मतदानासाठी सुटी न दिल्यास खासगी आस्थापनांवर कारवाई करू ! – मुंबई निवडणूक अधिकारी

मुंबई – येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, आस्थापने आणि संस्था यांनी कर्मचार्‍यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करू, अशी चेतावणी जिल्हाधिकारी तथा मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात २० मे या दिवशी मतदान होणार आहे. ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल, अशा आस्थापनांनी मतदारांना मतदानासाठी २ घंट्यांची सवलत देण्याचे प्रावधान आहे; मात्र त्यासाठी त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांची अनुमती घेणे बंधनकारक असणार आहे, असे राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.