अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ज्ञानप्राप्त करणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची सुश्री मधुरा भोसले !

(६ ऑगस्ट २०२४ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/821913.html 

सुश्री मधुरा भोसले

५. नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध केल्यावर त्रासाची तीव्रता उणावणे

आमच्या कुटुंबाला पूर्वजांचा तीव्र त्रास असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तिला आणि मला त्रास होत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध करायला सांगितले. ते केल्यामुळे आमच्या (माझ्या आणि मधुराच्या) त्रासाची तीव्रता थोडी उणावली.

६. कु. मधुराला सूक्ष्म ज्ञान प्राप्त करतांना होणारे त्रास 

६ अ. वर्ष २०१६ पासून चालू झालेल्या त्रासाचे स्वरूप : आता कु. मधुराला कानात यंत्र लावल्यासारखे कर्णपिशाच सतत काहीतरी घाणेरडी बडबड करत असतात. त्यामुळे तिला डोकेदुखी, डोके बधीर होणे, काहीही न सुचणे, चिडचिड होणे, असे त्रास होत असतात. ती अल्प जेवत असूनही वाईट शक्तींनी तिचे वजन वाढवले आहे. तिने वजन अल्प करण्यासाठी ताक पिणे, वरण पिणे, मुगाची पेज पिणे, व्यायाम करणे, असे काही प्रयत्न केले की, वाईट शक्ती तिचा त्रास अधिकच वाढवून त्या प्रयत्नांत खीळ घालतात. आम्ही खोलीत काय बोलतो, ते तिला बर्‍याच वेळा समजत नाही.

हा त्रास साधारण वर्ष २०१६ पासून चालू झाला आहे. त्यावर विविध संतांचे उपाय करूनही तो त्रास उणावत नाही. तिचे प्रारब्ध अत्यंत घोर आहे. ‘असा त्रास शत्रूलाही होऊ नये’, असे आम्हाला वाटते. केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच आज ती जिवंत आहे. एवढा त्रास सहन करून ती सूक्ष्मज्ञान प्राप्त करण्याची सेवा करते, याचे आम्हालाच नाही, तर परात्पर गुरुदेवांनाही कौतुक वाटते. ‘त्यांचे सतत तिच्याकडे लक्ष आहे’, असे आम्हाला जाणवते. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिवही तिचे रक्षण करतात. त्यामुळे तिचा त्रास अल्प होत आला आहे. परात्पर गुरुदेव तिची आध्यात्मिक प्रगतीही करून घेत आहेत. आम्ही आई-वडील असूनही या त्रासापुढे संपूर्णतः अज्ञानी आणि हतबल आहोत. आम्ही स्थुलातून तिला जे साहाय्य लागेल, ते करू शकतो; परंतु तिचा त्रास न्यून करणे आमच्या आवाक्याबाहेरचे आहे. तिचे त्रास पाहून आमचे हृदय अक्षरशः पिळवटून येते; परंतु ‘आम्ही काही करू शकत नाही’, याची आम्हाला खंत वाटते. तेव्हा मला प.पू. भक्तराज महाराज यांचे पुढील वचन आठवते – ‘देव वाटाड्या आहे. मार्गात खाच-खळगे (प्रारब्ध) असतात. जेव्हा आपल्याला ठेच लागते, तेव्हा आपण वाट्याड्यावर संतापतो. तेव्हा तो सांगतो की, पुढचा मार्ग चांगला आहे. त्यामुळे गुरु आमचे कल्याणच करणार आहेत.’

६ आ. ज्ञानप्राप्तीच्या सेवेत येणारे अडथळे आणि देवाचे मिळत असलेले साहाय्य : कु. मधुराला दिवसभर वाईट शक्तींचा त्रास होत असतो. थोडे नामजपादी उपाय केल्यावर आणि प्रार्थना केल्यावर अकस्मात् तिचा त्रास दूर होतो. तेवढ्या वेळेत ती ज्ञान प्राप्त करणे किंवा सूक्ष्म परीक्षणाचे टंकलेखन करणे, अशी सेवा करते. ती टंकलेखन करत असतांना तिच्याभोवती पांढरा प्रकाशाचा झोत येत असल्याचे दिसते. धारिका पूर्ण झाल्याचे समाधान झाल्याविना देव तिला ती धारिका पुढे पाठवू देत नाही. धारिकेतील सर्व सूत्रे पूर्ण झाल्यावरच देव तिला सांगतो, आता धारिका पुढे पाठव. नाहीतर कधी कधी तिच्यातील वाईट शक्ती तिचा उतावळेपणा वाढवून धारिका पुढे पाठवण्यास भाग पाडते. नंतर तिला काही सूत्रे सुचतात. त्यामुळे तिला ‘सुधारित धारिका पाठवत आहे’, असा ई-मेल पाठवावा लागतो. तिच्या धारिका वाचतांना मला पुष्कळ चांगले वाटते. नवनवीन सूत्रे शिकायला मिळतात आणि ‘माझ्यासाठी गुरुदेवच ज्ञानाच्या रूपाने आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत आहेत’, असे जाणवते.

