सतत सेवारत राहून आनंद घेणार्‍या आणि ‘इतरांनाही तो आनंद मिळावा’, यासाठी प्रयत्न करणार्‍या देवद आश्रमातील सौ. नम्रता दिवेकर !

सतत सेवारत राहून आनंद घेणार्‍या आणि ‘इतरांनाही तो आनंद मिळावा’, यासाठी सहसाधकांना स्वभावदोष निर्मूलन करायला तळमळीने साहाय्य करणार्‍या देवद आश्रमातील सौ. नम्रता दिवेकर !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या (परात्पर गुरुदेवांच्या) कृपेने मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी देवद आश्रमात आलो. मुळात माझा स्वभाव अबोल आहे. माझा सेवेनिमित्त आश्रमातील अनेक साधकांशी संपर्क व्हायचा; मात्र मी आपणहून कुठल्याही साधकाशी बोलत नव्हतो. काही सेवांच्या निमित्ताने माझा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सेवा करणार्‍या सौ. नम्रता दिवेकर यांच्याशी संपर्क झाला. ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वादशी (२२.६.२०२१) या दिवशी सौ. नम्रता दिवेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मला सौ. नम्रताताईंकडून शिकायला मिळालेली सूत्रे अणि त्यांनी दिलेले योग्य दृष्टीकोन येथेे दिले आहेत.

सौ. नम्रता दिवेकर

सौ. नम्रता दिवेकर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. स्वभावदोष आणि अहं यांची पुनःपुन्हा जाणीव करून देणेे आणि त्यावर योग्य दृष्टीकोन देणे 

१ अ. मनमोकळेपणे न बोलणे

१ अ १. मनमोकळेपणाच्या अभावामुळे नकारात्मकता वाढून मनात पूर्वग्रह निर्माण होणे : माझ्यात मनमोकळेपणा नसल्यामुळे मला सेवेतील आनंद अनुभवता यायचा नाही. सेवा करतांना आलेल्या अडचणींविषयी मी लगेच संबंधित उत्तरदायी साधकांशी न बोलता तो विचार तसाच मनात ठेवायचो. सहसाधकांकडून झालेल्या चुका मी वेळच्या वेळी पुढे सांगत नसल्यामुळे माझ्या मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढायचे. त्यामुळे माझ्याकडून साधकांचे स्वभावदोष पाहिले जाऊन माझ्या मनात त्यांच्याविषयी पूर्वग्रह निर्माण व्हायचे. मला ‘त्या साधकांशी बोलू नये’, असे वाटायचे.

१ अ २. नम्रताताईंनी ‘मनमोकळेपणे बोलल्यामुळे अनेक अडचणी सुटतात’, असे सांगून पुनःपुन्हा मनमोकळेपणे बोलायला सांगणे, तसे प्रयत्न केल्यावर सकारात्मकता आणि आनंद अनुभवता येणे : काही कारणांनी नम्रताताईंशी बोलणे झाल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘साधकांशी मनमोकळेपणाने बोलत जा.’’ तरीही काही प्रसंग घडला की, मी केवळ त्याच विचारात रहायचो. त्यावर उपाययोजना न काढल्याने मला त्या प्रसंगातून लवकर बाहेर पडता यायचे नाही. काही सेवांच्या निमित्ताने माझा नम्रताताईंशी संपर्क व्हायचा. तेव्हा त्यांनी मला पुनःपुन्हा जाणीव करून देऊन सांगितले, ‘‘साधकांशी मनमोकळेपणे बोलत जा. बोलल्यामुळे अनेक अडचणी सुटतात. त्यामुळे तुम्हालाही हलके वाटेल.’’ त्यांनीच त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले. त्यामुळे हळूहळू मी साधकांशी मनमोकळेपणाने बोलू लागलो. तेव्हा मला सकारात्मकता आणि आनंद अनुभवता येऊ लागला.

१ आ. अपेक्षा करणे

श्री. दीपक गोडसे

१ आ १. ‘सहसाधकांनी विचारपूस केली पाहिजे’, अशी अपेक्षा असणे, सौ. नम्रताताईंनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे अंतर्मुख होता येणे : माझ्या मनात ‘सहसाधकांनी स्वतःहून माझ्याशी बोलायला हवे, त्यांनी माझ्यासाठी वेळ द्यायला हवा किंवा त्यांनी माझी विचारपूस करायला हवी, मी सुचवतो, तसेच झाले पाहिजे’, असे अपेक्षेचे तीव्र विचार असायचे. याविषयी नम्रताताईंशी बोलल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘अपेक्षांचे प्रमाण पुष्कळ आहे; म्हणून दुःख होते. आपण साधकांशी स्वतःहून किती बोलतो ? आपण इतरांना किती समजून घेतो ?’, असा विचार करा. प्रत्येक वेळी समोरचा आपल्याला समजून घेईलच, असे नाही. त्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला हवेत.’’

