नोंदणीकृत मठ-मंदिरांचा शेतमाल खरेदी करू आणि बोनसही देऊ !

छत्तीसगडमधील भाजप सरकारचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांचे संत, भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांना आश्‍वासन !

उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी निवेदन स्वीकारले.

रायपूर (छत्तीसगड) – यापूर्वी छत्तीसगड राज्यात भाजपचे सरकार असतांना राज्यातील सर्व मंदिरांच्या शेतभूमीतून उत्पादित होणारे धान सरकारने खरेदी केले होते. यासह पूर्ण बोनसही दिला होता. त्यामुळे मठ आणि मंदिर यांच्या कृषी उत्पन्नातून राज्याला सहज उत्पादन मिळू शकले. याखेरीज आपत्कालीन परिस्थितीत तत्कालीन भाजप सरकारकडून साहाय्यही केले जात होते; मात्र मागील काँग्रेस सरकारच्या काळात शेतमालाची खरेदी करणे आणि मंदिरांना बोनसवाटप बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक मंदिरे आर्थिक संकटात सापडली. त्यामुळे संत, भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी मंदिरांचा शेतीमाल सरकारने विकत घेणे पुन्हा चालू करावे, अशी मागणी भाजप सरकारचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी निवेदन स्वीकारून याप्रश्‍नी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. यासह ‘नोंदणी झालेली मंदिरे, मठ आदींनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे त्यांनी नोंदणी करून घ्यावी’, असे सांगितले. याविषयी शर्मा यांनी संबंधित विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.


या वेळी ‘मिशन सनातन’चे श्री. मदनमोहन उपाध्याय, नीलकंठ सेवा संस्थानचे पंडित नीलकंठ त्रिपाठी, अखिल भारतीय संत समितीचे छत्तीसगड येथील महंत सर्वेश्‍वरदास, महंत नरेंद्रदास, बजरंग दलाचे श्री. अंकित द्विवेदी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत कानस्कर आणि श्री. प्रतीक रिझवानी उपस्थित होते.

छत्तीसगडमध्ये लवकर हलाल उत्पदनांवर बंदी घालणार !

उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी या वेळी हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याविषयी सरकारकडून चालू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. लवकरच राज्यात हलाल उत्पादनांवर बंदी घालून याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले.