५२ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चंदननगर (पुणे) येथील चि. राधिका युवराज पवळे (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. राधिका पवळे एक आहे !

वैशाख कृष्ण पक्ष त्रयोदशी (८.६.२०२१) या दिवशी चि. राधिका युवराज पवळे हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला गर्भारपणात जाणवलेली सूत्रे आणि कुटुंबियांना राधिकाच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

चि. राधिका युवराज पवळे

चि. राधिका युवराज पवळे हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी 

१ अ १. गर्भधारणा झाल्यापासून पहाटे नामजप करायला उठणे : ‘मी साधनेला आरंभ करून १२ वर्षे झाली, तरी मला कधीही सकाळी लवकर उठून नामजप किंवा व्यष्टी साधना करायला जमायचे नाही; मात्र गर्भधारणा झाल्यानंतर मला पहाटे ३ – ३.३० वाजताच जाग यायची.

​‘अमावास्या, पौर्णिमा, दत्तजयंती या तिथींना गर्भाला त्रास होत असल्याने गर्भ मला नामजप करायला उठवत आहे अन् नामजप केल्यानंतर गर्भाला शांत वाटत आहे’, असे माझ्या लक्षात यायचे.

१ अ २. ‘बाळ समष्टी साधना करण्यासाठी येत आहे’, असे जाणवणे आणि संपूर्ण ९ मास सर्व प्रकारच्या सेवा करू शकणे : ‘बाळाने मागील जन्मात व्यष्टी साधना केली आहे आणि ते आता या जन्मात गुरुदेवांच्या चरणी समष्टी सेवा करण्यासाठी आले आहे’, असे मला वाटायचे. संपूर्ण ९ मास मी सर्व प्रकारच्या सेवा करू शकले. मला कुठलाही त्रास झाला नाही. मी दुचाकीवरून सेवेला जातांना मार्गात छोटा खड्डा आला किंवा कच्चा मार्ग असेल, तर मी गर्भाला ‘गुरुदेवांचा धावा कर’, असे सांगायचे. तेव्हा ‘गर्भही गुरुचरणांना धरून बसला आहे’, असे मला जाणवायचे.

१ अ ३. नृसिंहवाडी येथे गेल्यावर गर्भ बालबटूच्या रूपात दिसणे आणि तेव्हा ‘बाळ दत्तभक्त आहे’, असे वाटणे : तिसरा मास चालू असतांना आम्ही नृसिंहवाडीला गेलो होतो. तेथे मला गर्भ बालबटूच्या रूपात दिसला. तेव्हा ‘हे बाळ दत्तभक्त आहे आणि त्याने पूर्वी नृसिंहवाडीला स्वामींची सेवा केली आहे’, असे मला जाणवले. या मासात मला नृसिंहसरस्वती यांचे स्मरण होऊन ‘त्यांची भजने आणि नृसिंहवाडी येथे म्हटली जाणारी आरती ऐकावी’, असे वाटायचे. ‘अपराधाची क्षमा आता केली पाहिजे…’ ही प्रार्थना ऐकतांना ‘गर्भ आतापर्यंत झालेल्या चुकांसाठी श्री गुरूंची क्षमा मागत आहे’, असे मला जाणवायचे. त्या वेळी मला शांतीची अनुभूती यायची.

१ आ. ४ ते ६ मास

१ आ १.श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘बाळ तुमची साधना करवून घेण्यासाठी आले आहे’, असे सांगणे : एकदा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलतांना मी त्यांना ‘गर्भधारणा झाली आहे’, असे सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘हे बाळ सात्त्विक असून त्याने साधनेला पूरक असे आई-वडील स्वतः निवडले आहेत. ते तुम्हा तिघांची (आई, वडील आणि आजी (आईची आई) यांची) साधना करवून घेण्यासाठी आले आहे.’’

१ आ २. अनुभूती

१ आ २ अ. आधुनिक वैद्यांनी ‘सोनोग्राफी’ केल्यावर ‘बाळाच्या हृदयाजवळ छोटी गाठ आहे’, असे सांगितल्यावर ताण येणे आणि देवाला ‘तुझ्या इच्छेने होऊ दे’, अशी प्रार्थना करणे : आधुनिक वैद्यांनी चौथ्या मासात ‘सोनोग्राफी’ केली. त्यात ‘बाळाच्या हृदयाजवळ छोटी गाठ आहे’, असे निदान झाले. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘अहवाल पाहून ‘गर्भपात करणे’ हाच उपाय आहे, तरीही तुम्हाला आणखी एकदा तपासायचे असल्यास बाळाच्या हृदयाची विशेष तपासणी करूया.’’ आरंभी ‘सोनोग्राफी’ करायला मी एकटीच गेले होते. या आधी २ वेळा गर्भपात झाल्यामुळे तो वैद्यकीय अहवाल पाहून मला ताण आला. तेव्हा मी देवाला ‘तुझ्या इच्छेने होऊ दे’, अशी प्रार्थना केली.

१ आ २ आ. आधुनिक वैद्यांकडे तपासणीसाठी जाण्याच्या दिवशीच एका धर्मप्रेमींना भेटायचे नियोजन असणे आणि ‘या सेवेतून गुरुदेवच बाळाला चैतन्य देतील’, असा विचार करून सेवेला जाणे : त्याच दिवशी एका धर्मप्रेमींना भेटायचे नियोजन केले होते. त्यांनी त्यांच्या घरच्या एका कार्यक्रमाला मला आणि यजमानांना आग्रहाने बोलावले होते. ते नवीन जोडले असल्याने त्यांच्याकडे जाणे रहित करता येत नव्हते. त्या वेळी ‘या सेवेतून गुरुदेवच बाळाला आणि आम्हाला चैतन्य देतील’, असे आम्हा उभयंतांच्या मनात आले. नंतर ‘सोनोग्राफी’साठी भ्रमणभाष केल्यावर तेथील आधुनिक वैद्यांनी ‘तुम्ही ११ वाजेपर्यंत आलात, तरीही चालेल’, असे सांगितले.

१ आ ३ इ. सेवा पूर्ण करून पुन्हा ‘सोनोग्राफी’ केल्यावर काही अडचण नसल्याचे समजणे आणि गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटणे : रात्री ठरल्यानुसार सेवा करून आम्ही आधुनिक वैद्यांकडे गेलो. त्यांनी बाळाच्या हृदयाची तपासणी करून ‘काही अडचण नाही. ती गाठ नसून तो हृदयातीलच भाग आहे’, असे सांगितले. तेव्हा ‘गुरुमाऊलींनी आम्हाला फार मोठ्या संकटातून सोडवले आणि बाळाचे मोठे प्रारब्ध एका दिवसातच संपवले’, असे आम्हाला जाणवले.

१ इ. ९ वा मास

१ इ १. देवता आणि संत यांचे दर्शन होणे : ९ वा मास लागल्यानंतर मला विविध देवतांचे दर्शन व्हायचे. ‘कधी मी महाकालेश्‍वराच्या मंदिरात पूजा करत आहे’, तर ‘कधी कुलदेवीच्या मंदिरात, कधी नृसिंहवाडीला आहे, तर कधी परात्पर गुरु पांडे महाराज घरी आले आहेत’, असे मला जाणवायचे.

१ इ २. याच मासात मला एक सेवा दायित्व घेऊन करता आली आणि तिच्यातून आनंदही मिळाला. या संपूर्ण मासात गुरुदेवांच्या कृपेने मला कधीही ताण आला नाही.

१ ई. गरोदरपणात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. आमच्या घरातील तुळस कोमेजली होती; परंतु मला गर्भधारणर झाल्यावर ती पुन्हा डवरली आणि घरातील पांढर्‍या सुवासिक फुलाच्या रोपाला पुष्कळ फुले येऊ लागली.

२. घरासमोरील अंगणात नामजप करत असतांना मला समोरील झाडे पाहून वनवासातील सीतेचे स्मरण व्हायचे आणि ‘मी एकटी नसून गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, असे तीव्रतेने जाणवायचे. त्या वेळी नामजप करतांना मला पुष्कळ आनंद व्हायचा.

३.​७ व्या मासात माझे ओटीभरण झाले नाही. तेव्हा ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या माझी ओटी भरत आहेत’, असा मी भाव ठेवला. तेव्हा ‘त्यांनी मला ओटीत साडी दिली’, असे जाणवले.

२. प्रसुती आणि त्या वेळी आलेल्या अनुभूती

अ. ९ मास पूर्ण झाल्यावर मी प्रसुतीसाठी रुग्णालयात भरती झाले. तेथे अन्य महिलांच्या समवेत त्यांच्या घरातील सदस्य होते; मात्र माझ्या समवेत आमच्या घरातील कुणीच नव्हते. तेव्हा सूक्ष्मातून ‘माझे गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ हे माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवत होते.

आ. १९.५.२०२० या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत आधुनिक वैद्य नैसर्गिक प्रसुती होण्याची वाट पहात होते; पण काही अडचणींमुळे माझी नैसर्गिकरित्या प्रसुती होत नव्हती. माझा त्रास वाढू लागल्यावर मी परात्पर गुरुदेवांना शरण जाऊन ‘माझी इच्छा नको, आपल्या इच्छेने होऊ दे’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेतला.

इ. प्रसुतीसाठी शस्त्रकर्म होतांना मला विराट रूपातील गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ दिसले. बाळाचा जन्म झाल्यावर मला कृतज्ञतेने भावाश्रू आले आणि मी बाळाला गुरुदेवांच्या चरणांवर अर्पण केले.

ई. ‘बाळाच्या जन्मानंतर हे बाळ देवाचेच आहे आणि देवच बाळाची सर्व काळजी घेत आहे’, असे मला जाणवले. देवाने साधकांच्या माध्यमातून मला पुष्कळ साहाय्य केले, उदा. बाळाला लागणारे कपडे, गरम पाणी, इत्यादी. या काळात आमच्याजवळ घरातले कुणीही नव्हते; मात्र गुरुमाऊलीच्या कृपेने साधक आणि सौ. मनीषाताई यांनी मोलाचा आधार दिला.’
– सौ. जानकी युवराज पवळे (आई), चंदननगर, पुणे.

३. जन्म ते ३ मास.

अ. ‘बाळाच्या जन्मानंतर तिसर्‍याच दिवशी त्याला सलाईन लावावे लागले, तरी ते रडले नाही. ते सलाईन लावलेल्या हाताची पुष्कळ सांभाळून हालचाल करायचे. हे पाहून आम्हाला आश्‍चर्य वाटले. लस देण्याच्या वेळीही बाळ रडले नाही.

आ. बाळाच्या जन्मानंतर १२ दिवसांनी कुंडीतील रोपे आणि अंगणातील झाडे ‘आम्हालाही बाळ दाखव’, असे म्हणत आहेत’, असे मला जाणवले. मी बाळाला दाखवल्यावर ‘त्यांना आनंद झाला’, असेही मला जाणवले.

इ. बाळाच्या जन्मानंतर १२ व्या दिवशी नामकरण विधीच्या वेळी माझ्या मनात ‘राधिका’ हे नाव आले होते; मात्र ‘सद्गुरु किंवा संत जे नाव सुचवतील, तेच आपण ठेवूया’, असा विचार माझ्या मनात आला. प्रत्यक्षात संतांनीही तेच नाव सुचवले.’
– सौ. जानकी युवराज पवळे (आई), चंदननगर, पुणे.

ई. ‘दुसर्‍या-तिसर्‍या मासात मी तिला ‘ॐ’ म्हणायला शिकवल्यावर ती ‘ॐ’ म्हणायची. त्या वेळी तिचा उच्चार स्पष्ट असायचा.

उ. बाहेर जात असतांना ‘सिग्नल’साठी थांबल्यानंतर लोक तिच्याकडे पाहून हसायचे आणि तिच्याशी बोलायचे. तीही त्यांना प्रतिसाद द्यायची. तेव्हा दुसर्‍या एका संप्रदायाच्या माध्यमातून साधना करणारी महिला म्हणाली, ‘‘साधनेमुळे आमची आध्यात्मिक ओळख आहे.’’
– श्री. युवराज पवळे (वडील), चंदननगर, पुणे.

४. वय ४ ते ६ मास

अ. ‘राधिका जन्मापासून हातांची मध्यमा आणि अनामिका ही दोन बोटे तळव्याच्या मध्यभागी टेकवायची किंवा ज्ञानमुद्रा करायची.

आ. राधिका चार मासांची असतांना एकदा ती झोक्यावरून पडली होती; पण भगवंतानेच तिची काळजी घेतली. ती खेळतांना पडली, तर ती आपले डोके आपोआप सावरते, जणू तिथे श्रीकृष्णच तिला झेलतो.

इ. मी मंत्रजप किंवा ‘श्री विष्णवे नमः ।’ अन् ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हा नामजप करतांना ती आनंदाने हुंकार देऊन प्रतिसाद द्यायची.

ई. ती ५ मासांची असतांना मी आकाशकंदील, पंचांग, उत्पादनांचा साठा इत्यादींच्या संदर्भातील सेवा करू शकले. मी सेवा करत असतांना ती रडत नाही. एकदा एका सेवेसाठी आम्हाला दूरवरचा प्रवास करावा लागला. तेव्हाही ती रडली नाही.’
– सौ. जानकी युवराज पवळे

५. वय ७ मास ते १ वर्ष

५ अ. ‘ती घरातील सर्वांना हसवते आणि आनंदी ठेवायचा प्रयत्न करते.’ – श्री. युवराज पवळे

५ आ. ‘तिची आई कुठे सेवेला गेल्यावर ती दिवसभर आजीकडे शांत राहते आणि आजीशी खेळते.’ – सौ. सुरेखा काटे (मावशी), सांगवी, पुणे.

५ इ. सात्त्विकतेची आवड

१. ‘काही साधकांना तिला पहायचे होते. तेव्हा मी भ्रमणभाषवर साधकांना ‘व्हिडिओ कॉल’ केला. तेव्हा ‘साधकांना पाहून तिला पुष्कळ आनंद होत आहे’, असे लक्षात आले.

२. गुरुवारी भाववृद्धी सत्संगाच्या वेळी ती झोपेतून उठते आणि सत्संग ऐकून पुन्हा झोपते.

३. अन्य सत्संगात सद्गुरु किंवा संत यांचा आवाज ऐकल्यावर ती लगेच उठून प्रार्थना करते. आम्ही तिला हात जोडून प्रार्थना करायला शिकवले नाही. ती स्वतः आमचे पाहून शिकली. प्रार्थना ऐकायला आली की, ती लगेच खाली वाकून हात जोडते. एकदा ती ११ मासांची असतांना आम्ही बाहेर गेलो होतो. तिला परत आल्यावर रात्री १२ वाजता झोपवले. नंतर मी भ्रमणभाषवर नामजप लावला. तेव्हा ती लगेच झोपेतून उठली आणि दोन्ही पायांवर बसून तिने प्रार्थनेच्या मुद्रेत हात जोडले.’
– सौ. जानकी युवराज पवळे

४. ‘एकदा मी तिला घरातील वास्तूछताच्या सर्व नामपट्ट्या वाचून दाखवल्या. त्यानंतर प्रतिदिन ती स्वतः नामपट्टीकडे बोट दाखवते. तिला त्या नामपट्ट्या वाचून दाखवल्यावर आनंद होतो.

५. आम्ही परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सवाचा ऑनलाईन सोहळा भ्रमणभाषवर बघत होतो. ती भ्रमणभाषच्या समोरून जायची, त्या वेळी त्याकडे पाहून हात जोडायची.

६. घरात कुणी उपाय करत असेल, तर ती तसेच उपाय करण्याचा प्रयत्न करते, उदा. दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा उदबत्ती यांनी आवरण काढते. कापूर हातात दिल्यावर त्याचा वास घेते.’
– श्री. युवराज पवळे

७. ‘तिला ‘सनातन प्रभात’ हातात धरायला आवडतो.’ – सौ. सुरेखा काटे

८. ‘एकदा आम्ही सगळे पुण्यातील वाडे बोल्हाई येथील बोल्हाईदेवीच्या मंदिरात गेल्यावर तिने स्वतःहून देवीला साष्टांग दंडवत घातला. नारायणपूरच्या नारायणेश्‍वरला गेल्यावर तिने स्वतःहून देवाला फूल अर्पण केले आणि चरणांवरचा प्रसाद खाल्ला.

९. तिला भ्रमणभाषमधील गुरुदेवांचे चित्र दाखवल्यावर ती ते लगेचच ओळखते. ती त्यांच्याकडे बघत रहाते. एकदा तिची आई भ्रमणसंगणकावर सेवा करत असतांना त्यावर असलेले गुरुदेवांचे चित्र पाहून ती त्यांच्याशी बोलू लागली.’

– कु. वेदिका काटे (मावस बहीण), सांगवी, पुणे.

६. राधिकाच्या जन्मानंतर जाणवलेले पालट

अ. ‘माझा आध्यात्मिक त्रास न्यून झाला. माझ्या मनाची स्थिरता वाढली.

आ. माझी कार्यक्षमता वाढून समष्टी सेवा आणि साधना करण्याची ओढ वाढली.

इ. यजमानांना ताण येणे न्यून झाले.’

– सौ. जानकी युवराज पवळे

७. स्वभावदोष : ‘मनासारखे न झाल्यास चिडचिड करणे’ – श्री. युवराज पवळे

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक