मंदिरे सामाजिक समतेची केंद्रे व्‍हावीत ! – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिरुपती येथील आंतरराष्‍ट्रीय मंदिर परिषद

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिरुपती (आंध्रप्रदेश) – मंदिर आपल्‍या समाजजीवनाचे अभिन्‍न अंग आहे. मंदिर  केवळ पूजास्‍थळ नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे, शिक्षणाचेही स्‍थळ आहे. मंदिरे ही पुरातन काळी सामाजिक समतेची स्‍थळे होती, तशीच पुन्‍हा ती व्‍हावीत, अशी अपेक्षा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केली. येथे आयोजित ‘इंटरनॅशनल टेम्‍पल कन्‍व्‍हेन्‍शन अँड एक्‍स्‍पो’ या परिषदेत ते बोलत होते. आचार्य गोविंददेव गिरि महाराज, आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू, गोव्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्‍ट्राचे सांस्‍कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, गिरीश कुळकर्णी, मेघना बोर्डीकर, विश्‍वजित राणे, प्रवीण दरेकर आदी या वेळी उपस्‍थित होते. ५७ देशांमधून मान्‍यवर या मंदिर व्‍यवस्‍थापन परिषदेत सहभागी आहेत.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, ज्‍या काळात परकीय आक्रमकांनी आपली संस्‍कृती ध्‍वस्‍त केली, त्‍यानंतर पूर्वेपासून पश्‍चिमेकडे आणि उत्तरेपासून दक्षिणेकडे मंदिर, घाटांचे पुनर्निर्माण अहिल्‍यादेवी होळकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यानंतर धर्माच्‍या पुनर्स्‍थापनेचे काम अहिल्‍यादेवींनी केले.

संपादकीय भूमिका :

मंदिरांमधून हिंदूंना धर्मशिक्षण मिळून हिंदू धर्माचरण करण्‍यास लागतील, अशी व्‍यवस्‍था निर्माण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात असायला हवीत !