सनातन धर्माची परंपरा आत्मकल्याण आणि विश्वकल्याण करण्याची शिकवण देते ! – डॉ. स्वामी परमार्थदेवजी

पतंजलि योगपिठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांचा सत्कार करतांना पू. पृथ्वीराज हजारे

रामनाथी (गोवा), १९ एप्रिल (वार्ता.) – सनातन परंपरा ही आत्मकल्याण आणि विश्वकल्याण करणारी परंपरा आहे. सनातन धर्माची परंपरा सर्वांना जीवनातील प्रत्येक क्षण आत्मकल्याण आणि विश्वकल्याण यांसाठी खर्च करण्याची शिकवण देते. या परंपरेचा बोधपूर्वक आणि शोधपूर्वक शंखनाद करत सनातनचे साधक त्यांचे तन, मन आणि धन यांचा त्याग करून श्रीगुरूंनी दाखवलेल्या या दिव्यत्वाची प्रचीती देणार्‍या वाटेवरून मार्गक्रमण करत आहेत.

सनातन असो किंवा पतंजलि, या संस्था जरी वेगळ्या दिसल्या, तरी त्यांचा आत्मा एकच आहे. त्यांचे लक्ष्य एक आहे. आपण या सनातन परंपरेचे संदेशवाहक बनणे हा आपल्या पूर्वसुकृताचा भाग आहे, असे उद्गार योगऋषि बाबा यांचे शिष्य तथा पतंजलि योगपिठाचे (हरिद्वार) मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी येथे काढले. डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी १९ एप्रिल या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी सनातनच्या साधकांना मार्गदर्शन केले.

या वेळी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांच्यासमवेत ‘भारत स्वाभिमान ट्रस्ट’चे गोवा प्रभारी श्री. कमलेश बांदेकर आणि पतंजलि योगपिठाचे गोव्यातील इतर काही पदाधिकारी उपस्थित होते. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी स्वामीजींचे स्वागत केले आणि परिचय करून दिला. सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून, तसेच सनातनचे ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. या वेळी सनातनचे प्रसारसेवक आणि इतर साधक उपस्थित होते.

राष्ट्र आणि समाज यांच्या उत्थानासाठी जीवन समर्पित करणे, यातच आपले सार्थक !

स्वामीजी म्हणाले की, आपल्या देवतांच्या हातांमध्ये शस्त्र, अस्त्र आणि शास्त्र आहे. आपल्या सर्व विरांमध्ये शौर्य, वीरता, धैर्य आणि गांभीर्य दिसून येते. आपल्याला शांतीसह क्रांती करायची आहे. ज्ञान, विज्ञान यांसह अनुसंधान साधून जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याची शिकवण सनातन देते. आपले जीवन राष्ट्र आणि समाज यांच्या उत्थानासाठी समर्पित होणे यातच आमच्या जीवनाचे सार्थक आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार राष्ट्र आणि संस्कृती यांच्या रक्षणाची सेवा केली पाहिजे. आपण हे कार्य करून कुणावर उपकार करत नाही, तर आत्मकल्याणासाठी करत आहोत, असा भाव ठेवला पाहिजे. अनिष्ट शक्ती सनातन संस्कृती नष्ट करण्यासाठी टपलेल्या आहेत. त्यासाठी मोठे षड्यंत्र रचले जात आहे. आपण आपली आत्मशक्ती वाढवून सनातन संस्कृतीचे रक्षण केले पाहिजे.

सनातनच्या आश्रमात येऊन आत्मविभोर झालो ! – डॉ. स्वामी परमार्थदेवजी

पूज्य स्वामी परमार्थदेवजी

स्वामीजी म्हणाले, ‘‘मी सनातनच्या आश्रमात येऊन आत्मविभोर झालो आहे. येथे मला सेवाभाव, अहंकाररहित जीवन यांचे दर्शन घडले. या आश्रमात मला अनेकात एकतेचे दर्शन झाले. गुरुदेवांच्या अस्तित्वाची अनुभूती घेत आपण सगळे इथे साधनारत आहात. परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य देवो, शक्ती देवो, अशी ईश्वरचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना !’  प.पू. स्वामी रामदेवबाबाजी यांचे या आश्रमात आगमन व्हावे, अशी प्रार्थना करतो.