‘मंगलात झाले मंगल’ असा मृत्यू अनुभवणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे यांना जाणवलेली सूत्रे

‘मंगलात झाले मंगल’ असा मृत्यू अनुभवणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे (वय ७४ वर्षे) यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना जाणवलेली सूत्रे

१६.७.२०२२ या दिवशी पहाटे ३.०६ वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे निधन झाले. २५.७.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(कै.) सौ. शालिनी मराठे

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सौ. शालिनी मराठे यांच्यासाठी उपाय सांगणे आणि त्यांची भेट घेणे

१ अ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वाराणसीहून आणलेले गंगाजल सौ. शालिनी मराठे यांना देण्यास सांगणे : ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वाराणसीहून आणलेले गंगाजल आणि विभूती पू. (सौ.) शैलजा परांजपेआजींकडे (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आई) पाठवली होती आणि त्यांना सांगितले होते, ‘‘सौ. मराठेकाकूंना प्रतिदिन थोडे गंगाजल पाजा आणि विभूती लावा. तसेच मलाही (श्री. प्रकाश मराठे यांनाही) द्या.’’

१ आ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘तुमचे प्रारब्ध भोगून संपले असून थोडेच शिल्लक आहे’, असे सौ. शालिनी मराठे यांना सांगणे : मे २०२२ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी त्या माझ्या पत्नीला भेटल्या होत्या. त्यांनी तिला सांगितले, ‘‘काकू, तुमचे प्रारब्ध भोगून संपले आहे. आता थोडेच शिल्लक आहे.’’

१ इ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ गुरुपौर्णिमेनंतरही सौ. शालिनी मराठे यांना भेटणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ गुरुपौर्णिमेनंतरही सौ. शालिनीकाकूंना भेटायला आल्या होत्या. तेव्हा त्यांच्या समवेत त्यांचे पती सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि आई-वडील पू. परांजपेआजी अन् पू. परांजपेआजोबा आले होते. तेव्हा ती (पत्नी) सर्वांशी चांगली बोलली आणि तिने सगळ्यांना नमस्कार केला.

२. सौ. शालिनी मराठे यांच्या देहावसानाच्या वेळची सूत्रे

श्री. प्रकाश मराठे

२ अ. पत्नीच्या देहावसानाच्या आदल्या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पत्नीची स्थिती लक्षात आल्याने त्यांनी श्रीकृष्णाचा नामजप लावण्यास आणि प्रार्थना करण्यास सांगणे : सद्गुरु गाडगीळकाकांनी मला सांगितले, ‘‘सौ. सारिका (सौ. सारिका आय्या) प्रतिदिन मला नामजपादी उपाय विचारून घेत होती. उपायांमुळे काकूंना जरा बरे वाटून त्रास थोडे अल्प होत होते. १५.७.२०२२ या दिवशी (देहावसानाच्या आदल्या दिवशी) मी नामजपादी उपाय शोधले; पण त्यांची स्थिती ठीक नव्हती; म्हणून मी त्यांना श्रीकृष्णाचा नामजप लावून ठेवायला आणि प्रार्थना करायला सांगितली.’’

२ आ. सौ. शालिनी यांच्या देहावसानाचे वृत्त कळल्यावर स्थिर रहाता येणे : १६.७.२०२२ या दिवशी पहाटे डॉ. पांडुरंग मराठे (सौ. शालिनी यांचा आतेभाऊ) यांनी मला सांगितले, ‘‘सौ. शालिनी यांचे पहाटे ३ वाजून ६ मिनिटांनी देहावसान झाले आहे.’’ मी तिचे दर्शन घेतले. त्या वेळी मला ‘ती शांत झोपली आहे’, असे वाटले. मी बाहेर येऊन त्याविषयी नातेवाइकांना कळवू लागलो. त्या वेळी मी स्थिर होतो.

२ इ. सकाळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा मला भ्रमणभाष आला. तेव्हा त्यांनीही मला धीर दिला.

३. सौ. शालिनी यांचे अंत्यदर्शन आणि अंत्यविधी चैतन्यमय वातावरणात पार पडणे

३ अ. आदल्या दिवशी विविध त्रास होऊनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने शक्ती मिळून मला अंत्यविधी करता येणे : शालिनीच्या देहावसानाच्या आदल्या दिवशी रात्री मला पुष्कळ शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास झाल्याने मी अस्वस्थ झालो होतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच मला शक्ती दिल्याने मी सकाळी तिचे देहावसान झाल्यापासून ते अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत (सायंकाळी ५.३० पर्यंत) सर्व कृती करू शकलो.

३ आ. अंत्यदर्शनाच्या वेळी नातेवाईक, सद्गुरु, संत आणि साधक यांना पाहून पंढरपूरच्या यात्रेची आठवण होणे : सकाळी आश्रमात चैतन्य जाणवत होते. सर्व साधक येऊन दर्शन घेऊन जात होते. कुठेही गडबड किंवा गोंधळ नव्हता. माझे मन निर्विचार होते. माझ्या मनात ‘देवाची समीधा (पत्नीचा देह) अग्नीला अर्पण करण्याचा विधी करायचा आहे’, हा एकच विचार होता. अंत्यदर्शनाच्या वेळी नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती, तसेच आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ, सद्गुरु, संत आणि साधक आले होते. तेव्हा मला पंढरपूरच्या यात्रेची आठवण झाली.

३ इ. सर्व विधी मंगलमय वातावरणात होणे : विधींना आरंभ झाल्यावर मला ‘तो मृतदेह आहे’, असे वाटले नाही. मला तो संत सोहळाच वाटत होता. हा सोहळा ‘न भूतो न भविष्यति ।’ असा होत होता. प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘मंगलात झाले मंगल’ हे भजन मला आठवत होते.

३ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सौ. मराठे यांचा श्वासोच्छ्वास चालू असल्याचे जाणवून त्याचे चित्रीकरण करण्यास सांगणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आल्यावर त्यांनी उत्तरेकडे तोंड करून, तसेच पायाच्या बाजूने काकूंचे निरीक्षण केले. त्या वेळी त्यांना जाणवले, ‘सौ. मराठेकाकूंचा श्वासोच्छ्वास अजून चालू आहे.’ त्यांनी लगेच चित्रीकरण करणार्‍या साधकांना त्याचे चित्रीकरण करायला सांगितले. मलासुद्धा ‘तिचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे वाटले होते; पण गुरुदेव आल्यावर तो वाढला होता, असे जाणवले. तेव्हा मला वाटले, ‘तिचा जीव त्यांचीच वाट पहात होता.’

३ उ. तिचा चेहरा शांत दिसत होता. हात-पाय पिवळे दिसून त्यांतून ‘चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

३ ऊ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘सौ. मराठेकाकू संतपदाच्या दिशेने वाटचाल करत आहेत’, असे सांगणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘देहावसान होण्याच्या अगोदरच काकू सूक्ष्मातून गुरुदेवांचे दर्शन घेऊन गेल्या. त्यांच्याकडून पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे. त्या संतपदाच्या दिशेने वाटचाल करत पुढे निघाल्या आहेत. आता तुम्ही ‘निर्विचार’ हा जप करा.’’ त्या मधे मधे मला धीर देत होत्या.

३ ए. पत्नीच्या देहाला दिलेला अग्नी ‘यज्ञाग्नि’ वाटणे : आम्ही फोंडा येथील स्मशानभूमीत गेलो. त्या वेळी माझे मन निर्विचार होते. सर्व विधी झाल्यावर प्रेताला अग्नी दिला. तेव्हा अग्नी लवकर प्रज्वलित झाला. मुख्य गोष्ट म्हणजे, तो ‘प्रेताग्नी’ वाटत नसून ‘यज्ञाग्नि’च वाटत होता. आम्ही निघेपर्यंत त्यातून मुळीच धूर आला नाही. त्यातून निघणार्‍या ज्वाळा पिवळ्या धमक दिसत होत्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी, म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराने दर्शन दिल्याने (कै.) सौ. शालिनी मराठे यांचे जीवन कृतार्थ झाले. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. प्रकाश मराठे (सौ. शालिनी मराठे यांचे पती) (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२२)

प.पू. दास महाराज यांना कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

सनातनच्या रामनाथी (गोवा) आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांच्याविषयी प.पू. दास महाराज यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

प.पू. दास महाराज

१. पायाच्या शस्त्रकर्मामुळे ३ मास रुग्णालयामध्ये रहावे लागणे आणि त्या वेळी महाप्रसाद बनवण्याची सेवा सौ. शालिनी मराठे यांच्याकडे असणे

‘वर्ष २००७ मध्ये माझा अपघात होऊन माझ्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हा पायाचे मोठे शस्त्रकर्म करावे लागल्यामुळे मला सलग तीन मास उपचारांसाठी बांबोळी, गोवा येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये रहावे लागले होते. त्या वेळी माझ्या समवेत पू. (सौ.) माई (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक – पू. दास महाराज यांच्या पत्नी) आणि दोन साधक (श्री. मदन सावंत अन् श्री. कृष्णा नाईक) सेवेला होते. इतर साधक अधेमधे येत असत. त्या वेळी आमच्यासाठी लागणारा प्रसाद आणि महाप्रसाद बनवण्याची सेवा रुग्णालयापासून २ किलोमीटर अंतरावरील पाळे-शिरदोन येथे रहाणार्‍या सौ. शालिनी मराठे यांच्याकडे होती.

२. ‘सौ. मराठेकाकूंवर श्री अन्नपूर्णादेवी प्रसन्न आहे’, असे जाणवणे

२ अ. सौ. मराठेकाकूंनी बनवलेला स्वयंपाक चवीला चांगला असून तो कधीच अल्प न पडणे : सौ. मराठेकाकूंमधील सेवाभावामुळे त्यांनी बनवलेला प्रसाद (अल्पाहार) आणि महाप्रसाद (जेवण) चवीला पुष्कळ चांगला असे. त्यांनी ३ – ४ साधकांसाठी बनवलेला महाप्रसाद आम्ही सर्व जण खाऊनही शिल्लक रहात असे. त्यामुळे मला भेटायला येणार्‍या साधकांनाही महाप्रसाद देता यायचा. काकूंनी पाठवलेला महाप्रसाद अल्प पडला किंवा संपला, असे कधी झाले नाही. महाप्रसाद ग्रहण करतांना ‘काकूंवर श्री अन्नपूर्णादेवी प्रसन्न आहे’, असे सतत जाणवायचे.

२ आ. काकूंच्या हातचा महाप्रसाद ग्रहण केल्याने प्रकृतीही लवकर सुधारणे : मी काकूंच्या हातचा प्रसाद, म्हणजे श्री अन्नपूर्णादेवीचा प्रसाद या भावाने ग्रहण करत असल्यामुळे माझी प्रकृतीही लवकर सुधारू लागली. काकूंच्या हातातील चैतन्यामुळे मला चांगलाच लाभ झाला. माझ्यावर आलेल्या मोठ्या संकटात काकूंनी मला प्रेमाने, तसेच वात्सल्यभावाने प्रसाद आणि महाप्रसाद दिला अन् आजारपणात मला साहाय्य केले. त्याबद्दल मी काकूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

३. काकूंच्या देहावसानाच्या दिवशी त्यांची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेली कविता अभंग असल्याप्रमाणे जाणवून ‘त्या लवकरच संतपदाला पोचतील’, असे जाणवणे

१६.७.२०२२ या दिवशी (देहावसान झालेल्या दिवशी) दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेली काकूंची कविता वाचली. त्याच दिवशी त्यांचे देहावसान झाले होते. त्या वेळी ती कविता वाचून मला वाटले, ‘काकूंना देवाकडून आधीच पूर्वसूचना मिळाली होती. त्यामुळे काकू त्या कवितेतून चराचरातील आनंदस्वरूप भगवंतच अनुभवत आहेत.’ अशी कविता सामान्य व्यक्ती लिहू शकत नाही. ‘काकूंचा मृत्यू झाला नसून काकू देवाच्या व्यापक रूपाशी एकरूप झाल्या आहेत’, असे जाणवले. ‘ती कविता नसून संतांचा अभंग आहे’, असेही मला जाणवत होते, तसेच काकूही त्या स्थितीला, म्हणजे ‘संतपदाला लवकरच पोचणार’, असे वाटले. ‘काकूंचा पुढील प्रवास चांगला होऊ दे’, अशी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी प्रार्थना आहे.’

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.