६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. प्रकाश घाळी यांनी अनुभवलेले नामजपाचे टप्पे !

१. साधनेत आल्यानंतर ४ – ५ वर्षांतच नामजप आपोआप आतून होणे

डॉ. प्रकाश घाळी

‘मला साधनेत येऊन २२ वर्षे झाली आहेत. मी साधनेत आल्यावर ४ – ५ वर्षांतच माझा नामजप आतून आपोआप होऊ लागला. नामजप आतून होणे, म्हणजे काही प्रयत्न न करता नामजप आपोआप होतो आणि तो नामजप आपण शांतपणे बसून ऐकू शकतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपल्या मनात एक ध्वनीमुद्रित केलेला नामजप लावल्यावर जसे ऐकू येईल, तसे हे असते. हे गुरूंच्या कृपेने होते. माझा आतून २४ घंटे नामजप होत नव्हता. मन रिकामे असतांना किंवा मी मनातून नामजप करायला आरंभ केल्यावर माझा आतून नामजप होत असे.

२. आतून होणारा नामजप बंद पडणे

अनुमाने दीड-दोन मासांपूर्वी माझा आपोआप होणारा नामजप थांबला. त्यामुळे मी घाबरलो. माझ्या मनात विचार येऊ लागले, ‘इतक्या वर्षांपासून होणारा नामजप कोण करत होते ? मी कि अनिष्ट शक्ती ?’ (पाताळातील वाईट शक्ती मंत्र-तंत्र विद्येने आपल्याकडून नामजप करवून घेऊन आपल्याला त्रास देऊ शकतात. – संकलक)

३. नामजप करतांना चांगल्या संवेदना जाणवणे आणि नंतर नामजप मनाशी एकरूप होऊन आनंद मिळणे

काही दिवसांनी नामजपाला बसल्यावर मला चांगल्या संवेदना जाणवू लागल्या. मला त्यामुळे आनंद होत असे. काही वेळानंतर माझा नामजप सावकाश होऊन मधूनमधून थोडा ऐकू येऊ लागला, म्हणजे नामजप माझ्या मनाशी एकरूप होऊन मला आनंद मिळत होता, तसेच माझे मन निर्विचार व्हायचे.

‘माझा नामजप वैखरीतून मध्यमा वाणीत आणि मध्यमा वाणीतून पश्यंती वाणीत होऊ लागला’, असे वाटले.

– डॉ. प्रकाश घाळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.८.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक