७३ पानांची तक्रार दिली आहे, तसेच पुढील एका मासात ‘ईडी’ने तक्रारीची नोंद न घेतल्यास न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार असल्याचे सांगितले.