|
मुंबई – बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल बॅलार्ड पीयर येथे सिद्ध झाले आहे. ५५५ कोटी रुपये गुंतवणुकीच्या या टर्मिनलची एकावेळी १० सहस्र विदेशींचे स्वागत करण्याची क्षमता आहे. २१ एप्रिल या दिवशी या टर्मिनलचे केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन होेणार आहे.
मुंबईला समुद्री पर्यटन आणि क्रूझचे केंद्र बनवण्याचे धोरण केंद्रीय जहाज बांधणी आणि बंदरे मंत्रालयाने आखले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत देशातील सर्वाधिक अत्याधुनिक असे क्रूझ टर्मिनल उभे करण्यात आले आहे. या टर्मिनलवर एकावेळी दोन मोठी क्रूझ जहाजे उभी राहू शकतात. ‘बॅलार्ड पीयर प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाने हे टर्मिनल उभे केले आहे. ३० वर्षांच्या करारावर हे टर्मिनल या आस्थापनाकडे असेल.
सध्या मुंबईत बंदरातील बहुतेक व्यापार रायगड जिल्ह्यातील न्हावा-शेवा येथील ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’वरून चालतो. शासन पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे नेहरू पोर्ट ट्रस्टपेक्षा कित्येक पटींनी मोठे बंदर उभारणार आहे. त्यामुळे मुंबईची मालवाहतूक हाताळण्याची क्षमता वाढणार आहे. त्यातच खासगी टर्मिनलची जोड मिळाल्याने प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही क्षमतांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक वाढू शकेल.
‘क्रूझ टर्मिनल’ची वैशिष्ट्ये !१. या क्रूझसाठी ५५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. २. येथे ७२ इमिग्रेशन काऊंटर्स असून २ घंट्यांत १० सहस्र प्रवाशांची तपासणी पूर्ण करण्यात येईल. ३. युरोप ते थायलंड मार्गावरील राजेशाही क्रूझ या टर्मिनलवर थांबतील. ४. ७ लाख प्रवाशांच्या वाहतुकीची या टर्मिलनलची वार्षिक क्षमता आहे. ५. तळमजला आणि आणखी वर ३ मजले, असे या क्रूझचे वैशिष्ट्य आहे. |