सहकार्य केल्यास परमबीर सिंह यांना ९ जूनपर्यंत अटक करणार नाही ! – राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात भूमिका

(उजवीकडे) परमबीर सिंह

मुंबई – ठाणे पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अन्वेषणामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सहकार्य केल्यास त्यांना ९ जूनपर्यंत अटक करण्यात येणार नाही, असे म्हणणे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केलेल्या छळवणुकीच्या आरोपानंतर ठाणे पोलिसांनी परमबीर सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा रहित करावा, या मागणीसाठी परमबीर सिंह यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने त्यांना अटक न करण्याविषयी अंतरिम आदेश दिला आहे. यावर राज्य सरकारने  न्यायालयाला वरीलप्रमाणे विश्‍वास दिला आहे.