(म्हणे) ‘लडाखमध्ये भारताने घुसखोरी केली !’

भारताचा मोठा भूभाग गिळंकृत करणार्‍या चीनच्या उलट्या बोंबा !

स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत एकाही शासनकर्त्याने चीनला ‘जशास तसे’ उत्तर न दिल्याने तो भारताच्या संदर्भात वाटेल ते बोलतो आणि वाटेल तसे वागतो ! हे आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

(डावीकडे) भारताचे परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर (उजवीकडे) चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान

बीजिंग – भारताने लडाखमध्ये चीनच्या सीमेत घुसखोरी केली, असा आरोप चीनने केला आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव न्यून करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा चालू आहेत.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, भारत-चीन सीमेवरील पश्‍चिम क्षेत्रात चिनी सैन्य तैनात करणे, ही सामान्य संरक्षण व्यवस्था आहे. चीनच्या क्षेत्रात होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी केलेली ही व्यवस्था असल्याचे सांगत भारतानेच मागील काही काळापासून सीमेवर अधिक सैनिक तैनात करून आमच्या क्षेत्रात अतिक्रमण केले आहे. दोन्ही देशांमधील तणावासाठी भारताकडून होत असलेले अतिक्रमणच उत्तरदायी असल्याची आवईही चीनने उठवली आहे.

काही दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांनी ‘कतार इकॉनॉमिक फोरम’ला संबोधित करतांना ‘सीमेवरील वादग्रस्त भागात चीन आपल्या सैन्याची कुमक न्यून करण्याचे आश्‍वासन पूर्ण करणार कि नाही, याविषयी अनिश्‍चितता आहे. त्यामुळे ही गोष्ट दोन्ही देशांतील संबंधासाठी एक आव्हान आहे.’ जयशंकर यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर चीनने भारतावर वरील आरोप केले.