पहिल्याच दिवशी मास्क न घालणार्‍या लोकलच्या ५१५ प्रवाशांवर कारवाई

मुंबई – सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास करण्यास अनुमती दिल्यानंतर पहिल्याच दिवशी मास्क न घालणार्‍या लोकलच्या ५१५ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ३९६ प्रवाशांना विनातिकीट प्रवास करतांना पकडण्यात आले आहे.

१. पहिल्याच दिवशी एकूण ७ लाख १९ सहस्र ८४७ प्रवाशांची भर पडली. दळणवळण बंदीच्या काळात पास संपलेल्या २२ सहस्र ७५६ प्रवाशांना मुदतवाढ देण्यात आली.

२. विना मास्क प्रवास करणार्‍या मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवरील एकूण ५१२ प्रवाशांवर महापालिकेच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.

३. प्रतिव्यक्ती २०० रुपये याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवास करणार्‍या ३९६ प्रवाशांवर पश्‍चिम रेल्वेने कारवाई करत त्यांच्याकडून १ लक्ष ४ सहस्र २७८ रुपयांचा दंड वसूल केला.

कोरोनापूर्व काळात मध्य आणि पश्‍चिम लोकलमधून प्रतिदिन ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. दळणवळण बंदीच्या काळात अत्यावश्यक प्रवाशांना लोकलमुभा मिळाल्यानंतर प्रतिदिनच्या प्रवासी संख्येने १९ लाखांचा आकडा गाठला होता. यामुळे सध्या प्रवासी संख्या २६ लाखांपर्यंत पोचली, असा अंदाज तिकीट विक्रीतून व्यक्त करण्यात आला आहे.