Arunachal Pradesh Conversion : अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे आदिवासींचे धर्मांतर !

धर्मांतरामुळे आदिवासींची ओळख धोक्यात !

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – अरुणाचल प्रदेशामध्ये आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर चालू असून लवकरच राज्यातील आदिवासींची मूळ ओळख नष्ट होऊन ते ख्रिस्ती झालेले असतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वर्ष २००१ मध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या १८.७२ टक्के होती, ही संख्या वर्ष २०११ मध्ये वाढून ३०.२६ टक्के झाली. यांतील बहुतेक आदिवासी आहेत. दुसरीकडे मुसलमानांच्याही संख्येत काही प्रमाणात वाढ होत आहे. वर्ष २००१ मध्ये १.८८ टक्के असणारी मुसलमानांची लोकसंख्या वर्ष २०११ मध्ये १.९५ टक्के झाली.

१. ‘इंडिजिनस फेथ अँड कल्चरल सोसायटी ऑफ अरुणाचल प्रदेश’चे (आय.एफ्.सी.एस.ए.पी.चे) अध्यक्ष कटुंग वाहगे म्हणाले की, आमचे लोक हिंदु आणि ख्रिस्ती झाले आहेत. काही आता मुसलमानही झाले आहेत. धर्मांतर रोखणे आणि आदिवासी संस्कृती वाचवणे यांसाठी आय.एफ्.सी.एस.ए.पी.ची स्थापना केली. आमची संघटना २४ वर्षांपासून स्थानिक संस्कृती वाचवण्याची मोहीम राबवत आहे. त्यासाठी प्रतिवर्षी १ डिसेंबरला ‘आदिम आस्था दिन’ साजरा होतो.

२. राजीव गांधी विद्यापिठातील राज्यशास्त्राचे प्रा. नाका हिना नबाम म्हणाले की, आदिवासींचे धर्मांतर चिंताजनक आहे. प्रारंभी आमच्या लोकांचा विश्‍वास होता की, प्रत्येक गोष्टीत ईश्‍वर आहे; मात्र एकेश्‍वरवादाचा प्रचार करणार्‍यांचा येथील समाजावर पुष्कळ प्रभाव पडला आहे. धर्मांतर करणारे आता आपल्या संस्कृतीचा द्वेष करतात. अद्यापही असे काही लोक आहेत जे दु:ख, आजारातून मुक्ती मिळण्यासाठी धर्मांतर करतात.

संपादकीय भूमिका

उत्तर भारतात चर्चसंस्थांकडून आदिवासी हिंदूंच्या धर्मांतराचे काम जोरात चालू आहे. हे थांबवायचे असेल, तर अशा संस्थांना मिळणारा विदेशी देणग्यांचा परवाना रहित करण्यासह सरकारने त्या विसर्जित करून धर्मांतर करणार्‍यांना कारागृहात डांबणे आवश्यक !