कोल्हापूर येथील पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती विसर्जित !

प्रशासक म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती

मंदिरे ही चैतन्याचा स्रोत असल्याने तेथील सात्त्विकता टिकवून ठेवण्यासाठी ती कुठल्याही राजकीय पक्षांच्या किंवा प्रशासनाच्या नव्हे, तर भक्तांच्याच कह्यात हवीत !

कोल्हापूर, ८ एप्रिल – येथील पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती विसर्जित करण्याचा आदेश राज्यशासनाच्या विधी आणि न्याय विभागाने ८ एप्रिल या दिवशी काढला. या समितीवर आता प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आदेशामुळे समितीचे अध्यक्ष महेश जाधव (भाजप) यांच्यासह ६ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांसह ३ सहस्र ४२ मंदिरांचे नियंत्रण या समितीकडे आहे. यात प्रामुख्याने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा मंदिर या मंदिरांचा समावेश आहे.

राज्यात वर्ष २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर १६ ऑगस्ट २०१७ या दिवशी राज्यशासनाने समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव यांची नियुक्ती केली. या समितीत कोषाध्यक्ष म्हणून सौ. वैशाली राजेश क्षीरसागर, तर सदस्य म्हणून शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव, राजाराम गरुड आणि चारुदत्त देसाई यांची नियुक्ती करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद जाण्याची चर्चा !

‘सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे या समितीचे अध्यक्षपद जाणार आहे’, अशी चर्चा आहे.