झारखंड : सुरक्षादलांच्या कारवाईत ४ माओवादी ठार !

चायबासा (झारखंड) – राज्यातील पश्‍चिम सिंघभूम जिल्ह्यात १७ जूनच्या पहाटे सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ माओवादी ठार झाले. यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या वेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. राजधानी रांचीपासून २०० किलोमीटर अंतरावरील लिपुंगा विभागात ही चकमक झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक अमोल होमकर यांनी दिली. शोधमोहिमेच्या वेळी रायफल, पिस्तूल आणि अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

सुरक्षा दलांच्या सततच्या कारवायांमुळे आता ठराविक भागातच माओवादी सक्रीय आहेत. मारल्या गेलेल्या माओवाद्यांपैकी कांदे होनहागा याच्यावर ५ लाख, सिंगराई याच्यावर १० लाख रुपये, तर सूर्या याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

  • गेल्या काही वर्षांत नक्षलवादाला परिणामकारक लगाम लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. आता त्याच्या समूळ नायनाटासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे !