५ सहस्र दुबार अपील राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपिठाने फेटाळले !

पुणे – राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपिठाकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत वारंवार मोठ्या प्रमाणात दुसर्‍यांदा अपील करणार्‍यांची संख्या वाढत होती. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर बराच ताण येत होता. त्यामुळे माहिती अधिकार कायद्यांतर्गत दुबार अपील केलेले ५ सहस्र ६२ अपील राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपिठाने फेटाळून लावले. मागील ४ महिन्यांत आयोगाने सुनावणी घेत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील ५, सांगली अन् सोलापूर जिल्ह्यांतील ३, बीड, अहिल्यानगर जिल्ह्यांतील २, बुलढाणा, तसेच बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी १ माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांचे अपील फेटाळले. यामध्ये बीड जिल्ह्यातील एका माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्याने केलेले सर्वाधिक २ सहस्र २५५ अपील फेटाळण्यात आले आहेत.

राज्य माहिती आयोग पुणे खंडपिठाचे राज्य माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले की, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मिळाल्यानंतर त्या व्यक्तीसह समाजाचाही लाभ होतो; मात्र काहीजण विनाकारण मोठ्या प्रमाणावर अर्ज करून किंवा व्यावसायिक हेतूने या कायद्याचा गैरवापर करतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयांनुसार दुबार अपिलांची प्रकरणे निकाली काढण्यात आली.