स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अनुभवलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘नोव्हेंबर २०१९ मध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी माझे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचे ठरले. ‘जेथे प्रत्यक्ष भगवंत रहातो, तेथे रहाण्याची संधी मिळून प्रक्रिया करायला मिळणार’; म्हणून मला पुष्कळ आनंद झाला आणि मी सकारात्मक झाले.

प्रक्रिया संघर्षमय असल्याने प्रत्येकालाच ती मनोभावे स्वीकारायला संघर्ष होतो; परंतु ‘मला शिकायला मिळणार’, या आनंदात असल्याने मी सकारात्मक होते.

सौ. समिधा पालशेतकर यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यास आरंभ केल्यावर त्यांच्यात कसे पालट होत गेले, याविषयी आपण ६ जून २०२१ या दिवशीच्या अंकात पाहिले. आज पुढील भाग पाहूया.

मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/484647.html

सौ. समिधा पालशेतकर

४. सारणी लिखाण

४ अ २. जेवढे चिंतन अधिक, तेवढे अंतर्मनातून प्रयत्न अधिक होतात आणि प्रक्रियेची गती वाढते : एका प्रसंगात एका साधकाने त्याची चूक सांगितली. प्रसंग सांगतांना त्याने ७५ टक्के सकारात्मक आणि २५ टक्के नकारात्मक भाग सांगितला, उपाययोजना सांगितली आणि ‘ईश्‍वरच्छेने काय होणार आहे’, ते सर्व तत्त्वज्ञानही सांगितले. सुप्रियाताईने ‘हा सर्व अभ्यास बौद्धीक स्तरावर आहे. चूक सौम्य करून सांगितली आहे. त्यामुळे बहिर्मुखता आहे’, असेे सांगितले.

त्या साधकाने या प्रसंगामध्ये नेमकी ‘मनाची विचार प्रक्रिया काय झाली ? विचारांची तीव्रता काय होती ? आणि यात किती वेळ, किती दिवस गेले ?’, ते कुठेच सांगितले नव्हते. साधकाने जशी चूक घडली, ती स्वीकारून तशीच सांगितली असती आणि चुकीची खंत वाटून ‘काय करायला हवे होते ?’, ते विचारले असते, तर त्याचे मनाच्या स्तरावर चिंतन झाले असते. मनाचा सहभाग नसल्याने साधकाने तो सर्व प्रसंग वरवरच सांगितला होता. त्यामुळे ताईला त्या साधकाला अनेक प्रश्‍न विचारून मूळ स्वभावदोषाकडे न्यावे लागले. साधकांनी प्रांजळपणे ‘चूक आहे, तशी सांगितली’, तरच आढावा घेणारा साधक साहाय्य करू शकतो. जेवढे चिंतन अधिक, तेवढे अंतर्मनातून प्रयत्न अधिक होतात आणि गती वाढत जाते.

५. सौ. सुप्रिया माथूर यांनी सांगितलेली अन्य सूत्रे

सौ. सुप्रिया माथूर

५ अ. अप्रामाणिकपणाला क्षमा नाही : एके दिवशी सौ. सुप्रियाताईने ‘अप्रामाणिकपणा’ या विषयावर एक सूत्र सांगितले. ती म्हणाली, ‘‘आढावा देणे, म्हणजे भगवंताचे व्यासपीठ आहे आणि तिथे भगवंताचे तत्त्व कार्यरत असते. आढावा म्हणजे यज्ञकुंड आहे. त्यात स्वभावदोष आणि अहं यांची आहुती दिली जाते. आपण आपल्या मनातील जेवढे प्रांजळपणाने सांगू, तेवढा आपल्याला आढाव्याचा लाभ अधिक होतो.

आपल्यात कोणताही गुण नसला, तरी चालेल; पण प्रामाणिकपणा असायला हवा. अप्रामाणिकपणाला क्षमा नाही.

५ आ. अहं वाढल्यास गुणांचे रूपांतर दुर्गुणात होते. गुण वापरले नाही, तर ते सुप्तावस्थेत रहातात.

५ इ. पाच घंटे साधनेसाठी प्रयत्न केले आणि उर्वरित पाच घंटे प्रयत्न केले नाहीत, तर साधना शून्य होते. पाच जणांना साहाय्य केले आणि दोन जणांविषयी मनात प्रतिक्रिया आली, तर साधना व्यय होते.

५ ई. अंतर्मुखतेमुळे गुणसंवर्धन होऊ शकते. गुणसंवर्धन आनंददायी आहे. तराजूत गुणांचे पारडे जड असेल, तरच स्वभावदोषांचे पारडे हलके होणार !

६. व्यष्टी साधनेचा आढावा दिल्याने होणारे लाभ

व्यष्टी साधनेचा आढावा दिल्यास अनेक लाभ होतात. स्वतःच्या चुकांवर मिळणार्‍या दृष्टीकोनांमुळे स्वतःतील अहंवर सातत्याने घाव होत असल्याने आपले मन योग्य दिशेकडे वळायला लागते. मनाला सतत लहरीपणाने वागण्याची सवय असते; मात्र प्रकियेमध्ये असल्याने प्रसंग घडत असतांना मन सतर्क असते. पूर्वी बुद्धी जेव्हा मनाला योग्य विचार देत असे, तेव्हा मन स्वतःच्या मतानुसार वागत असे; परंतु चिंतनसारणीनुसार केलेल्या प्रयत्नांमुळे मन ऐकण्याच्या स्थितीत येऊन बुद्धीचे ऐकू लागते.

७. ‘भावनाप्रधानता’ या तीव्र स्वभावदोषात पालट होणे

माझ्यात ‘भावनाप्रधानता’ हा पुष्कळ तीव्र स्वभावदोष होता. त्याची तीव्रता एवढी होती की, आढाव्यामध्ये मनाचा झालेला संघर्ष सांगतांना किंवा ‘माझ्याकडून प्रयत्न झाले नाही’, हे सांगतानाच मला रडू यायचे. मला वाटायचे, ‘हे रडू येणे, म्हणजे मला वाटणारी खंत आहे’; पण ताईने ‘हा माझ्यातील ‘भावनाप्रधानता’ हा स्वभावदोष आहे’, असे सांगितले. माझे मन कमकुवत असून भावनाप्रधानतेमुळे मी प्रसंगात अडकते आणि शिकण्याच्या स्थितीत रहात नाही. त्यावर तिने मला ‘अ ३’ पद्धतीप्रमाणे स्वयंसूचना घ्यायला सांगितली.

८. कृतज्ञता

अ. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे’, हा गुरुमाऊलीचा संकल्प आहे. केवळ गुरुकृपेमुळेच मला प्रकियेला यायची संधी मिळाली.

आ. गुरुमाऊली, तुम्हीच मला व्यष्टी साधना शिकवलीत आणि प्रयत्न करण्यासाठी साधकांचे साहाय्य उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे ‘व्यष्टीत तुम्ही, समष्टीतही तुम्ही आणि प्रयत्नांमध्येही तुम्हीच आहात’, असे मला वाटते. ‘आयुष्याचा उद्धार कसा करायचा आणि तुमचे अस्तित्व कसे अनुभवायचे’, हे तुम्हीच मला शिकवत आहात. गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळेच तुमचे अस्तित्व मला सर्वत्र आणि सतत अनुभवता येत आहे. हे गुरुमाऊली, हा अनुभव खरंच पुष्कळ सुंदर आहे. ‘या सर्वांसाठी कृतज्ञता कशी व्यक्त करायची ?’, हे मला समजत नाही. त्यासाठी एवढेच वाटते,

‘तुला आळवाया शब्द तरी कोणता रे ॥ धृ. ॥

कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य, चंद्र, तारे ।
कुठे, कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे ॥ १ ॥

बीज अंकुर ज्या ठायी, तिथे तुझा वास रे ।
तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास रे ॥
चराचरा रंगविशी, रंग तुझा कोणता रे’ ॥ २ ॥

इ. देवा, ‘आमच्यात पालट व्हावा’, ही आमच्यातही तळमळ नसते; पण तेवढी तळमळ आढावा घेणार्‍या साधकांमध्ये असते. ते न कंटाळता, कठोरपणे; परंतु तितक्याच प्रेमाने आमच्याकडून प्रक्रिया राबवून घेतात. त्याविषयी देवा, आम्ही कोटीशः कृतज्ञ आहोत.

ई. हे भगवंता, केवळ तुमच्या कृपेमुळेच या आयुष्यात ‘तुम्हाला अनुभवायचे’, हे एवढे सुंदर ध्येय मिळाले, जे तुम्हीच दिले आहे. त्याविषयी आम्ही तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.

उ. ‘हे गुरुराया, एवढे अमूल्य ज्ञान तुम्ही आम्हाला विनामूल्य उपलब्ध करून देत आहात. त्यामुळे आम्हाला त्याचे मूल्य नाही. बाहेरच्या जगात सहस्रोे रुपये देऊनही व्यक्तीमत्त्व विकासासाठी लागणारे ज्ञान मिळत नाही. जे काही मिळते, ते केवळ तात्त्विक ज्ञान असते. तुम्ही तर प्रत्यक्ष ही प्रकिया आमच्याकडून राबवून घेता. ‘स्वतःचे निरीक्षण, चिंतन आणि प्रयत्न कसे करायचे ?’, हे सर्व तुम्ही आम्हाला हाताला धरून शिकवत आहात. त्याविषयी आम्ही कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. समिधा संजय पालशेतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.२.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक