भारतातील मुसलमानांच्या द्वेषाला मुसलमानच उत्तरदायी ! – मौलाना तौकीर रझा

(मौलाना म्हणजे इस्लामचे अभ्यासक)

नवी देहली – भारतातील मुसलमानांच्या द्वेषाला भाजप किंवा संघ नव्हे, तर मुसलमानच उत्तरदायी आहेत, असे बरेली येथील ‘इत्तेहाद ए मिल्लत’ या संघटनेचे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. मौलाना तौकीर रझा हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. ‘मुसलमानांवरील धर्मांतराचे आरोप खोटे आहेत’, असेही विधान त्यांनी केले.

तौकीर रझा यांची वादग्रस्त विधाने करण्याची पार्श्‍वभूमी !

तौकीर रझा यांनी यापूर्वी कुख्यात गुंड अतीक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येचा सूड उगवण्याची घोषणा केली होती. त्यांनी ३ मासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना धृतराष्ट्राशी केली होती. ‘घरवापसी’च्या नावाखाली १० लाख मुसलमान महिलांना फूस लावून हिंदु बनवण्यात आले, असाही आरोप त्यांनी केला होता. यासह त्यांनी हिंदु राष्ट्राच्या मागणीला विरोध करत हिंदु राष्ट्राची मागणी योग्य असेल, तर खलिस्तानची मागणीही रास्त असल्याचे आक्षेपार्ह विधान केले होते.