अशा स्थितीतही तिची व्यष्टी साधना आणि सूक्ष्म ज्ञानप्राप्तीची समष्टी साधना केवळ श्री गुरूंच्या कृपेमुळे चालू आहे.’

– डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले (सुश्री मधुरा भोसले यांची आई) (२५.१.२०२४)

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले यांचा साधनाप्रवास

डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले

१. साधनेला आरंभ

‘आम्ही (मी आणि डॉ. भोसले यांनी) वर्ष १९९८ मध्ये कराड येथे साधनेचा आरंभ केला. तोपर्यंत आम्हाला साधनेचा गंधही नव्हता. वर्ष १९९८ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभा चालू झाल्या. जानेवारी १९९९ मध्ये कराडमध्ये आणि कोयनानगर, उंब्रज आणि रेठरे येथे त्यांच्या ४ जाहीर सभा झाल्या. त्यामध्ये आम्ही सक्रीय सहभागी झालो. त्यानंतर आम्ही पाटण, वाई, कोरेगाव, सातारा येथे सेवेला गेलो. नंतर आमची साधनेची गोडी वाढतच गेली आणि आता पूर्णवेळ साधना करण्याची ओढ निर्माण झाली.

२. कु. मधुराच्या पाठोपाठ तिच्या आईनेही  पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे

मनुष्याच्या जीवनात गुरूंची नितांत आवश्यकता आहे. साधना करणे हे परम आवश्यक आहे’, हे मला पटले होते आणि मला सनातन संस्थेची साधना मनापासून पटली होती. वयाच्या ४४ व्या वर्षी मला साधना समजली, म्हणजे ‘जीवनातील पुष्कळ वर्षे वाया गेली’, अशी खंत माझ्या मनाला वाटत होती. सेवा करू लागल्यावर ती खंत हळूहळू न्यून होत गेली. वर्ष २००२ मध्ये आम्ही पुण्याला नोकरीसाठी गेलो; परंतु आम्ही पुण्याला बँकेचे कर्ज घेऊन सदनिका विकत घेतली होती. ते कर्ज फेडण्यासाठी आम्ही अधिक पगाराच्या नोकरीसाठी आंध्रप्रदेशातील नलगोंडा येथील वैद्यकीय महाविद्यालयात गेलो. तेथे मी प्रतिदिन कर्ज फेडण्यासाठी किती पैसे साठलेत, ते पाहून ऑक्टोबर २००५ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आले.

३. आश्रमात पूर्णवेळ साधना करण्याचा घेतलेला निर्णय किती योग्य आहे, याची निश्चिती होऊन समाधान वाटणे

आता वाटते की, तो निर्णय किती योग्य होता ! आता त्याविषयी समाधान वाटते. ‘साक्षात् अवताराच्या सान्निध्यात आम्हाला त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सेवा करण्याची संधी मिळेल’, अशी आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. एक वर्षानंतर, म्हणजे वर्ष २००७ मध्ये पुण्याची सदनिका विकून डॉ. भोसलेही पूर्णवेळ साधना करू लागले. आमची मधुरा आणि स्वप्नील ही दोन्ही मुले साधनेत आहेत. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. आम्ही संपूर्ण कुटुंबाला प.पू. गुरुदेवांच्या चरणी वाहिले आहे. ‘ते जे काही करतील, ते आमच्या कल्याणाचेच करतील’, अशी आम्हाला निश्चिती वाटते. आता ‘आम्हाला केवळ गुरुचरणी रहायचे आहे’, एवढीच इच्छा आहे.

– डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले (२५.१.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक