प्रश्न आहे हिंदुत्वाच्या अस्तित्वाचा !

जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक वराडे गल्ली येथील मशिदी समोरून जात असतांना धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. आपल्या देशातील मुसलमान अजूनही स्वतःला हिंदुस्थानच्या ऐतिहासिक परंपरेपासून दूर ठेवू इच्छित आहेत. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे हिंदूंना त्यांचे हिंदुत्व जोपासणे नितांत आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे ‘हिंदुस्थानचे राष्ट्रपुरुष’ आहेत. मुसलमान समाजाने सुद्धा हिंदुस्थानात रहात असतांना देशाच्या राष्ट्रपुरुषांविषयी आदरभाव बाळगला पाहिजे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी वैर साधून त्यांना या देशात सुखाने जगण्याचा आनंद  लुटता येणार नाही. हिंदूंच्या श्रद्धास्थानांना पायदळी तुडवता येणार नाही’, अशी भूमिका घेण्यास मुसलमान समाजच हिंदूंना बाध्य करत आहे.

१. हिंदुत्वाला विरोध करणार्‍यांचे बौद्धिक दिवाळे वाजल्याचे लक्षण

हिंदुत्वाला विरोध करणार्‍यांना हिंदुत्वाचे महत्त्व कळलेले नाही किंवा कळलेले असले, तरी ते स्वीकारण्याची मानसिक आणि बौद्धिक सिद्धता नाही. ‘हिंदू सहिष्णू आहेत, याचा अर्थ त्यांनी कायम अन्याय सहन करत राहिला पाहिजे’, असा होत नाही. ‘सहिष्णुता हा गुण आहे’, यात वाद नाही; पण ‘हा गुण केवळ हिंदूंनीच जतन करावा आणि हिंदू सोडून अन्य धर्मियांनी सहिष्णुतेचा गुण आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्नही करू नये’, असे जर कुणाला वाटत असेल, तर त्यांचे बौद्धिक दिवाळे वाजले आहे, असे निश्चित समजावे.

२. ‘अन्य धर्मियांच्या ऐवजी हिंदूंनी सहिष्णूच राहिले पाहिजे’, असा हिंदुद्वेष्ट्यांचा अट्टाहास !

मुसलमान आणि ख्रिस्ती समाज हा हिंदु धर्मियांना कायमच उपद्रव देत राहिला आहे. हे दोन्ही धर्म ‘केवळ आमचाच धर्म श्रेष्ठ आहे आणि अन्य कोणताही धर्म श्रेष्ठ नाही’, अशी शिकवण देतो. ‘शस्त्र बळावर आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे’, हा त्यांचा धार्मिक अधिकार आहे. ‘या धार्मिक अधिकाराखाली कोणतेही अमानवीय कृत्य करण्यास मुसलमान आणि ख्रिस्ती पंथांच्या अनुयायांना पूर्ण मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करण्यास पूर्णपणे मोकळीक दिलीच पाहिजे’, असा आग्रह हिंदूंना सहिष्णुतेची आठवण करून देणारे धरतात. हिंदूंनी मात्र त्यांच्या धर्माच्या आज्ञेचे पालन करायचे नाही. हिंदूंनी त्यांच्या देवीदेवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या मिरवणुका मशिदी समोरून न्यायच्या नाहीत. एवढेच नाही, तर शिवजयंती उत्सवही साजरा करायचा नाही; कारण त्यांच्या भावना दुखावतात. हिंदूंनी शिवजयंती साजरी केल्यावर धर्मांध आक्रमण करणार. शिवजयंती उत्सव साजरा करू देणार नाहीत. हिंदूंनी मुसलमानांचा आदर राखून त्यांचे सण, उत्सव साजरे करावेत. मुसलमान आणि ख्रिस्ती यांनी मात्र हिंदूंच्या भावभावनांचा आदर केला पाहिजे, असे बंधन त्यांना घालण्यात आलेले नाही. तशी त्यांच्याकडून अपेक्षाही करायची नाही. याचे कारण सांगतांना हिंदूंचा द्वेष करणारे सांगतात, ‘हिंदू सहिष्णू आहेत आणि त्यांनी सहिष्णूच राहिले पाहिजे. हिंदूंवर कितीही प्रकारचा अन्याय मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाकडून झाला, तरी त्यांच्या विरोधात एकही अक्षर हिंदूंनी उच्चारता कामा नये.’

याचा अर्थ त्यांना हिंदु धर्म नष्ट करायचा आहे आणि ‘हिंदूंनी ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्या राजकीय वर्चस्वाखाली गुलामगिरीत जीवन कंठावे’, अशी हिंदुत्वाला विरोध करणार्‍यांची भूमिका आहे. हीच भूमिका आणि विचारसरणी यांना काँग्रेसने ‘निधर्मीवाद’ म्हणून घोषित केले.

