Save Murshidabad Hindus March : मुर्शिदाबादमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंना स्वसंरक्षणासाठी परवानाधारक शस्त्रे द्या !

भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ‘हिंदू वाचवा’ मोर्चा काढून केली मागणी

बंगालमधील भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी

कोलकाता (बंगाल) – मुर्शिदाबाद येथील हिंसाचारानंतर बंगालमधील भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी बंगाली हिंदूंसाठी ‘हिंदू वाचवा’ मोर्चा काढला. या वेळी त्यांनी मुर्शिदाबादमध्ये ‘ग्राम संरक्षण समिती’ स्थापन करावी आणि हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी परवानाधारक शस्त्रे द्यावीत, अशा मागण्या केल्या.

विरोधी पक्षनेते असतांना मुर्शिदाबादमध्ये जाण्यापासून रोखले जात आहे !

सुवेंदू अधिकारी म्हणाले की, मुर्शिदाबादमध्ये हिंदूंची लोकसंख्या आता ५० टक्क्यांपेक्षा अल्प असल्याने निवडणुकीच्या काळात राज्यात राष्ट्र्रपती राजवट लागू करावी. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे लोक मला मुर्शिदाबादला जाण्यापासून रोखत आहेत, तर इतर सर्वांना अनुमती दिली जात आहे. मी याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच या प्रकरणाची सुनावणी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

वक्फशी संबंध नसतांना केवळ हिंदु असल्याने आक्रमणे !

सुवेंदू अधिकारी यांनी सामाजिक माध्यमांत पोस्ट करत म्हटले की, समशेरगंजमधील धुलियान येथील गणेश घोष आणि छाया सिंह यांच्या कुटुंबांना लक्ष्य करण्यात येऊन त्यांच्या घराला आग लावण्यात आली. काहींनी नवीन घर बांधण्यासाठी, तर काहींनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे गोळा केले होते. ते सर्व जळून राख झाले. या दोन्ही कुटुंबांना आम्ही साहाय्य केले आहे. एका कुटुंबाला ५ लाख रुपये आणि दुसर्‍या कुटुंबाला दीड लाख रुपये देण्यात आले आहेत. या दोन्ही कुटुंबांचा वक्फशी काहीही संबंध नव्हता. त्यांचा गुन्हा केवळ एवढाच होता की, ते हिंदू होते.

लोकांचा तृणमूल काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे ! – बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस

बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी १८ आणि १९ एप्रिल या दिवशी मुर्शिदाबादमधील हिंसाचारग्रस्त भागांना भेट दिली. त्यांनी मुर्शिदाबादमधील परिस्थितीचे ‘विचित्र आणि क्रूर’ अशा शब्दांत वर्णन केले. ते म्हणाले की, लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी मागण्या मांडल्या आहेत. लवकरच अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना देण्यात येईल. सध्याची परिस्थिती अशी आहे की, लोकांचा तृणमूल काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे. बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी हिंसाचार सामान्य झाला आहे. एक समुदाय दुसर्‍या समुदायावर स्वतःची सत्ता लादण्याचा प्रयत्न करत आहे.

संपादकीय भूमिका

मुर्शिदाबादच नव्हे, तर संपूर्ण देशातच आता हिंदूंना परवानाधारक शस्त्रे देण्याची वेळ आली आहे. हेच हिंदू देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करू शकतील, अन्यथा मारले जातील, अशी स्थिती आहे !