मराठी भाषेमध्ये भारतीय सैन्याच्या पराक्रमाची कथा सांगणारी साहित्यनिर्मिती काही प्रमाणात झाली आहे; मात्र त्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा फारच न्यून आहे. निवडक अशा युद्धाच्या कथाच पुढे आलेल्या आहेत. त्यातील अनेक पुस्तके तर प्रत्यक्ष सैनिकांनीच लिहिलेली आहेत. त्यामुळे संशोधन करून नवसाहित्य निर्मितीसाठी या क्षेत्रात बराच वाव आहे. लष्कराच्या पराक्रमाचे वर्णन करणार्या साहित्यकृतींचा लेखाच्या उत्तरार्धात घेतलेला आढावा…
(उत्तरार्ध)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/892132.html
८. स्वातंत्र्यपूर्व काळातील सहस्रो वर्षांपासून ब्रिटीश येईपर्यंतच्या विविध युद्धपद्धतींचा अभ्यास होणे शेष
पहिल्या आणि दुसर्या महायुद्धांमध्ये २५ ते ३५ लाख भारतीय सैनिकांनी भाग घेतला अन् त्यांनी युरोपच्या वेगवेगळ्या रणभूमींवर महापराक्रम गाजवले. या विषयावर फारसे लिखाण झालेले नाही; मात्र भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या ‘रेजिमेंट्स’ त्यांच्या इतिहासामध्ये या युद्धांचे वर्णन करतात. उदाहरणार्थ ‘मराठा रेजिमेंट’ने दुसर्या युद्धात गाजवलेला महापराक्रम हा त्यांच्या ‘रेजिमेंटल हिस्टरी’मध्ये (मराठा रेजिमेंटच्या इतिहासात) लिहिण्यात आलेला आहे.

भारतीय उपखंडामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील सहस्रो वर्षांमध्ये, शेकडो युद्धे लढली गेली. अनेक परकियांनी भारतावर आक्रमण केले. या काळात वापरलेल्या भारतीय युद्धपद्धतींचा किंवा शत्रूंच्या युद्धपद्धतींचा पुरेसा अभ्यास केला गेला नाही.
आता भारतीय सैन्य भारतीय उपखंडामध्ये लढल्या गेलेल्या आजवरच्या सगळ्या युद्धांचा अभ्यास करून त्यांचे विश्लेषण करत आहे, तसेच येणार्या काळामध्ये या डावपेचांचा कसा वापर करता येईल ? यावर विचार करत आहे. भारतियांनी हरलेल्या किंवा जिंकलेल्या युद्धांचा अभ्यास केला जात आहे, हे महत्त्वाचे आहे; कारण प्रत्येक विजयातून किंवा पराभवातून आपल्याला काहीतरी शिकता येते.
आता मौर्य, पल्लव, गुप्त यांच्यापासून ब्रिटीश येईपर्यंतच्या काळातील युद्धपद्धतींचा अभ्यास केला जात आहे. भारतीय लष्कर त्यांच्या ‘प्रकल्प उद्भव’ अंतर्गत भारताचा समृद्ध लष्करी वारसा, महाभारतातील लढाया, वेद, पुराणे, उपनिषदे आणि अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचाही अभ्यास करत आहे.
९. या साहित्यावर मराठीत नवसाहित्यनिर्मिती होऊ शकते !
वर्ष १९४७ नंतर भारत हा पाकिस्तान आणि चीन यांच्यासह ४ युद्धे लढला. वर्ष १९४७-४८ च्या ‘भारत-पाकिस्तान युद्धा’वर मराठी भाषेत प्रकाशित झालेले मराठी साहित्य हे पुष्कळ नाही. वर्ष १९४७-४८ चे भारत-पाकिस्तान युद्ध हा भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या टप्पा होता. या युद्धामुळे भारताच्या सुरक्षेवर मोठा परिणाम झाला. या युद्धावर मराठीमध्ये नवसाहित्य निर्मिती होणे आवश्यक आहे. यातूनच आपल्याला या संघर्षाचे विविध पैलू समजू शकतात.
वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धावर मराठी साहित्यनिर्मिती झाली आहे. भारत-चीन युद्ध हे भारताच्या ईशान्य आणि उत्तर सीमा या भागांत २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर १९६२ या कालावधीत झाले. त्यात भारतीय नेतृत्वाचा पराभव झाला. हा पराभव अनेक कारणांनी भारतीय लष्कराला धडा देणारा ठरला. या विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यातील काही पुढीलप्रमाणे आहेत –
अ. जनरल पित्रे (निवृत्त) यांची ‘न सांगण्यासारखी गोष्ट : ६२ च्या पराभवाची शोकांतिका’.
आ. सतीश अंभईकर लिखित आणि सुधाताई नाटेकर यांची संकल्पना असलेले ‘शूरा मी वंदिले’ ही शौर्यगाथा.
इ. वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेला माझा मावस भाऊ लेफ्टनंट विष्णु आठल्ये याचीही शौर्यगाथा आताच आम्ही प्रकाशित केली आहे.
ई. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’ हे माझे पुस्तकसुद्धा वर्ष २०१२ मध्ये प्रकाशित झाले होते.
१०. वर्ष १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धावरचे मराठी साहित्य
या विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यामधील काही पुस्तकांमधून आपण या संघर्षाचे विविध पैलू समजून घेऊ शकतो.
अ. भारत-पाकिस्तान युद्ध १९६५ : ‘एका सामान्य सैनिकाची कहाणी’ हे पुस्तक एका भारतीय सैनिकाच्या दृष्टीकोनातून युद्धाचे अनुभव सांगते.
आ. ‘ताश्कंद करार : १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा परिणाम’ हे सुनील धानवते यांचे पुस्तक ताश्कंद कराराची पार्श्वभूमी, वाटाघाटी आणि त्याच्या परिणामांचे विश्लेषण करते.
इ. ‘भारत आणि पाकिस्तान : १९४७ ते १९६५ पर्यंतचे संबंध’ हे विजय केशव यांचे पुस्तक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांची ऐतिहासिक पार्श्वभूमी अन् वर्ष १९६५ च्या युद्धाचा त्याच्यावर कसा परिणाम झाला, याचे सखोल विश्लेषण करते.
ई. वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावरील मराठी साहित्य : या युद्धावरही बरेच मराठी साहित्य प्रकाशित झाले आहे. या साहित्याच्या माध्यमातूनच संघर्षाचे विविध पैलू समजून घेण्यास साहाय्य होते. यातील काही पुस्तके, वरिष्ठ भारतीय सैन्य अधिकार्यांच्या दृष्टीकोनातून युद्धाचे वर्णन करतात. काही पुस्तके भारतीय सैनिकांच्या दृष्टीकोनातून युद्धाचे अनुभव सांगतात. यात रणगाडे, लढाया, सैनिकांचे धैर्य, बलीदान आणि युद्धाचा मानसिक परिणाम यांचेही विस्तृत वर्णन करण्यात आले आहे.
या पारंपरिक युद्धामध्ये भारताचे सैन्य हे चीन, पाकिस्तान यांच्या सैन्याशी लढत होते. या युद्धांशी देशातील जनतेचा फारसा संबंध नव्हता. पारंपरिक युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचा नेहमीच पराभव केला.
११. ‘ऑपरेशन काराकोरम’मध्ये पाकिस्तानचा पराभव
खालिस्तानी आतंकवादाचे कंबरडे मोडले गेले आहे; मात्र त्यापेक्षा भयानक अफू, गांजा, चरस यांचा जिहाद, म्हणजेच ‘नार्को टेररिझम’ पंजाब आणि सीमावर्ती भागांत चालू आहे. त्या माध्यमातून तरुणांना लक्ष्य केले जात आहे. या युवकांना जर वाचवायचे असेल, तर सीमा सुरक्षा दलाला सीमा बंद कराव्या लागतील. राजकीय पक्ष, पोलीस, सामाजिक संस्था आणि समाज यांना अफू, गांजा, चरस, आतंकवादाच्या विरोधात एकत्रित लढाई लढावी लागेल.
काश्मीरमध्ये आतंकवादाचे कंबरडे मोडण्यात आले आहे. काश्मीरच्या खोर्यात आज १५० आतंकवादी असावेत. भारतीय सैन्य अविरत मोहिमा राबवून त्यांना मारत असते; मात्र,पाकिस्तान भारतात आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे; म्हणून आतंकवादाच्या लढाईकरता भारतीय सैन्याला अजून रक्त सांडण्याकरता सज्ज रहावे लागेल; मात्र भारताच्या अन्य भागांत आतंकवादी आक्रमणे करण्यापासून थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे. असे असले, तरी समुद्रातील तस्करी, बेकायदेशीर व्यापार आणि बांगलादेशी घुसखोरी चालूच आहे. येत्या काळात नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलीस यांना डोळ्यांत तेल घालून सागरी सुरक्षा अधिक बळकट करावी लागेल.
१२. ‘ऑपरेशन पोलो’ आणि ‘ऑपरेशन विजय’ यांवर पुस्तके प्रकाशित होणे आवश्यक !
भारताच्या भूसीमांच्या सुरक्षेविना सागरी सुरक्षा, महासागरी सुरक्षा, आकाश किंवा अवकाशाची सुरक्षा या विषयांवर कुठलीच पुस्तके नाहीत. या विषयांवर अभ्यास करून मराठी वाचकांकरता पुस्तके लिहिणे आवश्यक आहे. भारताच्या सागरी सुरक्षेवर लिहिलेली माझी मराठीमधील पुस्तके एप्रिल २०२४ मध्ये प्रकाशित झाली.
भारतात नक्षलवाद, साम्यवाद, माओवाद संपवण्याकरता अर्धसैनिक दले आणि पोलिसांना दंडकारण्य, अबुजमाड जंगल अन् सरंदा जंगलांमध्ये घुसून माओवाद्यांचे प्रशिक्षण आणि इतर अड्डे आक्रमक कारवाई करूनच उद्ध्वस्त करावे लागतील.
काश्मीर माओवाद, आतंकवाद या विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यावर माझी नक्षलवादावरची २ पुस्तके वर्ष २०१२ आणि सुधारित आवृत्ती वर्ष २०१९ मध्ये प्रकाशित झाली. ‘आव्हान काश्मीरमधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तकसुद्धा मराठीत प्रकाशित झाले आहे. वर्ष १९६१ चे ‘गोवा मुक्ती आंदोलन’, वर्ष १९४८ चे ‘हैदराबाद मुक्तीसंग्राम’ यांवर बरेच मराठी साहित्य प्रकाशित झालेले आहे; मात्र हैदराबादच्या सैन्याने लढलेले ‘ऑपरेशन पोलो’, गोवामुक्ती संग्रामामध्ये सैन्याने वर्ष १९६१ मध्ये लढलेले ‘ऑपरेशन विजय’ प्रकाश झोतात नाहीत. मराठीमध्ये जर यावर पुस्तके प्रकाशित झाली, तर अधिक चांगले होईल.
(समाप्त)
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (११.३.२०२५)