श्री. दुर्गेश परुळकर

३. हिंदूंना इतिहास विसरता येणार नाही !

स्वामी विवेकानंद

अ. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘मुसलमान समाजाने प्रत्येक पाऊल पुढे टाकतांना एका हातात कुराण धरले आणि दुसर्‍या हातात तलवार धरली. ‘कुराण स्वीकारा किंवा मृत्यूला तोंड द्या. यावाचून दुसरा मार्ग नाही. हिंदूंविषयी माहिती मिळवण्यासाठी ज्ञानपिपासू ग्रीक हिंदुस्थानात आले, तेव्हा हिंदूंनी त्यांचे स्वागत केले; पण मुसलमान तलवार घेऊन आले आणि इंग्रज बंदुका घेऊन आले, तेव्हा हिंदूंचे दरवाजे बंद झाले. अशा पाहुण्यांचे स्वागत करायचे नसते.’

आ. बाबराने आपल्यासाठी ‘हिंदू’ आणि आपल्या देशासाठी ‘हिंदुस्थान’ असे शब्द वापरले आहेत. १८ व्या शतकात मराठ्यांचे स्वामीत्व हिंदुस्थानात मोठ्या प्रदेशावर चालू होते. महादजी शिंदे यांनी मथुरा आणि वृंदावन यांच्या सनदा आणल्या. पुढे याची वार्ता निजामाच्या दरबारी असलेल्या मराठ्यांचे वकील गोविंदराव काळे यांना कळली. याविषयी त्यांनी नाना फडणवीस यांना पत्राने कळवतांना लिहिले, ‘अटक नदीच्या अलीकडे दक्षिण समुद्रापर्यंत हिंदूंचे स्थान तुर्कस्तान नव्हे. ही आपली सीमा पांडवांपासून विक्रमाजितापर्यंत त्यांनी राखून उपभोग घेतला.’

इ. ‘इस्लामच्या धार्मिक शिकवणीपेक्षा इतर धर्माची शिकवण वेगळी असेल, तर ती शिकवण नष्ट केली पाहिजे. कुराणापेक्षा वेगळी शिकवण देणारे ग्रंथ जाळून टाकायचे. आमचाच धर्म श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा जगातील कोणताही धर्म श्रेष्ठ नाही. असा धर्म नष्ट करणे, हेच प्रत्येक मुसलमानाचे धार्मिक कर्तव्य आहे’, अशी शिकवण इस्लामचा धर्मग्रंथ देतो. त्यामुळेच ५ शतके प्रशांत महासागरापासून अटलांटिक महासागरापर्यंत सर्व जगभर रक्ताच्या नद्या वहात होत्या. अशी विचारसरणी जोपासणारे आणि ते विचार कृतीत आणणारे शांततेचा संदेश जगाला देतात, असे मानायचे का ?

ई. पोर्तुगीज राज्याचा ख्रिस्ती शासक हिंदुस्थानाच्या वातावरणाशी कसा जुळून गेला, याची माहिती ‘गोवा इन्क्विझिशन’ (धर्मच्छळ) या ग्रंथात ए.के. प्रियोळकर यांनी दिली आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रियोळकरांनी एक वाक्य उद्धृत केले आहे, ‘आपण हे लक्षात घेतलेच पाहिजे की, छळ सत्र जरी नष्ट झाले असले, तरी ते चळवळींना मार्गदर्शन करणारे चैतन्य पूर्णपणे लुप्त झालेले नाही.’

४. हिंदूंना पुनश्च गुलामगिरी आणि पारतंत्र्य यांच्या तिमिरात ढकलण्याचे षड्यंत्र

अशा प्रकारे अल्पसंख्य या नावाखाली मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाला अमर्याद स्वातंत्र्य देण्यात आले. वास्तविक पहाता ‘एखाद्या देशात अल्पसंख्य समाज अस्तित्वात आहे’, हे मान्य केले की, बहुसंख्य समाज त्याच देशात अस्तित्वात आहे, ही दुसरी बाजू सुद्धा स्वीकारणे भाग पडते. ‘जो बहुसंख्य समाज आहे त्या समाजाचा जो धर्म आहे, त्याच धर्माचा तो देश, ते राष्ट्र असते’, हा जागतिक नियम आहे; पण या नियमाला वाकवून, मोडून तोडून हिंदुस्थानात हिंदू बहुसंख्य असूनही ‘हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र नाही’, असे घोषित करून हिंदु समाजाला पुनश्च गुलामगिरी आणि पारतंत्र्य यांच्या तिमिरात ढकलण्याचा डाव पद्धतशीरपणे आखला जात आहे.

५. ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या धर्मग्रंथांत अन्य धर्मियांविषयी दिलेली शिकवण

मुसलमानांनी हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी निर्माण केल्या, तर चालतात. तो त्यांचा धार्मिक अधिकार ठरतो; पण हिंदूंनी त्यांची पुरातन मंदिरे पुनश्च कह्यात घेतली, तर मात्र हिंदू असहिष्णू ठरतो, तसेच हिंदुस्थानातील लोकशाहीसुद्धा लगेच धोक्यात येते. मुसलमान किंवा ख्रिस्ती असो, त्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार हा शस्त्र बळावर झाला आहे. धर्मांतराला जो नकार देईल, त्या व्यक्तीला ठार मारण्याची पद्धत मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मात आढळते. ‘बायबल’मध्ये ‘एक्झोडस’ या पर्वातील २३ व्या प्रकरणात परमेश्वर मोझेसला सांगतो, ‘तुम्ही त्यांच्या देवापुढे नतमस्तक होऊ नका. त्याची पूजा करू नका. त्यांचे कोणतेही काम करू नका; मात्र तुम्ही त्यांच्या देवीदेवतांच्या मूर्ती, त्यांच्या प्रतिमा भंग केल्या पाहिजेत…. तुमच्या भूमीवर अन्य धर्मियांनी वस्ती करता कामा नये. जर त्यांनी तशी वस्ती केली, तर माझ्या दृष्टीने तुम्ही पापी आहात.’

रावेरच्या विजयाची वार्ता आल्यानंतर हज्जाज याने महंमद बिन कासिमला लिहिले, ‘कुराणात श्रेष्ठ परमेश्वर म्हणतो, खर्‍या श्रद्धाळू लोकांनी तुमच्यासमोर अश्रद्धाळू माणूस आला, तर त्याचे डोके उडवावे.’ ‘काश्मीरमधील लक्षावधी हिंदूंची कत्तल करणारे मुसलमान हे क्रूर नसून वीर योद्धे आहेत का ?’, असा प्रश्न हिंदूंना असहिष्णू म्हणणार्‍या लोकांना विचारला पाहिजे. हिंदूंना त्यांचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि पुनश्च पारतंत्र्याच्या अंधारात खितपत पडायचे नसेल, तर हिंदुत्वाची कास धरून वाटचाल करणे नितांत आवश्यक आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (३१.३.२०२४)

हिंदुत्वाची कास धरली, तरच हिंदु समाजाचे अस्तित्व टिकेल !

हिंदुत्व कुणाशी वैर करायला शिकवत नाही. सहिष्णुतेचा पाठ देतांना हिंदुत्व ‘जयिष्णू’चाही (सतत विजयी होणे) पाठ देते. करुणा आणि दया यांचे गोडवे गातांना हिंदुत्व दुष्प्रवृत्तींचा नाश करण्याचीही शिकवण देणारे आहे. ‘सज्जनांशी सज्जनांसारखे वागावे आणि दुर्जनांशी दुर्जनांप्रमाणे वागावे’, हाच जगाचा न्याय आहे. सहिष्णुतेचा अर्थ, म्हणजे स्वतःचा धर्म, संस्कृती, ऐतिहासिक परंपरा आणि राष्ट्र यांविषयी श्रद्धा दाखवणे, असा होत नाही. महत्त्वाचे म्हणजे हिंदुत्वाची विचारधारा ही हिंदु समाजाच्या रक्तातून निर्माण झाली आहे. काळाच्या ओघात ती सर्व अडचणींवर मात करण्यास समर्थ आहे; म्हणून आजच्या परिस्थितीत हिंदुत्वाची कास धरली, तरच हिंदु समाजाचे अस्तित्व त्यांचा धर्म, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा यांसह टिकून राहील. हिंदुत्व सर्वांना आपल्यात सामावून घेणारे आहे; पण जर कुणी आमचा आत्मसन्मान आणि श्रद्धास्थान ठेचण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला क्षमा करण्यास हिंदुत्व मान्यता देत नाही. अशा हिंदुत्वाची प्रत्येक काळात नितांत आवश्यकता आहे; कारण हिंदुत्व ही एक जीवनपद्धत आहे, मनस्थिती आहे. त्यामुळे हिंदुत्वाला धर्मांधता म्हणता येणार नाही.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

संपादकीय भूमिका

हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि पुन्हा पारतंत्र्यात खितपत पडायचे नसेल, तर हिंदुत्वाची कास धरणे आवश्यक !