Denigration Prabhu Shriram : ‘श्रीराम मांसाहारी होता’ असे म्हणणार्‍या जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध नाशिक येथे गुन्हा नोंद !

  • घाटकोपर येथे प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद

  • राज्यात विविध ठिकाणी आंदोलने  

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथील शिबिरात ‘राम मांसाहारी होता’ असे विधान केल्याच्या प्रकरणी गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याविषयी नाशिकमधील सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिराचे महंत श्री महंत सुधीरदास महाराज यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती.

यासह आव्हाड यांच्या निषेधार्थ मुंबई, पुणे आदी शहारांत आंदोलनेही करण्यात आली, तसेच घाटकोपर (मुंबई) येथे प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात आला आहे. भाजपकडूनही आव्हाड यांच्या निषेधार्थ पुणे आणि मुंबई येथे आंदोलने करण्यात आली. यासह आव्हाड यांच्याविरोधात घोषणा देऊन त्यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. पुण्यात आव्हाड यांच्याविरुद्ध ‘तिरडी आंदोलन’ करण्यात आले.

रोहित पवार यांच्याकडून आव्हाड यांना घरचा अहेर !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी, ‘कुणी देव-धर्माचे राजकारण करू नये. जनता त्यांना चोख उत्तर दिल्याखेरीज रहाणार नाही’, अशा शब्दांत  आव्हाड यांना घरचा अहेर दिला.

‘श्रीराम मांसाहारी होते’, असा कुठेही उल्लेख नाही ! – श्री महंत सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर, नाशिक

आचार्य महामंडलेश्‍वर श्री महंत सुधीरदास महाराज

श्री महंत सुधीरदास महाराज म्हणाले, ‘‘वाल्मीकि रामायणापासून कुठल्याही १४ रामायणांत ‘श्रीराम मांसाहारी होते’, असा उल्लेख नाही; उलट ‘रामचंद्र फळे आणि मुळे ग्रहण करून आणि ब्रह्मचर्यव्रत धारण करून राहिले’, असा उल्लेख रामरक्षेमध्ये आहे. त्यामुळे आव्हाड यांचे विधान अत्यंत मूर्खपणाचे विधान आहे. आज पूर्ण भारतात राममय वातावरण झाले असतांना जसा राक्षसांना त्रास होतो, तसाच आव्हाड यांना त्रास होत आहे. हिंदु देवतांच्या वारंवार होणार्‍या अवमानाच्या विरोधात कायदा करवा, अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहोत.’’

धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदु धर्माचा अवमान करणे नव्हे ! – खासदार आनंद परांजपे

आव्हाड यांना २४ घंट्यांत अटक न केल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्याची चेतावणी !

ठाणे : धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदु धर्माचा अवमान करणे नव्हे. धर्मनिरपेक्षता म्हणजे मी अन्य धर्माप्रमाणेच हिंदु धर्माचा मान राखीन. ‘श्रीराम वनवासात मांसाहार करत होता’, असे अकलेचे तारे स्वतःला इतिहाससंशोधक म्हणवणारे जितेंद्र आव्हाड यांनी तोडले आहेत. अभद्र बोलण्याची त्यांची संस्कृती आहे. सातत्याने हिंदु देवतांचा अवमान करायचा, ही त्यांची सवय आहे. पुढच्या २४ घंट्यांत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला नाही, तर आम्ही वर्तकनगर पोलीस ठाण्यावर मोठा मोर्चा नेऊ. पुढची महाआरती पोलीस ठाण्यात करू, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आनंद परांजपे यांनी दिली.

खासदार परांजपे पुढे म्हणाले की, शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाविषयी अत्यंत अभद्र टिपणी करून त्यांचा अवमान केला. त्याच्या निषेधार्थ आव्हाड यांच्या घरासमोर श्रीरामाची आरती करण्याची विरू वाघमारे नावाचा कार्यकर्ता गेला होता. त्याला पोलिसांनी पकडले.

जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाविषयी केलेले अवमानकारक वक्तव्य !

  • आव्हाड कधी श्री सरस्वती देवीचा, कधी प्रभु श्रीरामाचा, तर कधी हिंदु धर्माचा अशलाघ्य भाषेत करत असलेल्या अवमानावरून त्यांच्या नसानसांत हिंदुद्वेष किती भिनला आहे ?, हेच दिसून येते ! आव्हाड यांना मते देऊन निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?
  • हिंदूंच्या देवतांचा उठसूठ अवमान करणारे आव्हाड कधी मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • वारंवार हिंदु देवतांचा अवमान करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी शरद पवार चकार शब्दही काढत नाहीत कि त्यांना अशी विधाने करण्यापासून रोखत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • हिंदुत्वनिष्ठांनी कथित विद्वेषी भाषण केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर ‘हेट स्पीच’ अंतर्गत गुन्हे नोंदवणारे पोलीस आव्हाड यांच्या या ‘हेट स्पीच’विषयी गप्प का ?

‘शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. १४ वर्षे जंगलात असणारा राम शिकार करायचा. रामाने १४ वर्ष वनवास भोगला होता, मग तो शाकाहारी कसा असू शकतो ? राम मेथीची भाजी खायचा हे कुणी सांगू शकेल का ?’

