कथित पुरोगाम्यांचा हिंदुद्वेष उखडून टाकण्यासाठी हिंदुत्वाचा बुलडोझर आवश्यक !

हिंदूंच्या शोभायात्रांवर देशातील विविध भागांत जीवघेणी आक्रमणे झाली, तरी पुरोगाम्यांच्या गोटात मात्र स्मशानशांतता; पण देहलीतील जहांगीरपुरीमध्ये अनधिकृत कारवायांवर बुलडोझरची चाहूल लागताच न्यायालयाचे दरवाजे तातडीने उघडण्यासाठी याच पुरोगाम्यांनी आटापिटा केला. त्यामुळे ढोंगी पुरोगाम्यांच्या या उरबडवेपणातील फोलपणा पुनःश्च देशासमोर आला आहे.

१. देशभरात हिंदूंच्या शोभायात्रांवर धर्मांधांकडून आक्रमणे होऊनही तथाकथित पुरोगाम्यांनी ‘ब्र’ न काढणे !

‘जय श्रीराम’च्या गर्जनेत श्रीरामनवमी आणि हनुमान जयंतीच्या यात्रांमध्ये रामभक्त तल्लीन होते. भगवेधारींच्या घोषणांनी आसमंतही राममय झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा प्रभु श्रीरामांच्या प्रतिमापूजनासाठी तितकीच रामभक्तांची गर्दी फुललेली, तर कुठे पुष्पवृष्टीची लगबग चालू होती. अशी ही शोभायात्रा एका विशिष्ट धर्मियांच्या परिसरात प्रवेश करते. एकाएकी या यात्रेवर तुटून पडण्यासाठी दबा धरून बसलेल्या धर्मांधांकडून तुफान दगडफेक चालू होते. दगडफेक्यांच्या टोळक्यांतूनच ‘अल्ला हू अकबर’चे नारे देत एक दाढीवाला बंदुकधारी रामभक्तांवर पिस्तुल रोखतो अन् अशी ही शोभायात्रा क्षणार्धात मत्सरयात्रेचे स्वरूप धारण करते. देशाच्या कानाकोपऱ्यात निघालेल्या श्रीरामनवमी आणि हनुमान जयंतीच्या अशाच काही शोभायात्रांचा समारोप जाळपोळ अन् दंगली यांनी झाला. राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आसाम, गुजरात यांसारख्या राज्यांत धर्मांधांनी हिंदूंच्या केवळ यात्रांनाच लक्ष्य केले नाही, तर रामभक्तांचे रक्तही सांडले; पण या सर्व घटनांची छायाचित्रे, व्हिडिओ ‘व्हायरल’ (प्रसारित) झाल्यानंतरही देशातील तथाकथित पुरोगाम्यांना ना त्याची खंत ना खेद ! उलट धर्मांधांची माथी भडकावणारे हिंदूच किती कट्टर, असहिष्णू अशा उथळ प्रतिक्रियांवरच पुरोगाम्यांची मदार ! त्या शोभायात्रेत सहभागी रामभक्तांच्या सुरक्षेविषयी कुणालाही यत्किंचितही वैषम्य वाटू नये, यातच सगळे आले.

२. ‘अल्पसंख्यांकांचेच मानवाधिकार आणि बहुसंख्य हिंदूंचा धिक्कार’, हीच कथित पुरोगामी बुद्धीवंतांची दुटप्पी मानसिकता !

या पुरोगाम्यांना बंदूक डागणाऱ्यांच्या मानवाधिकारांविषयी नेहमीचाच उमाळा आणि रामभक्तांच्या जिवाचे मोल ते त्यांच्या लेखी काय म्हणा ! याचाचा प्रत्यय देहलीच्या जहांगीरपुरीमध्येही आला. या दंगलीनंतर तेथील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई चालू करण्यात आली. त्याची चाहूल लागताच काँग्रेस नेते अधिवक्ता कपिल सिब्बल, ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (एम्)’ याच्या वृंदा करात यांच्या सारख्यांनी सर्वोच्च न्यायालयाची पायरी गाठली. अशा बुलडोझरप्रणीत कारवाया कशा प्रकारे मानवाधिकारांचे हनन करणाऱ्या आणि एका विशिष्ट धर्माच्या विरोधी आहेत वगैरेचे रडगाणे गात ही मंडळी कारवाईवर स्थगिती मिळवण्यात यशस्वीही ठरली. असे असले, तरी यानिमित्ताने ‘अल्पसंख्यांकांचेच मानवाधिकार आणि बहुसंख्य हिंदूंचा धिक्कार’, हीच कथित पुरोगामी बुद्धीवंतांची दुटप्पी मानसिकता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

३. अधिवक्ता कपिल सिब्बलसारख्या कथित पुरोगाम्यांना देशद्रोह्यांचा कळवळा असणे

या बुलडोझरविरोधी अभियानात अग्रस्थानी असलेले अधिवक्ता कपिल सिब्बल यांना तर जणू न्यायालय हवे तेव्हा, रात्री-अपरात्रीही कसे उघडावे, यात आता अगदी मास्टरीच लाभलेली. त्यात मुंबईतील १९९३ च्या बाँबस्फोट प्रकरणातील आतंकवादी याकूब मेमनची फाशी रोखण्यासाठी अपरात्री उघडलेले सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे असोत वा ‘महंमद अफझलचीही फाशी माफ करा’, म्हणून न्यायालयाला केलेल्या विनवण्या असो, यावरून कथित पुरोगाम्यांना देशद्रोह्यांचा किती कळवळा आहे, ते वेगळे सांगायला नकोच ! यंदाही जहांगीरपुरीमधील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवरून हेच पुरोगामी ‘जमियत-ए-उलेमा हिंद’ने ही कारवाई रोखण्यासाठी केलेल्या याचिकेच्या समर्थनार्थ धावून गेले.

४. भाजपशासित राज्यांनी दंगेखोरांच्या मालमत्तांवर बुलडोझर फिरवण्याचा रामबाण उपाय करणे

‘ही कारवाई दंगेखोरांना अद्दल घडवण्यासाठी कशी केली जात असून अनधिकृत बांधकाम हा बहाणा आहे’, हे पोटतिडकीने सर्वोच्च न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न अधिवक्ता कपिल सिब्बल आणि वृंदा करात यांनी केला. न्यायालयानेही या प्रकरणाची सुनावणी २ आठवड्यांनी पुढे ढकलून कारवाईवर तात्पुरती स्थगिती आणली. त्यामुळे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि आसाम यांसारख्या भाजपशासित राज्यांनी दंगेखोरांविरोधात त्यांच्या मालमत्तांवर बुलडोझर फिरवण्याचा केलेला रामबाण उपाय या पुरोगाम्यांच्याही तितकाच जिव्हारी लागला. असे असले तरी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाडलेल्या या पायंडामुळेच उत्तरप्रदेशमध्ये श्रीरामनवमी किंवा हनुमान जयंतीला अशा हिंसाचाराची एकही घटना निदर्शनास आली नाही. जेव्हा योगी आदित्यनाथ यांनी या दंगेखोरांच्या मालमत्ता यापूर्वीही जमीनदोस्त केल्या, तेव्हा त्याविरोधी न्यायालयात जाण्याचे धाडसही या (कथित पुरोगामी) मंडळींनी दाखवले नव्हते.

५. बंगाल, केरळ आणि त्रिपुरा येथे साम्यवाद्यांनी नृशंस हत्याकांड करणे

ज्या वृंदा करात या धर्मांधांच्या अनधिकृत मालमत्तांच्या बचावार्थ इतक्या तळमळीने धावून आल्या, त्यांना कदाचित त्यांच्याच पक्षाच्या रक्तरंजित कारवायांच्या इतिहासाचे विस्मरण झाले असावे; कारण ममता बॅनर्जी बंगालमध्ये सत्तेत येण्यापूर्वी साम्यवाद्यांनी त्यांच्या विरोधकांच्या अक्षरश: हत्या केल्या. ‘सीपीआय-एम्’ची ‘हरमद वाहिनी’ या राजकीय गुंडांच्या टोळीकडे विरोधकांचे तोंड कायमचे बंद करण्याचेच काम होते.

अ. नन्नूरचे नृशंस कांड : करात यांच्याच पक्षनेत्यांच्या आदेशाने वर्ष २००० मध्ये नन्नूरचे नृशंस कांड घडले. ११ भूमिहीन अल्पसंख्यांकांची ‘ते विरोधी पक्षाचे समर्थन करतात’, म्हणून हत्या केली गेली.

आ. बंगालमधील नंदीग्राम हत्याकांड : अख्ख्या देशाला हादरवून सोडणारे वर्ष २००७ चे नंदीग्राम हत्याकांडही साम्यवाद्यांच्या क्रौर्यकथेचीच कडी होती. शेतकऱ्यांची तब्बल १० सहस्र एकर जमीन एका विदेशी आस्थापनेला देण्याचा घाट बंगालच्या तत्कालीन बुद्धदेव भट्टाचार्य सरकारने घातला होता; पण सरकारच्या या निर्णयाला विरोध करणारे गरीब शेतकरी आणि कामगार यांना आधी साम्यवादी कार्यकर्त्यांकडून धमकावण्यात आले. नंतर पोलिसांकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर बेछूटपणे गोळीबार करण्यात आला. सरकारी आकडेवारीप्रमाणे एकूण १४ शेतकरी मृत्यूमुखी पडले, तर ७० लोक घायाळ झाले; पण मृतांचा आकडा त्याहून अधिक असल्याचा संशय व्यक्त केला गेला.

त्यामुळे शेतकरी आणि कामगार यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणाऱ्या साम्यवादी पक्षाचा इतिहासच नव्हे, तर वर्तमानही तितकेच रक्तरंजित आहे; कारण आजही केरळमध्ये रा.स्व. संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या निर्घृण हत्यांमागे तेथील साम्यवादी सरकारच्याच विळा-हातोड्याचेच घाव आहेत. त्यामुळे बंगाल, त्रिपुरा अथवा केरळ येथे साम्यवाद्यांनी अशा किती निष्पापांच्या आयुष्यावर कायमस्वरूपी बुलडोझर फिरवला, याची तर गणतीच नाही. येथे विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे.

६. गोध्रा हत्याकांडाच्या वेळी धर्मांधांच्या मानवाधिकारांच्या नावाखाली तथाकथित पुरोगाम्यांनी थयथयाट करणे

याच पक्षाच्या वृंदा करात या आजही मानवाधिकारांची डफली वाजवत आकांडतांडव करत फिरतांना दिसतात. त्यामुळे वृंदा करात यांच्यासारखी सोयीची मानवाधिकार भूमिका मांडणाऱ्या पुरोगाम्यांनी पांघरलेले हे ढोंग यानिमित्ताने का होईना, पुन्हा एकदा उघडे पडले आहे. पुरोगामित्वाचा पुळका आलेले असेच तथाकथित मानवतावादी गोध्रा हत्याकांडावरही अल्पसंख्यांकांच्या हक्कांचीच पोपटपंची करत होते. २७ फेब्रुवारी २००२ या दिवशी सकाळी अयोध्येहून गुजरातकडे ‘साबरमती एक्सप्रेस’ने प्रवास करणारे कारसेवक झोपेत असतांनाच ते आक्रित घडले.

२ सहस्रांच्या धर्मांध जमावाने ‘साबरमती एक्सप्रेस’च्या त्या बोगींना आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. ५९ कारसेवक होरपळून मृत्यूमुखी पडले. त्यांचा दोष तो काय ? पण ते मृत कारसेवक हिंदू आणि तेही प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे होते, म्हणून या कथित पुरोगाम्यांच्या संवेदना बोथट झाल्या. त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींसाठीही हिंदु समाजालाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे कुभांड या कथित पुरोगामी आणि हिंदुद्वेष्ट्या राजकीय पक्षांनी रचले. मेलेल्या हिंदूंच्या नव्हे, तर त्यांना संपवणाऱ्या धर्मांधांच्या मानवाधिकारांच्या नावाखाली पुरोगाम्यांनी असाच थयथयाट केला. आताच्या जहांगीरपुरीच्या घटनेमध्येही पुन्हा तोच कित्ता गिरवला गेला. तेव्हा या नतद्रष्ट कथित पुरोगाम्यांची ही अख्खी जमातच हिंदुद्वेषाच्या पायावर उभी आहे. म्हणून त्यांचा हा पाया उखडून फेकण्यासाठी हिंदुत्वाचे बुलडोझरच हवे !

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)