जिहादी आतंकवादी आणि त्यांच्या हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैनिकी कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई – उरी, पठाणकोट, पुलवामा आदी ठिकाणी झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर चोख उत्तर दिल्यानंतरही अशी आक्रमणे थांबायला सिद्ध नाहीत. हे काश्मीरच्या पहलगाममधील भीषण आतंकवादी आक्रमणावर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. येथे आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून २८ हिंदूंची निर्दयीपणे हत्या केली. यात एका नवविवाहितेसमोरच तिच्या पतीला मारण्यात आले. ही घटना आतंकवाद्यांची केवळ अमानुषताच नव्हे, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदु समाजावर झालेले थेट आक्रमण आहे.

हे जिहादी आक्रमण काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग आहे. याचा केवळ निषेध न करता भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैनिकी कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. समितीकडून या आक्रमणाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलनेही करण्यात येणार आहेत.

समितीने म्हटले की, वर्ष १९९० मध्ये ९० सहस्र हिंदूंची हत्या आणि साडेचार लाख काश्मिरी हिंदूंचे बलपूर्वक विस्थापन अशाच पद्धतीने करण्यात आले होते. आता ही आक्रमणे याच षड्यंत्राचा पुढचा भाग आहेत. त्यामुळे काश्मीर खोर्‍यामध्ये व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून आतंकवाद्याचा बीमोड करावा. काश्मीरमधील उरलेले हिंदू पर्यटक, व्यावसायिक आणि हिंदू यांचे जीवित रक्षण करण्यासाठी विशेष सुरक्षा आराखडा लागू करण्यात यावा, अशा मागण्याही समितीकडून करण्यात आल्या.