चेन्नईमध्ये (तमिळनाडू) गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

चेन्नई – अरुम्बक्कम, चेन्नई येथील डी.जी. वैष्णव महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. बालाजी कोल्ला यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त पाठवलेल्या संदेशाचे भावपूर्णरित्या वाचन केले. या वेळी ‘गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र’ या सनातन संस्थेच्या तमिळ भाषेतील नवीन ग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ‘वेदिक सायन्स रिसर्च सेंटर’ आणि ‘श्री टीव्ही’चे संस्थापक श्री. बालगौतमांजी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रखर हिंदुत्वनिष्ठ ‘श्री भारत हिंदु मुन्नानी’चे श्री. आर्.डी. प्रभु आणि अधिवक्ता मुथरासूजी यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. या उत्सवाला १०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.

डावीकडे श्री. बालाजी कोल्ला आणि ‘गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र’ या तमिळ भाषेतील नवीन ग्रंथाचे प्रकाशन करतांना उजवीकडे श्री. बालगौतमांजी

या वेळी ‘वेदिक सायन्स रिसर्च सेंटर’ आणि ‘श्री टीव्ही’चे संस्थापक श्री. बालगौतमांजी यांचे मुख्य व्याख्यान झाले. राष्ट्राचा व्यापक अर्थ स्पष्ट करतांना त्यांनी तमिळनाडूमधील राष्ट्राची सध्याची स्थिती यावर मार्गदर्शन केले. ‘पूर्वी कुटुंबासाठी आई ही धर्मशिक्षणाचे केंद्र असायची. आज पुन्हा धर्मशिक्षणवर्ग चालू करणे, ही काळाची आवश्यकता आहे’, असे मार्गदर्शन श्री. बालगौतमांजी यांनी या वेळी केले.

पू. (सौ.) उमा रविचंद्रन मार्गदर्शन करतांना

हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांनी उपस्थितांना संबोधित करतांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्पना बालाजी यांनी केले.

गुरुपौर्णिमा उत्सवाला उपस्थित जिज्ञासू
ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद

क्षणचित्र : या प्रसंगी सनातननिर्मित सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.