नगर जिल्ह्यात श्रीरामपूर आणि घारगाव पोलीस ठाण्यांच्या परिसरात एकूण १७ गोवंशियांना वाचवण्यात यश !

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता असलेली घटना !

अहिल्यानगर – ‘श्रीरामपूर वॉर्ड क्रमांक २’मध्ये कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गोवंश बांधून ठेवला आहे, अशी माहिती १८ फेब्रुवारीला मानद पशूकल्याण अधिकारी ऋषिकेश भागवत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने त्वरित त्या ठिकाणी जाऊन सर्व गोवंशियांना कह्यात घेतले आणि त्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच २० फेब्रुवारी या दिवशी घारगावमधून संगमनेरच्या दिशेने संगमनेरच्या पशूवधगृहामध्ये गोवंशियांची कत्तलीसाठी वाहतूक करत असलेला टेंपो गोरक्षकांच्या सतर्कमुळे अडवण्यात आला आणि त्यांच्यावरही पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. अशा दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण १७ गोवंशियांना वाचवण्यात यश आले आहे.

कारवाई यशस्वी होण्यासाठी बजरंग दलाचे श्री. सचिन जी कानकाटे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री ऋषिकेश गनपुले, आदिनाथ गांधाळे आदी गोरक्षकांनी पुष्कळ परिश्रम घेतले.