विशाळगड उद्रेक प्रकरणातील अटक केलेल्या हिंदूंच्या जामीनावर ३ ऑगस्टला निर्णय !

कोल्हापूर – माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली १४ जुलैला विशाळगड येथील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. यात शिवप्रेमींचा उद्रेक झाल्यावर गजापूर गावात काही ठिकाणी तोडफोड झाली होती. या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी २५ आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यातील २४ जणांना अटक केली होती. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन आवेदनावर १ ऑगस्टला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला. यावर आता ३ ऑगस्टला निर्णय देण्यात येणार आहे.

संशयितांच्या वतीने युक्तीवाद करतांना अधिवक्ता अभिजित देसाई, अधिवक्ता सागर शिंदे, अधिवक्ता धनंजय चव्हाण म्हणाले, ‘‘या प्रकरणी गुन्हा नोंद झालेले संशयित हे त्या दिवशी पावनखिंड मोहिमेवर होते. त्यांचा या गुन्ह्याशी संबंध नाही. तरी संशयितांना जामीन संमत करण्यात यावा.’’

संशयित हिंदूंना न्यायालयात उपस्थित करणार आहेत, हे कळल्यावर मुसलमान मोठ्या संख्येने न्यायालयाच्या परिसरात उपस्थित होते. हे कळल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने न्यायालयात उपस्थित झाले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना न्यायालयाच्या बाहेर जाण्यास सांगितले.