बागपत (उत्तरप्रदेश) येथील तिलवाडा गावामध्ये उत्खननात ४ सहस्र वर्षे जुन्या वस्तू सापडल्या !

बागपत हे पांडवांनी वसवलेल्या गावांपैकी एक असल्याने उत्खननाला विशेष महत्त्व

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील बागपत जिल्ह्यातील तिलवाडा गावामध्ये केलेल्या उत्खननाच्या वेळी अनुमाने ४ सहस्र वर्षे जुने अवशेष सापडले आहेत. ४ महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर पुरातत्व विभागाला हे यश मिळाले आहे. सापडलेल्या वस्तूंमध्ये मातीची भांडी, तांब्याच्या वस्तू, विटा आणि मणी यांचा समावेश आहे. बागपत हे महाभारतातील पांडवांनी वसवलेल्या ५ गावांपैकी एक मानले जाते. बागपत गावाच्या व्यतिरिक्त सोनीपत, पानिपत, इंद्रप्रस्थ आणि तलपत यांचा महाभारतामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे बागपतमधील तिलवाडामध्ये केलेल्या उत्खननाला विशेष महत्त्व आहे.

१. बागपतमधील तिलवाडा गाव हे हरियाणाच्या सीमेवर आहे आणि देशाची राजधानी देहलीपासून साधारण ८५ किलोमीटर अंतरावर आहे. तिलवारा गावात उत्खननाचे काम डिसेंबर २०२४ मध्ये चालू झाले.

२. उत्खननात सापडलेले अवशेष मेरठला पाठवले जाणार आहेत. देशातील प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ यावर संशोधन करणार आहेत. येथून हे अवशेष गोळा करण्यापूर्वी पुरातत्व विभागाने त्याची प्राथमिक पहाणी केली होती.

३. उत्खननापूर्वीच गावकर्‍यांना येथे अवशेष सापडू लागले होते. त्यांनी हे अवशेष पुरातत्व विभागाला दिले होते. यामुळे पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी येथे उत्खनन करण्याची अनुमती मागितली होती. ही अनुमती वर्ष २०२३ मध्ये मिळाली.

४. बागपतमधील तिलवाडा गाव हे सिनौलीजवळ आहे. वर्ष २००५ मध्ये डॉ. डी.बी. शर्मा यांनी सिनौलीमध्ये उत्खनन चालू केले होते. त्या वेळी पुरातत्व विभागाला १०० हून अधिक मानवी सांगाडे सापडले. ते ३ सहस्र वर्षांहून अधिक जुने होते.

५. सिनौली येथे केवळ सांगाडेच नव्हे, तर रथ, मुकुट, भांडी आणि शस्त्रेही सापडली होती. तेथे सापडलेल्या रथावरून भारतात ४ सहस्र वर्षांपूर्वी युद्धशास्त्र प्रगत होते, हे सिद्ध झाले होते.