‘साधकांची पुढील टप्प्याची साधना व्हावी’, अशी तीव्र तळमळ असणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

‘संतांच्या सहवासाविषयी एक भजन आहे ‘संत संगतीने थोर लाभ झाला । मोह निरसला मायादिक ॥’ अशीच काहीशी अनुभूती सोलापूर सेवाकेंद्रातील साधकांनी घेतली. कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी लागू करण्यात आली. या कालावधीत सोलापूर सेवाकेंद्रातील साधकांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्या वेळी आम्हाला सद्गुरु स्वातीताईंतील विविध गुणांचे दर्शन झाले.

(सद्गुरु) कु. स्वाती खाडये

१. ‘समाजातील व्यक्तींनी साधना करावी’, अशी तळमळ

१ अ. दळणवळण बंदीच्या कालावधीत वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी यांच्यासाठी सत्संग आणि प्रवचने घेतल्याने ते साधना करू लागणे अन् त्यांचा आत्मविश्‍वास वाढणे : दळणवळण बंदीमुळे बाहेर जाणे, प्रसार करणे बंद झाले होते. तेव्हा सद्गुरु स्वातीताईंनी कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ सत्संग अन् प्रवचने घेण्यास प्रारंभ केला. त्यांनी साधकांचे कुटुंबीय, शिक्षक, आधुनिक वैद्य, अधिवक्ता, अभियंता, युवा साधक यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ प्रवचने आणि सत्संग घेऊन त्यांना साधनाविषयक मार्गदर्शन केले. दळणवळण बंदीच्या भीषण काळात आत्मविश्‍वास गमावत चाललेल्या लोकांना सद्गुरु स्वातीताईंच्या साधनाविषयक मार्गदर्शनामुळे पुष्कळ आधार वाटत होता. भविष्यातील विविध चिंतांनी त्रस्त असलेल्या समाजातील व्यक्तींना त्यांनी साधना सांगून दिशा दिली. त्यामुळे अनेक जण साधना करू लागले आणि त्यांचा आत्मविश्‍वास वाढला.

१ आ. ‘साधनेचा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा’, अशी तळमळ असणे आणि अनेक जणांनी साधनेला प्रारंभ करणे : सद्गुरु स्वातीताईंमध्ये ‘तीव्र आपत्काळाला प्रारंभ होण्यापूर्वी अधिकाधिक लोकांपर्यंत साधनेचा विषय पोचावा आणि त्यांनी साधना चालू करावी’, अशी तीव्र तळमळ आहे. त्यांनी घेतलेल्या ‘ऑनलाईन’ प्रवचनांमुळे अनेक वाचक आणि साधकांचे कुटुंबीय यांच्यासाठी नियमित साधना सत्संग चालू झाले. आता या साधना सत्संगातील अनेक जण साधना करू लागले आहेत. सद्गुरु स्वातीताईंनी साधकांच्या साधना न करणार्‍या कुटुंबियांना साधनेचे महत्त्व सांगितले.

२. साधकांना प्रेम देऊन त्यांना घडवणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

२ अ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सोलापूर सेवाकेंद्रात सण साजरे केल्याने साधकांना घरची आठवण न येणे : या कालावधीत विविध मोठे सण होते. साधकांना सणाच्या कालावधीत घरी जाता येत नसल्याने ‘त्यांंना घरची आठवण येऊ नये’, यासाठी सद्गुरु स्वातीताई देवतांची सामूहिक आरती करणे, देवतांची भजने लावणे, साधकांसाठी गोड पदार्थ बनवणे, असे करायच्या. त्यामुळे सेवाकेंद्रातील वातावरण उत्साही होऊन साधकांना आध्यात्मिक स्तरावर सण साजरा करता आल्याचा आनंद घेता आला. रक्षाबंधनाच्या दिवशी सद्गुरु स्वातीताईंनी सर्व पुरुष साधकांना खाऊ दिला आणि ओवाळले. ‘देवीस्वरूप सद्गुरु स्वातीताई ओवाळत आहेत’, असे वाटून सर्वांच्याच डोळ्यांत भावाश्रू आले.

२ आ. सद्गुरु स्वातीताईंमुळे साधकांवर नामजपादी उपाय करण्याचे गांभीर्य बिंबवणे : सद्गुरु स्वातीताईंना पाठदुखीचा त्रास असल्याने अधिक वेळ एका जागी बसून नामजप करता येत नाही, तरीही त्या चालत नामजप करतात. सद्गुरु स्वातीताई साधकांच्या समवेतही नामजप आणि मंत्रजप करतात. त्यामुळे साधकांचेही व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले आणि त्यांचे नियमितपणे नामजपादी उपाय होऊ लागले.

२ इ. साधकांना सत्संगातून त्यांच्या स्वभावदोषांची प्रेमाने जाणीव करून त्यांच्या निर्मूलनासाठी दिशा देणे : ‘साधकांमध्ये पालट व्हावा आणि त्यांची प्रगती व्हावी’, असा विचार तीव्र असल्याने सद्गुरु स्वातीताईंनी सत्संगांतून साधकांना त्यांच्या स्वभावदोषांची प्रेमाने जाणीव करून दिली. त्यांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी दिशा दिली. या कालावधीत त्यांनी साधकांना ‘प्रत्येक सेवा माझी आहे’, असा भाव ठेवून सेवा करायला शिकवले.

२ ई. अनेक मास जिल्ह्यातील साधकांना भेटता न आल्याने खंत वाटणे आणि साधकांना ‘ऑनलाईन’ सत्संगातून साधनेविषयी मार्गदर्शन करणे : सद्गुरु स्वातीताईंच्या मनात दळणवळण बंदीमुळे जिल्ह्यातील साधकांना अनेक मास भेटता न आल्याची खंत होती. त्यामुळे त्यांनी साधकांना ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले. त्यांनी साधकांचे ‘परिवर्तन सत्संग’ चालू केले. या सत्संगांच्या माध्यमातून साधकांचे स्वतःविषयीचे सखोल चिंतन होऊन त्यांनी मनातील सर्व विचार सांगितल्याने त्यांना हलकेपणा जाणवू लागला. सद्गुरु स्वातीताई प्रतिदिन दायित्व असणार्‍या साधकांच्या व्यष्टी साधनेचे आढावे घेतात. त्या प्रतिदिन दायित्व असणार्‍या साधकांना उत्साहाने विविध संतांच्या भक्तीची उदाहरणे देऊन साधनेविषयी मार्गदर्शन करतात.

३. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘सद्गुरु स्वातीताईंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार साधना करून आम्हाला लवकर गुरुचरणांपर्यंत पोचता येऊ दे’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे. ‘विविध गुणांनी युक्त आणि स्वतःच्या कृतीतून साधकांना घडवणार्‍या सद्गुरु स्वातीताईंचा सहवास आम्हा साधकांना लाभणे’, हे केवळ आमचे भाग्यच ! ‘आम्हाला सद्गुरु स्वातीताईंचा सहवास लाभला आणि अनेक सूत्रे शिकता आली’, याविषयी आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहोत.’

– सोलापूर सेवाकेंद्रातील साधक

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक