नवी देहली – एखाद्या व्यक्तीला ‘मियां-तियां’ आणि ‘पाकिस्तानी’ म्हणणे चुकीचे ठरेल; परंतु त्याच्या धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा मानला जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करत एका व्यक्तीला भारतीय दंड संहितेच्या कलम २९८ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे इत्यादी) अंतर्गत आरोपातून मुक्त केले. न्यायालयाने म्हटले की, दिलेले विधान निःसंशयपणे चुकीचे आहे. तथापि यामुळे याचिकाकर्त्याच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत.
१. झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वाेच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला. हे प्रकरण चास येथील उपविभागीय कार्यालयात उर्दू अनुवादक आणि कार्यकारी लिपिक (माहितीचा अधिकार) यांनी नोंदवलेल्या गुन्ह्याशी संबंधित होते.
२. तक्रारदाराने आरोप केला होता की, जेव्हा तो माहिती अधिकार अर्जाविषयी माहिती देण्यासाठी आरोपीला भेटायला गेला, तेव्हा आरोपीने त्याच्या धर्माचा उल्लेख करून त्याच्याशी गैरवर्तन केले, तसेच अधिकृत कर्तव्ये पार पाडण्यापासून रोखण्यासाठी बळाचा वापर केला.