गोवर्‍यांवर गायीच्या तुपाद्वारे हवन केल्यावर १२ घंटे घर संक्रमणमुक्त होते ! – मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर

भारतियांना धर्मशिक्षण नसल्याने आणि विज्ञानाचा स्तोम माजवण्यात येत असल्याने हिंदूंकडून अशा प्रकारच्या कृती केल्या जात नाहीत. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक कृतींमागील विज्ञान सांगून त्याचा लाभ त्यांना समजला की, ते आवडीने या कृती करतील. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी प्रयत्न केले पाहिजेत !

इंदूर (मध्यप्रदेश) – सूर्योदय आणि सूर्यास्त यांवेळी गोवर्‍यांवर अक्षता मिसळलेल्या गायीच्या तुपाद्वारे २ वेळा आहुत्या दिल्यावर घर संक्रमणमुक्त (सॅनिटाईज) होते, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर यांनी येथे केले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी वैदिक जीवन पद्धतीनुसार आचरण करण्याचेही आवाहन त्यांनी केले.

उषा ठाकूर पुढे म्हणाल्या की, हे विज्ञान आहे. जेव्हा भगवान सूर्य यांचा उदय किंवा अस्त होत असतो, तेव्हा पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्ती २० टक्के वाढते. सायंकाळी वायूमंडळामध्ये ऑक्सिजनची कमतरता असते. त्यामुळे सायंकाळीही अशा प्रकारची आहुती दिली की, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होते.