हत्येच्या प्रकरणातील आरोपीचे तिहार कारागृह परिसरातून अपहरण

  • अपहरणात पोलिसांचा समावेश !

  • शरण येण्यासाठी गेला होता तिहार कारागृहात !

  • देशातील प्रमुख कारागृहांपैकी एक असणार्‍या राजधानी देहलीतील या कारागृहामध्ये अशा प्रकारची घटना होणे कारागृह प्रशासनाला लज्जास्पद !
  • या कारागृहात असणारे जिहादी आतंकवादी आणि मोठे गुन्हेगार यांना कुणी अशा प्रकारे पळवून नेल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • शरण येणार्‍या आरोपीचे पोलिसांनी अपहरण करणे, म्हणजे पोलिसांनाच न्याय नको असणे होय ! असे पोलीस असणार्‍या पोलीस दलाकडून जनतेला कधीतरी न्याय मिळेल का ? सरकारने यातील संबंधित पोलिसांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

नवी देहली – हत्येच्या प्रकरणी पसार असणार्‍या आणि न्याय दंडाधिकार्‍यांसमोर शरण येण्यासाठी तिहार कारागृहात गेलेल्या आरोपीचे या कारागृहाच्या परिसरातून दिवसाढवळ्या अपहरण केल्याची घटना घडली. या वेळी त्याच्या अधिवक्त्यालाही मारहाण करण्यात आली. काही पोलीस आणि अन्य २-३ जणांनी कारागृह परिसरात घुसून आरोपीला मारहाण केली आणि त्याला पळवून नेले. या प्रकरणी महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांनी पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि चौकशी अधिकारी यांना याविषयी जाब विचारला. तसेच साहाय्यक पोलीस आयुक्तांना आरोपीविषयी माहिती सादर करण्याचा आदेश दिला.

न्यायालयाने आरोपी कार्तिक उपाख्य माधव याला कारागृहातील दंडाधिकार्‍यांसमोर शरण येण्यास सांगितले होते. त्यानुसार तो त्याचे अधिवक्ता अन्वर अहमद खान यांच्यासह तेथे गेला असता ही घटना घडली.

प्रवेशद्वार क्रमांक १ वर घडलेल्या या घटनेमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचा रणवेश कुमार, गृहरक्षक दलाचा भागीरथ, पोलीस शिपाई दत्तू मोरे यांची चौकशी करण्यात येत आहे.