‘स्मार्ट सिटी’ ठाणे येथील १ सहस्र ४०० सीसीटीव्ही कॅमेरांपैकी १ सहस्र कॅमेरे नादुरुस्त !

याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

  • कोट्यवधी रुपये खर्च करून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
  • अशा प्रकारे प्रशासन गुन्हेगारांना साहाय्य करत आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

ठाणे, ४ जुलै (वार्ता.) – ठाणे शहर हे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून मानले जात असतांना दुसरीकडे मात्र ठाणे शहरातील अनेक भागांतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप करत १ जुलै या दिवशी भाजपच्या महिला मोर्च्याने महानगरपालिका भवनासमोर आंदोलन केले. या वेळी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

महानगरपालिकेने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी १० कोटी रुपये व्यय करून एकूण १ सहस्र ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यांपैकी १ सहस्र सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे भाजपने निदर्शनास आणून दिले. नादुरुस्त कॅमेरे महानगरपालिकेने तात्काळ दुरुस्त करावेत अन्यथा भाजप तीव्र आंदोलन करेल, अशी चेतावणी भाजपच्या ठाणे येथील महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिली आहे.

परिसरात घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरांचे साहाय्य होत असते; मात्र हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.