श्रीरामभक्तांच्या भावना दुखावण्याची आव्हाड यांची मानसिकता आहे ! – आमदार राम कदम, भाजप

श्री. राम कदम

श्रीरामभक्तांच्या भावना दुखावण्याची जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता आहे; मात्र मते गोळा करण्यासाठी ते हिंदु धर्माची चेष्टा करू शकत नाहीत. श्रीराममंदिर बांधले गेले आहे, ही वस्तूस्थिती विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला पटलेली नाही, अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली.

आमदार कदम पुढे म्हणाले की, मांसाहार प्रसाद म्हणून कुठे दाखवला जातो ? जर देवतांना मांसाहार प्रिय असता, तर मांसाहार प्रसादात दिसला असता. घरी साधी पूजा जरी असेल, तरी मांसाहार करणारे लोक त्यादिवशी शाकाहार करतात. ४ मित्र मंदिरात जात असतील आणि एकाने मांसाहार केला असेल, तर तो मंदिरात न जाता मंदिराबाहेर थांबतो. हे जितेंद्र आव्हाडांना चांगले माहिती आहे. तरीही हिंदूंच्या भावना दुखवून दुसर्‍यांना खूश करायचे, यासाठी हे मतपेटीचे राजकारण आहे.

सततच्या इफ्तार पार्ट्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची बुद्धी भ्रमिष्ठ ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामाविषयी जे आक्षेपार्ह  वक्तव्य केले आहे, त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. मुंब्रा येथे निवडून येऊन सतत इफ्तारच्या पार्ट्या करून बुद्धी भ्रमिष्ट कशी होते, याचे जितेंद्र आव्हाड हे उदाहरण आहे. या प्रकरणी आव्हाड यांच्याविरुद्ध ‘हेट स्पीच’ (विद्वेषी वक्तव्य) अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अन्यथा हिंदू रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिली.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘जितेंद्र आव्हाड यांना अन्य धर्माविषयी कधीच काही समस्या नसतात; परंतु त्यांच्याकडून हिंदूंच्या देवतांविषयी मात्र सातत्याने आक्षेपार्ह भाषा वापरली जाते. शरद पवार यांच्यासमोर अशी भाषा वापरून कोणतीही कारवाई होत नाही. यातून स्पष्ट होते की, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा पूर्ण पाठिंबा आहे. प्रभु श्रीरामाने वनामध्ये राहिल्यानंतर १४ वर्षे काय खाल्ले असेल ? हा प्रश्‍न विचारतांना जितेंद्र आव्हाड ‘वनात काही खायला मिळत नाही’, असे म्हणतात; परंतु ते विसरतात ‘वनात अनेक प्राणी-पशू आहेत, जे संपूर्ण शाकाहारी असतात. वनात फळे-कंदमुळेही असतात. असे असतांना आव्हाड यांचे वक्तव्य म्हणजे हिंदु धर्माची अपकीर्ती होय. श्रीराममंदिराचे निर्माण होत असतांना असे वादग्रस्त वक्तव्य करणारे जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही निषेध करतो. पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्वरित कारवाई करावी.’’

मी इतिहासाचा विपर्यास केलेला असे सांगत आव्हाड यांच्याकडून खेद व्यक्त !

ठाणे : मी श्रीरामांविषयी बोललो की, ते मांसाहरी होते. जे या विरोधात बोलत आहेत, त्यांच्या माहितीसाठी वाल्मीकि रामायणात एक संदर्भ आहे. त्यातील अयोध्या कांडात एक श्‍लोक आहे. तो मी वाचत नाही. वर्ष १८९१ मध्येही याविषयीचा एक संदर्भ आहे. ममता नाथदत्त, आयआयटी कानपूर, गीता प्रेस, हरिप्रसाद शास्त्री आदींनी जी भाषांतरे केली आहेत, ती उपलब्ध आहेत. वाल्मीकि रामायणात उल्लेख असल्यानंतरही याविषयी कुणाला बोलायचे असेल, तर बोलावे. जर गुन्हा नोंदवायचा असेल, तर तो कुणावर नोंदवावा लागेल ?, ते जरा समजून घ्या. अन्नपुराणी चित्रपटातही तसा उल्लेख आहे. मी इतिहासाचा विपर्यास करत नाही, असे विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. श्रीरामवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्याविषयी खेद व्यक्त करतो, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. गुन्हे नोंद करायला काही हरकत नाही, मी त्यास घाबरत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मी खेद व्यक्त केला आहे, याचाच अर्थ मला दुःख झाले आहे, असेही आव्हाड पुढे म्हणाले आहेत.

आव्हाड म्हणाले, ‘‘राम हा आमच्या बहुजनांचा राम आहे. आमचा राम जात-पात न मानणारा आहे, शबरीची बोरे खाणारा आहे, जे राम-राम करत आहेत, त्यांना मी सांगेन की, तुमचा राम तुम्हाला निवडणुकीसाठी बाजारात आणायचा आहे. आमचा राम आमच्या जन्मापासून आमच्या हृदयात आहे.’’