(म्हणे) ‘चित्रपटामध्ये चीनला खलनायक दाखवले आहे !’ – चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’

‘भारतियंस’ या हिंदी चित्रपटावरून चीन सरकारच्या मुखपत्राचा थयथयाट !

बीजिंग (चीन) – चीन सरकारचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘ग्लोबल टाइम्स’ या दैनिकाने त्याच्या संपादकीयामध्ये भारतात प्रदर्शित झालेल्या ‘भारतियंस’ या हिंदी चित्रपटावरून भारतावर टीका केली आहे. यात दावा करण्यात आला आहे, ‘अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये चीनला खलनायक दाखवले असून यामुळे चीन आणि भारत यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.’ ‘भारतियंस’ हा चित्रपट दीना राजा यांनी दिग्दर्शित केला असून तेच याचे लेखकही आहेत.

‘ग्लोबल टाइम्स’ने संपादकीयामध्ये म्हटले आहे की,

१. ‘भारतियंस’ हा चित्रपट १४ जुलै या दिवशी भारतात प्रदर्शित झाला असून त्याचे काही प्रसारमाध्यमे आणि राजकीय नेते कौतुक करत आहेत. अनेकांनी याला देशभक्तीपर चित्रपट असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य अभिनय किंवा कथा नसून यात चीनविरोधी भावना दाखवण्यात आली आहे.

२. या चित्रपटाची कथा ६ तरुणांच्या भोवती फिरते. हे युवक गोपनीय कामासाठी चीनच्या क्षेत्रात घुसखोरी करतात. या चित्रपटातील संवाद जाणीवपूर्वक गलवान खोर्‍यातील संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न करतात. या चित्रपटाची निर्मिती करणार्‍या आस्थापनाने या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी गलवान खोर्‍यातील संघर्षाविषयी प्रचार करत चित्रपटाला सनसनाटी बनवले होते.

३. हे स्पष्ट आहे की, हा चित्रपट सर्वसाधारण नाही, तर चीनविरोधी प्रचाराचा एक भाग आहे. काही प्रसारमाध्यमांनी याला देशभक्तीपर चित्रपट म्हटले आहे. यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे; कारण हा चित्रपट देशभक्तीपर नाही, तर संकुचित विचारसरणीच्या राष्ट्रवादी चित्रपट असून जो द्वेषला प्रोत्साहन देतो. हा चित्रपट कोणताही आधुनिक सभ्य देश सहन करणार नाही.

४. या चित्रपटाने या क्षेत्रातील सीमेचे उल्लंघन केले आहे. या चित्रपटाने चीनला ‘खलनायक’ आणि भारताचे शत्रू असे चित्रित केले आहे. हा चित्रपट जितके लोक पहातील, तितका द्वेषाचा परिघ वाढणार आहे.

संपादकीय भूमिका

चीन भारतासाठी नायक नसून खलनायकच आहे, असेच भारतियांना वाटत असल्याने तेच चित्रपटात दाखवले जाणार ! चीनला जर हे चुकीचे वाटते, तर त्याने भारताचा मित्र असणारी कृती करून दाखवावी !