Karnataka Congress Muslims Apeasement : कर्नाटकातील ४१६ वक्फ संपत्तींच्या रक्षणासाठी सरकारकडून ३१.८४ कोटी रुपयांचे अनुदान !

भाजपने केला विरोध !

कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरमय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील एकूण ४१६ वक्फ संपत्तींचे रक्षण करण्यासाठी कुंपणाची भिंत उभारण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेस सरकारने एकूण ३१.८४ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले आहे. आता यावर भाजपने टीकास्त्र सोडले आहे.

भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यासंदर्भात म्हणाले की, राज्यात दुष्काळ आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साहाय्य करावे; म्हणून निवेदने देण्यात येत आहेत. मुळात राज्य सरकारकडे पैशांचा समयोचित विनियोग करण्याचे नियोजन नाही, असेच म्हणायला हवे. दुष्काळामुळे त्रासलेल्या शेतकर्‍यांना आधार द्यायचे सोडून वक्फ संपत्तींचे रक्षण करण्यासाठी कुंपणाची भिंत बांधणे, हे सरकारचे आद्यकर्तव्य झाले आहे, हेच यातून लक्षात येते. राज्य संकटाचा सामना करत असतांना वक्फ संपत्तीचे रक्षण करण्याची घाई का ? हे तुष्टीकरणाचे राजकारण नाही का ?

यत्नाळ पुढे म्हणाले की, सरकारने वक्फ संपत्तीचे रक्षण करण्यासाठी दिलेले अनुदान लगेच परत घेऊन तो पैसा शेतकर्‍यांना द्यावा आणि शेतकर्‍यांनी काढलेल्या पिकाचे न्यूनतम आधार मूल्य देण्यासाठी त्याचा उपयोग करावा.

काँग्रेसला शेतकर्‍यांचे हितरक्षण करण्यापेक्षा मुसलमानांचे लांगूलचालन करणे महत्त्वाचे वाटते ! – भाजपची टीका

बेंगळुरू (कर्नाटक) – दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी पैसे नाहीत; मात्र त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे कृत्य करणारे सिद्धरामय्या सरकार वक्फ बोर्डाला कुंपण बांधून देण्यासाठी ३१ कोटी ५४ लाख रुपये देण्यास पुढे सरसावले आहे. निर्लज्ज काँग्रेस सरकारला अन्न पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांचे हितरक्षण करण्यापेक्षा मुसलमानांचे लांगूलचालन करून आपली मतपेढी सुरक्षित करणे अगत्याचे वाटते. त्यालाच ते प्राधान्य देतात, अशी टीका राज्याचे भाजपचे नेते आणि विरोधी पक्षेनेते आर्. अशोक यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंवर अन्याय करणार्‍या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे. तरीही तिला हे कळत नाही, हे देशाचे सुदैवच !