ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सामाजिक संस्थांकडून स्थानिक प्रशासनाला निवेदन आणि अन्य उपक्रम

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना गेली अनेक वर्षे करत असलेल्या जागृतीचे सामाजिक स्तरावर झालेले सकारात्मक परिणाम !

हिंदु समाज धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या जागृत होत असल्याचे हे द्योतक आहे !

निसर्गमित्र समिती, कणकवलीच्या वतीने पोलिसांना निवेदन

सरत्या ख्रिस्ती वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष २०२१ च्या स्वागतासाठी खुली मैदाने आणि पवित्र मंदिरे यांचा गैरवापर केला जातो. युवा वर्ग वाहने दायित्वशून्यतेने चालवतात. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी केल्या जाणार्‍या गैरप्रकारांवर लक्ष ठेवून प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी निसर्गमित्र समिती, कणकवलीच्या वतीने येथील पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे करण्यात आली. निसर्गमित्र समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद गुरव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी समितीच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून दायित्वशून्यतेने वागणार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. (अजूनही सामाजिक आणि धार्मिक संघटनांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस-प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक)

मनसे आणि अन्य संस्था यांचे प्रशासनाला निवेदन

मनसे, तसेच अन्य काही सामाजिक संस्था यांनीही स्थानिक प्रशासनाला ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर होणारे अपप्रकार रोखण्याविषयी, तसेच गड-किल्ले यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणी असे अपप्रकार होऊ नयेत, यासाठी दक्षता घेण्याविषयी निवेदन दिले आहे.