निर्माती अनुष्का शर्मा यांनी क्षमा मागावी ! – धर्मप्रेमींची मागणी

  • ‘पाताल लोक’ या ‘वेबसिरीज’मधून धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण

  • धार्मिक भावना दुखावणारे प्रसंग काढून टाकण्याचीही मागणी

मुंबई – ‘पाताल लोक’ या ‘वेबसिरीज’मध्ये (ऑनलाईन मालिकेमध्ये) धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अभिनेत्री तथा या मालिकेच्या निर्मात्या अनुष्का शर्मा यांनी क्षमा मागावी आणि त्यातील प्रसंग काढून टाकावेत, अशी मागणी प्रेक्षकांनी केली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेतील काही प्रसंग धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे सांगत सामाजिक माध्यमांवर रोष व्यक्त केला आहे. (धर्माप्रती संवेदनशील राहून आवाज उठवणार्‍या जागरूक हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक)

या ‘वेबसिरीज’मध्ये ‘एक हिंदु महाराज एका हिंदु राजकारण्याला मांसाहार देत असून तो राजकारणी गाय या वाहनावर बसलेल्या देवीच्या चित्रासमोर बसून मांसाहार खात आहे’, अशा प्रकारचे दृश्य दाखवण्यात आल्याचे सांगत हिंदूंनी ‘ट्विटर’वरून त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.