अनेक देवांच्या हातात आपण त्रिशूळ बघितले असेल; पण त्याची दिव्य शक्ती द्विगुणित होते, जेव्हा ते शंकराच्या हातात असते. त्रिशूळाकडे पाहिल्यावर ३ तीक्ष्ण टोक दिसतात. तसे पाहिले, तर हे अस्त्र संहाराचे प्रतीक आहे; परंतु वास्तवात त्रिशूळामागे मोठा गूढ अर्थ दडला आहे. तुम्हाला तो अर्थ ठाऊक आहे का ? चला तर जाणून घेऊया !
त्रिशूळाची उत्पत्ती कशी झाली ?
भगवान शंकर यांना आपण भोलेनाथ म्हणतो; कारण ते पटकन् भक्तावर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात. भगवान शिवाची पूजा केली, तर समस्यांपासून मुक्ती मिळते, असे म्हणतात; पण भगवान शंकर स्वतःसोबत त्रिशूळ का ठेवतात ? त्रिशूळ हे भगवान शिवाच्या शक्तीचे प्रतीक आहे. वाईट शक्तींचा नाश करणारे शस्त्र म्हणून शिवशंकर नेहमी आपल्यासोबत त्रिशूळ ठेवतात.
समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिवाला भगवान विष्णूकडून त्रिशूळ भेट म्हणून मिळाले. त्याच वेळी काही पौराणिक कथांमध्ये असेही सांगितले जाते की, भगवान शिवाला दुर्गादेवीकडून त्रिशूळ मिळाले होते. महिषासुराविरुद्धच्या लढाईत त्यांनी त्रिशूळाचा उपयोग केला.

त्रिकालज्ञानी शंभोशंकर !
त्रिनेत्र, त्रिपुंड्र, ३ पानांचा बेल त्याचप्रमाणे त्रिशूळाची ३ टोके अशा या शंभोशंकराला ‘त्रिकालज्ञानी’, असे म्हणतात. त्रिशूळ म्हणजे केवळ ३ पाती नाहीत, तर ते एक शिवशक्तीच्या ऊर्जेचे प्रतीक आहे. शिव ऊर्जा आणि तिला गती, तसेच नियंत्रित करणारी शक्ती ही एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुरफटलेल्या आहेत की, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्रिशूळ !
त्रिशूळाविषयी विष्णुपुराण काय सांगते ?
‘विष्णुपुराणानुसार विश्वकर्मा यांनी त्रिशूळाची निर्मिती केली’, असे सांगितले जाते. याची एक पौराणिक कथा आहे. देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांची कन्या संजनाचा विवाह सूर्य देवासोबत झाला होता; मात्र सूर्यदेवाच्या असीम तेजामुळे संजनाला त्यांच्यासमवेत रहाणे शक्य होत नव्हते; म्हणून काही काळानंतर तिने आपली छाया सूर्यदेव आणि पुत्रांजवळ सोडून ती निघून गेली.
जेव्हा सूर्योदय आणि विश्वकर्मा यांना हे समजले, तेव्हा दोघांनी मिळून उपाय शोधायचे ठरवले. विश्वकर्म्याने सूर्यदेवाला घासून त्याचे तेज थोडे अल्प केले, जेणेकरून संजना विनाकष्ट त्याच्यासमवेत राहू शकेल. अशा प्रकारे सूर्यदेवाला घासून काढलेल्या तेजापासून विश्वकर्म्याने सुदर्शनचक्र, त्रिशूळ अशी दैवी शस्त्रे सिद्ध केली. त्यांनी सुदर्शनचक्र भगवान विष्णूला, तर त्रिशूळ भगवान महादेवांना भेट दिले.
त्रिशूळाची ३ टोके म्हणजे ३ शक्ती !
शिवपुराणात असे म्हटले आहे की, संपूर्ण विश्वाच्या प्रारंभी भगवान शिव ब्रह्मनादातून प्रकट झाले. त्यांच्यासोबत ३ गुणही प्रकट झाले ते म्हणजे सत्त्व, रज आणि तम गुण ! या ३ गुणांनी मिळून शिवशूल सिद्ध झाले, ज्यातून त्रिशूल निर्माण झाले. या जगात ३ प्रकारच्या प्रवृत्ती आहेत, सत्त्व, रज आणि तम ! प्रत्येक माणसात या तिन्ही प्रवृत्ती आढळून येतात. केवळ या प्रवृत्तींचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते. त्रिशूळातील ३ टोक या ३ प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करतात. त्रिशूळाची ३ टोके म्हणजे ३ शक्ती आहेत. ब्रह्मांडाचा विचार केला, तर ब्रह्मा, विष्णु, महेश असे समजावे. ३ शक्ती महागौरी, महालक्ष्मी, महासरस्वती यांना ३ नाड्या इडा, पिंगला, सुषुम्ना असेही म्हणतात; एकूणच शंकराच्या हातातील त्रिशूळ याच गोष्टी दर्शवत असतात; म्हणून भगवान शिव आपल्याला संदेश देतात की, या तिन्ही गुणांवर आपले नियंत्रण आहे. जेव्हा कठीण परिस्थिती असेल, तेव्हाच हे त्रिशूळ तेव्हाच उचलले जाते.
त्रिशूळावर का बांधलेले असते लाल वस्त्र ?
त्रिशूळावर नेहमी लाल वस्त्र बांधलेले असते. पुराणात एक कथा सांगितली जाते. एकदा मंगळ ग्रहाने भगवान शिवासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले. ‘सदैव मला तुमच्यासमवेत राहू दे’, असे वरदान मंगळ ग्रहाने मागितले. महादेवाने सांगितले की, ते कोणत्याही ग्रहाला सोबत ठेवू शकत नाहीत; पण मंगळ ग्रह ऐकायला सिद्ध नव्हता. भगवान शंकर यांनी त्याला वरदान मागायला सांगितले होते. त्यांचा नकार ऐकल्यावर मंगळाने सांगितले की, तुमचे एखादे चिन्ह जे तुमचे प्रतीक आहे, तिथे मला जोडून घ्या. शिवाने त्याला त्रिशूळासमवेत रहाण्याचे वरदान दिले. तेव्हापासून त्रिशूळावार लाल रंगाचे वस्त्र बांधले जाते, असे सांगतात.
– श्री. यशवंत नाईक, मलेशिया