पाणी ओसरल्यावर तातडीने दुरुस्ती करणार ! – कार्यकारी अभियंता विवेक सोनार

पाण्याच्या दबावाने खोरनिनको कालव्याचे अस्तरीकरण निखळले

रत्नागिरी – मुचकुंदी (खोरनिनको) धरणावरील कालव्याचा अद्याप वापर चालू केलेला नाही. डोंगरातून होणार्‍या पाण्याचा पाझर अजूनही चालू आहे. पाणी ओसरल्यावर अस्तरीकरणाची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. एकंदरीत कालवा पूर्णपणे सुरक्षित असून, त्यामुळे कोणताही धोका उद्भवत नाही, अशी माहिती पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी दिली.
मुचकुंदी (खोरनिनको) धरणावरील कालवा एकूण ४ सहस्र ५४० मीटर लांबीचा असून, यापैकी साधारणतः दोन ते अडीच मीटर लांबीमध्ये कालव्याचे अस्तरीकरण निखळल्याचे निदर्शनास आले आहे. या भागात होणार्‍या अतीवृष्टीमुळे डोंगरातून मोठ्या प्रमाणावर पाणी पाझरते. पाझरणार्‍या पाण्याचा कालव्याखाली दबाव निर्माण होऊन त्या ठिकाणचे अस्तरीकरण निघाले आहे. डोंगरातून होणारा पाण्याचा पाझर अजूनही चालू आहे. पाणी ओसरल्यावर अस्तरीकरणाची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.