‘ऋषिपूजना’चा पूजनातील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम

२३ ऑगस्ट २०२० या दिवशी ‘ऋषिपूजन’ आहे. यानिमित्ताने…

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, साधकांचे सर्व त्रास दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी, यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ७.२.२०१९ या दिवशी ‘ऋषिपूजन’ करण्यात आले. ऋषिपूजनात वसिष्ठऋषि यांचे ‘गुरु’रूपात आणि विश्‍वामित्रऋषि यांचे ‘शिष्य’रूपात दीपस्थापन करून त्यांचे पूजन करण्यात आले. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हे पूजन केले. ‘ऋषिपूजनाचा दोन्ही (ऋषिस्वरूप) दीपांवर आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर काय परिणाम होतो?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

(हे लिखाण वर्ष २०१९ मधील असल्याने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा उल्लेख आधीप्रमाणेच ठेवला आहे. – संकलक)

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत दोन्ही दीप (वसिष्ठऋषि आणि विश्‍वामित्रऋषि स्वरूप दीप) अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या पूजनापूर्वी आणि पूजनानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

श्री. अभिजीत कुलकर्णी
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. विश्‍वामित्रऋषि स्वरूप दीप, वसिष्ठऋषि स्वरूप दीप आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. पूजनानंतर विश्‍वामित्रऋषि स्वरूप दीप, वसिष्ठऋषि स्वरूप दीप आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होणे

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ (ऑरा) : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. पूजनानंतर विश्‍वामित्रऋषि स्वरूप दीप, वसिष्ठऋषि स्वरूप दीप आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. ऋषिपूजनानंतर विश्‍वामित्रऋषि स्वरूप दीप आणि वसिष्ठऋषि स्वरूप दीप यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत अन् एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ होण्यामागील कारण : भृगु महर्षि यांच्या संकल्पामुळे दीपांमध्ये पूजनापूर्वीच आवश्यक तेवढे चैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे दोन्ही दीपांमध्ये आरंभीही (पूजनापूर्वीही) पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती आणि त्यांची एकूण प्रभावळ सामान्य वस्तूंच्या तुलनेत पुष्कळ अधिक होती. (सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.) सद्गुरु सौ. बिंदाताई यांनी दीपस्वरूप ऋषींचे पूजन अतिशय भावपूर्ण केले. पूजनाच्या वेळी ऋषिस्वरूप दीपांमध्ये (विश्‍वामित्रऋषि स्वरूप दीप आणि वसिष्ठऋषि स्वरूप दीप यांमध्ये) त्या त्या ऋषींचे आवाहन करण्यात आले. तेव्हा त्या त्या ऋषींचे आशीर्वादरूपी चैतन्य त्या त्या दिपांमध्ये आकृष्ट होऊन कार्यरत झाले. त्यामुळे पूजनानंतर दोन्ही दीपांच्या (विश्‍वामित्रऋषि स्वरूप दीप आणि वसिष्ठऋषि स्वरूप दीप यांच्या) सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ झाली.

३ आ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘सद्गुरु’ पदावरील संत असल्याने त्यांच्यात पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे आणि त्यांनी ऋषिपूजनातील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्यातील चैतन्यात वाढ होणे : सद्गुरु बिंदाताई ‘सद्गुरु’ पदावरील संत असल्याने त्यांच्यात पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्या उच्च आध्यात्मिक पातळीमुळे त्यांच्यामध्ये आरंभीही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. तसेच त्यांची एकूण प्रभावळही पुष्कळ अधिक होती. सद्गुरु बिंदाताई यांनी पूजनातील चैतन्य ग्रहण केल्याने पूजनानंतर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि त्यांच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ झाली.’

– श्री. अभिजीत कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.१०.२०१९)

ई-मेल : [email protected]

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक