उत्तरप्रदेशातील माती गावामध्ये अद्याप कोरोनाचा संसर्ग नाही !

आयुर्वेदाची औषधे घेत असल्याने कोरोनाचा संसर्ग नाही ! – गावकर्‍यांचा दावा

आयुर्वेदाचा होणारा लाभ पहाता केंद्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून संपूर्ण देशात नागरिकांना आयुर्वेदाची औषधे देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – लक्ष्मणपुरी शहरापासून २० किमी अंतरावर असणार्‍या ‘माती’ या गावात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. या गावात १२० कुटुंबे रहात असून एकूण १ सहस्र २०० लोक रहातात. याविषयी गावकर्‍यांनी सांगितले की, आम्ही उपचारासाठी अ‍ॅलोपॅथीची औषधे घेत नाही. कुणी येथे आजारी पडला, तर आयुर्वेदाच्या वैद्याकडून औषध घेतले जाते. त्यामुळे आमच्या गावात कोरोना येऊ शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.

१. या गावामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. येथून १० किमी अंतरावर आरोग्य केंद्र असले, तरी तेथे डॉक्टर उपलब्ध नसतात. गावात वैद्यकीय पथकही कधी येत नाही, असे गावकर्‍यांनी सांगितले. (स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने केलेली प्रगती ! – संपादक)

२. ‘आरोग्य भारती’चे (‘आरोग्य भारती’ हा उपक्रम रा.स्व. संघाकडून चालवला जातो.) सचिव आणि वैद्य अभय नारायण तिवारी यांनी सांगितले की, गेल्या ४ वर्षांपासून हे गाव आम्ही दत्तक घेतले आहे. आमच्या संस्थेकडून येथे आयुर्वेदाची औषधे पुरवली जातात.

३. तिवारी यांनी सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेने आरोग्य भारतीकडून येथील मुलांना प्रत्येक मासामध्ये पुष्य नक्षत्राच्या वेळी ‘स्वर्ण प्राशन’चे ड्रॉप दिले जातात. यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती आणि बुद्धीमत्ता वाढण्यास साहाय्य होते. तसेच कोरोनापासूनही रक्षण होते.