१ आ २. भावनाशीलता : काही प्रसंगांत भावनाशील होऊन मला निराशा यायची. त्यामुळे मला त्या प्रसंगांतून बाहेर पडण्यासाठी अधिक वेळ लागायचा. मी या प्रसंगांविषयी नम्रताताईंशी बोलल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘प्रत्येक प्रसंगातून देवाला आपल्याला काहीतरी शिकवायचे असते आणि त्यासाठीच प्रसंग घडत असतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाचे साहाय्य घेतले पाहिजे, आत्मनिवेदन केले पाहिजे आणि सतत सकारात्मक रहायला हवे.’’

१ आ ३. स्वीकारता न येणे : नम्रताताईंशी बोलत असतांना काही प्रसंगांत त्यांनी मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव करून दिली. तेव्हा आरंभी मला ते स्वीकारता येत नव्हते. त्यामुळे मी भावनाशील व्हायचो आणि माझ्या मनात नकारात्मक विचार यायचे. तेव्हा नम्रताताई मला म्हणाल्या, ‘‘ताण घेऊ नका. तुमच्या भल्यासाठीच सांगत आहे.’’ काही कालावधीनंतर त्यांनी सांगितलेले दृष्टीकोन माझ्या लक्षात यायचे. मग त्यावर प्रयत्न केल्यावर मला सेवेतील आनंद अनुभवता येऊ लागला. ‘मला स्वतःलाच पालटले पाहिजे आणि त्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकून ती आचरणात आणली पाहिजे’, हे माझ्या लक्षात आले.

१ आ ४. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे ‘आपण पालटलो की, जग पालटते’, हे वाक्य अंतर्मनापर्यंत जाणे, त्यामुळे अपेक्षांचे विचार मनात आले की, हे वाक्य आठवून अपेक्षांचे प्रमाण उणावणे : सद्गुरु राजेंद्र शिंदे नम्रताताईंचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. एका आढाव्यात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले एक महत्त्वाचे सूत्र नम्रताताईंनी मला सांगितले, ‘‘आपण पालटलो की, जग पालटते.’’ त्यांचे हे वाक्य माझ्या अंतर्मनात गेले. माझ्या मनात अपेक्षेचा विचार आला की, सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे हे वाक्यही मला आठवायचे. त्यामुळे मनाला अपेक्षांची जाणीव व्हायची आणि हळूहळू अपेक्षांचे प्रमाण उणावायचे.

नम्रताताईंमुळे मला माझ्यातील ‘मनमोकळेपणाचा अभाव, प्रतिमा जपणे, इतरांचा विचार न करणे, प्रेमभावाचा अभाव, अपेक्षा करणे, भावनाशीलता, बहिर्मुखता’, असे अनेक स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव झाली आणि ‘ते न्यून करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करायचे ?’, हेही माझ्या लक्षात येऊ लागले.

२. गुणवैशिष्ट्ये 

२ अ. प्रेमभाव

नम्रताताई आश्रमातील अगदी लहानांपासून ते वयस्कर साधकांपर्यंत सर्वांचीच प्रेमाने विचारपूस करतात. कुणी साधक घरी गेले असतील, तर त्या त्यांचीही आठवणीने भ्रमणभाषवरून विचारपूस करतात. त्यांना संपर्क केल्यानंतर त्या त्यांच्या कुटुंबियांचीही विचारपूस करतात.

२ आ. नियोजनकौशल्य

नम्रताताईंमध्ये सेवेची प्रचंड तळमळ आहे. त्यांच्याकडे एखादी सेवा आली की, ‘ती सेवा ठराविक समयमर्यादेत कशी पूर्ण करू शकतो ?’, असा त्यांचा विचार असतो. त्या म्हणाल्या, ‘‘सेवा समयमर्यादा घालून केल्यास ती अपेक्षित वेळेत पूर्ण होते.’’ सेवा असो किंवा वैयक्तिक काम असो, त्या प्रत्येक कृतीला समयमर्यादा घालून ती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

२ इ. सहसाधकांना साहाय्य करण्याची तीव्र तळमळ

नम्रताताईंनी मला व्यष्टी आणि समष्टी साधना होण्याच्या दृष्टीने अनेक दृष्टीकोन देऊन ‘आपली साधनेची तळमळ कशा प्रकारे वाढवू शकतो ?’, हे सांगितले. नम्रताताईंमधील तळमळीमुळेच मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करू शकलो. त्यांनी सतत माझा पाठपुरावा घेऊन माझ्याकडून ते प्रयत्न पूर्ण करवून घेतले. ‘माझ्यात पालट व्हावा’, अशी त्यांचीच तीव्र तळमळ आहे. त्यासाठी त्यांनी अगदी तळमळीने माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले.

२ ई. ‘साधकांना सेवेतील आनंद मिळावा’, यासाठी प्रयत्न करणार्‍या सौ. नम्रता दिवेकर !

नम्रताताई ‘तळमळ, प्रेमभाव, इतरांचा विचार करणे, उत्तम नियोजनकौशल्य, नम्रपणा, प.पू. गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा, भाव इत्यादी विविध गुणांची वृद्धी करत सतत साधनारत आणि सेवारत रहातात. त्या स्वतः आनंदी असतात आणि इतरांनाही आनंद मिळावा’, यासाठी त्यांना साहाय्य करतात.

३. शिकायला मिळालेली सूत्रे

३ अ. निरपेक्ष राहून सेवा करणे

नम्रताताई मला म्हणाल्या, ‘‘प्रसंग किंवा साधक यांमध्ये न अडकता आपण निरपेक्षपणे प्रयत्न करत रहायचे. आपण करत असलेली प्रत्येक कृती देव पहात आहे. समोरचा साधक कसा वागतो, हे पहाण्यापेक्षा स्वतः सकारात्मक राहून प्रयत्न करायचे. आपणच समोरच्या साधकांना समजून घ्यायचे.’’

३ आ. इतरांना साधनेसाठी तळमळीने साहाय्य करणे

नम्रताताई मला सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी आढाव्यात सांगितलेली विविध सूत्रेही सांगतात. ‘आपण कठीण परिस्थितीतही कशा प्रकारे साधना करू शकतो ?’, याची विविध उदाहरणे आणि प्रसंग सांगून त्यांनी माझ्या मनाची स्थिती साधनेसाठी सकारात्मक केली. त्या स्वतः पूर्णवेळ साधक होतांना त्यांनी अनुभवलेले काही प्रसंग मला सांगितले. तेव्हा ‘इतर साधक कठीण प्रसंगांतही कशा प्रकारे साधना करतात ?’, हे मला शिकायला मिळाले.

४. कृतज्ञता

प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला साधनेसाठी अशा गुणी साधिकेचे वेळोवेळी अनमोल साहाय्य झाले. मला अशा अनमोल साधकांचा सहवास दिल्यासाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

५. प्रार्थना

‘प्रत्येक क्षणी तुम्हाला अपेक्षित अशी सेवा आणि साधना आपणच या क्षुद्र जिवाकडून करवून घ्यावी आणि ‘मला अखंड गुरुकृपा अनुभवता यावी’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. दीपक गोडसे, सनातन आश्रम, देवद पनवेल.

हीच तुझ्या जन्मदिनी श्रीगुरुचरणी प्रार्थना ।

जीवनाच्या मार्गावर चालतांना भगवंताची दृष्टी पडली ।
नम्रताताई सनातन संस्थारूपी
विशाल विश्‍वात प्रवेशली ॥ १ ॥

सनातनच्या प्रथम संतरत्नाच्या (टीप १) कुटुंबात
जन्म घेऊन जीवनाचे सार्थक झाले ।
सेवा आणि साधना करून
गुरुदेवांच्या चरणी संपूर्ण अस्तित्व समर्पित केले ॥ २ ॥

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेतून
उत्तम नियोजनकौशल्य अंगीकारले ।
सेवेला समयमर्यादा घालून
प्राधान्याची सेवा परिपूर्ण करते चपळतेने ॥ ३ ॥

तळमळीने करिते सेवा, गतीला तिच्या नसे तोड ।
गतीस मिळावी परिपूर्णतेची जोड ॥ ४ ॥

श्री गुरूंची प्रीती अनुभवण्या माध्यम आम्हा तुझे असे ।
समष्टीचे हे माध्यम (टीप २) तुला
श्री गुरुचरणी नेत असे ॥ ५ ॥

भाग्यवान तू लाभले सद्गुरु अन् संत यांचे मार्गदर्शन ।
लाभ तयांचा करूनी कर तू
साधनेत निश्‍चयाने मार्गक्रमण ॥ ६ ॥

परिपूर्णता, व्यापकता अन् भक्तीभाव
यांचा त्रिवेणी संगम साधावा ।
साधनेतील पुढील प्रवास तुझा श्री गुरुकृपेने शीघ्र पूर्ण व्हावा ।
हीच तुझ्या जन्मदिनी श्री गुरुचरणी प्रार्थना ॥ ७ ॥

टीप १ : सनातनच्या पहिल्या संत प.पू.(श्रीमती) विमल फडके

टीप २ : ‘सहसाधकांना साहाय्य करणे’ हा समष्टी गुण

– श्री. दीपक गोडसे, सनातन आश्रम, देवद पनवेल.