मुंबईतील बेस्ट बसमधील सूचनांतील अशुद्ध मराठी शब्दांमुळे भाषाप्रेमी संतप्त !

‘सुराज्य अभियाना’च्या मागणीवर नवीन गाड्यांवर शुद्ध भाषेतील सूचना लावण्याचे बेस्ट प्रशासनाचे आश्वासन !

मुंबई : मराठीला अभिजात (उच्च) भाषेचा दर्जा मिळालेला असतांना महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील बेस्ट बसगाड्यांमधील सूचना फलकांमध्ये ‘पोलिसानां’, ‘न्यावि’, ‘प्रवाश्यांनी’ आदी अशुद्ध मराठी शब्द पाहून मराठी भाषाप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे वातानुकूलित, इलेक्ट्रिक अशा प्रकारे बेस्ट बसचा दर्जा सुधारत असतांना दुसरीकडे मराठी भाषेचा दर्जा का घसरत आहे ?

डावीकडून श्री. निखिल दाते, अधिवक्ता राहुल पाटकर, श्री. प्रसाद मानकर, अधिवक्त्या सुरभी सावंत, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड आणि (मागे उभे असलेले) सुभाष अहिर

‘महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी भाषेची होणारी दुरवस्था तात्काळ दूर करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने प्रवाशांसाठी बसगाड्यांमध्ये लावलेल्या मराठीतील सूचनांचा दर्जा सुधारावा आणि त्या शुद्ध प्रमाणित मराठीत असाव्यात’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने बेस्ट प्रशासन, मराठी भाषामंत्री आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली.

श्री. अभिषेक मुरुकुटे

यावर ‘बेस्ट’चे साहाय्यक महाव्यवस्थापक श्रीनिवास राव यांनी सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत. याविषयी लवकरच संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊ.

सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक !

सध्या बेस्टकडे ५०० नवीन गाड्या आहेत, तसेच २ सहस्र ५०० नवीन गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. या सर्व गाड्यांवर सुधारित सूचना लावण्यात येतील. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता राहुल पाटकर, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड, अधिवक्त्या सुरभी सावंत, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे संयोजक श्री. सुभाष अहिर, श्री. निखिल दाते, सुराज्य अभियानाचे श्री. प्रसाद मानकर आणि बेस्टचे जनसंपर्क प्रमुख श्री. सुदास सावंत उपस्थित होते.

सुराज्य अभियानाच्या कार्यकर्त्यांनी बेस्टच्या बसगाड्यांमधील काही सूचना अशुद्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले. बेस्ट प्रशासनाने सूचना आणि परिपत्रके काढून शुद्धता पडताळण्यासाठी ‘मुद्रितशोधक’ पद निर्माण करावे, भविष्यात सूचना आणि परिपत्रक यांचे अंतिम प्रमाणन मुद्रितशोधकांकडून करून घेण्याचा प्रस्ताव मांडला. बेस्ट प्रशासनातील कर्मचार्‍यांना शुद्ध मराठी लेखनाचे प्रशिक्षण देण्याचे सूत्रही चर्चेत आले. मराठी भाषेच्या शुद्धतेसाठी हे महत्त्वपूर्ण निर्णय लवकरात लवकर अमलात यावेत, अशी मागणी सुराज्य अभियानाच्या वतीने करण्यात आली.

संपादकीय भूमिका

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीची असणारी ही दुःस्थिती दुर्दैवी !