वाहन सुरक्षेच्या दृष्टीने उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (HSRP) !

सध्या वाहनांच्या उच्च सुरक्षा क्रमांक पाटीविषयी, म्हणजेच ‘HSRP’विषयी चर्चा चालू आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना, म्हणजे दुचाकी, चारचाकी, अवजड वाहतूक करणारी वाहने अशांना या नवीन पद्धतीच्या क्रमांकाच्या पाट्या लावणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन विभागाने यासाठी ३० जून २०२५ ही मुदत दिली आहे. ही मुदत यापूर्वी ३० मार्च अशी होती; मात्र महाराष्ट्रातील थोड्याच वाहनांच्या क्रमांकाच्या पाट्या पालटून घेतल्या आहेत आणि वाहनांची संख्या अधिक असल्याने त्या दृष्टीने मुदत वाढवण्यात करण्यात आली आहे. ही पद्धत कर्नाटक, देहलीसह देशातील काही राज्यांमध्ये लागू करण्यात आलेली आहे. या पाट्यांविषयी लोकांमध्ये अद्याप शंका-कुशंका, वाहनपाटीची आवश्यकता असे काही प्रश्न आहेत, यादृष्टीने माहितीजन्य लिखाण येथे दिले आहे.

१. उच्च सुरक्षा क्रमांक पाट्यांची आवश्यकता !

उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या मुख्यत्वे करून वाहनाची सुरक्षा राखणे, चोरी अथवा वाहन अवैधरित्या विकण्यास प्रतिबंध करणे, वाहनाच्या पाट्या ‘फॅन्सी’, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारांत क्रमांक लिहून ते सहज दिसणार नाहीत असे करणे, वाहनांच्या क्रमांकाच्या पाट्या काढून त्या अन्य वाहनांना लावणे आणि त्याद्वारे परिवहन विभागाचा वाहन ओळखण्यात होणारा गोंधळ टाळणे, पाटीद्वारेच वाहनाची संपूर्ण माहिती उदा. वाहनाची निर्मिती, प्रकार, चॅसिस क्रमांक इत्यादी माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करणे, असे अनेक उद्देश या उच्च सुरक्षा क्रमांकाच्या पाट्यांचे आहेत. त्यामुळे यापुढे अशा पाट्या लावणे बंधनकारक आहे. जी नवीन वाहने, म्हणजे वर्ष २०१९ नंतर बाजारात आली आहेत आणि येत आहेत, त्यांना या क्रमांकाच्या पाट्या वाहने विकणार्‍या आस्थापनाकडूनच लावून मिळत आहेत; पण जुन्या वाहनांनाच त्या लावून घ्यायच्या आहेत.

२. वाहनांच्या पाट्यांची अन्य वैशिष्ट्ये !

या पाट्या ॲल्युमिनियमपासून सिद्ध केलेल्या असतात आणि किमान २ ‘स्नॅप लॉक’द्वारे बसवल्या जातात. ‘स्नॅप लॉक’ म्हणजे विशिष्ट स्क्रूद्वारे त्या वाहनावर बसवण्यात येतात, म्हणजे त्या वाहनापासून सहजपणे वेगळ्या करता येणार नाहीत आणि एकदा काढून पुन्हा लावता येणार नाहीत. यामुळे एका वाहनाची पाटी दुसर्‍या वाहनाला लावली, असे प्रकार टाळता येतील. या पाटीवर डाव्या बाजूला वर निळ्या रंगात अशोकचक्राचा ‘हॉट स्टॅम क्रोमिअम होलोग्राम’ असतो. त्या खाली देशाला दिलेला आंतरराष्ट्रीय क्रमांक उदा. भारतासाठी ‘IND’, असे दिलेले असते. त्या खाली १० अंकी ‘युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक’ (ओळख क्रमांक) दिलेला असतो. या वाहन पाट्यांवरील अंक आणि अक्षरे यांवर ‘हॉट स्टँप फिल्म’चा थर दिलेला असतो. ही पाटी संबंधित वाहनाशी इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या जोडलेली असते, जेथे ती वाहनावर बसवली जाते.

३. नवीन पद्धतीच्या वाहनपाटीच्या रचनेचे अनेक लाभ

श्री. यज्ञेश सावंत

अ. चोरी शोधणे : वर उल्लेख केल्याप्रमाणे याद्वारे चोरीच्या गाड्या त्वरित ओळखता येतील.

आ. पालट ओळखता येणे : क्रमांकाच्या पाट्यामध्ये कुणी कोणत्याही उद्देशाने काही पालट केला, तर ते त्वरित ओळखता येऊ शकतात.

इ. कायद्याच्या कार्यवाहीत अनियमितता ओळखण्यास साहाय्य करणे : आजकाल आपण पहातो की, कायद्यात वाहनांचा क्रमांक कसा असावा ? याचे प्रमाणिकरण केलेले आहे, तरी लोक स्वतःला रूचेल, आवडेल (?) अशी ‘कलाकारी’ त्या नोंदणी क्रमांकात करतात ते टाळले जाईल. जसे पुण्यात अनेक वाहनांचे क्रमांक अशा पद्धतीने लिहिले आहेत की, ते वाचतांना वाहन क्रमांक लक्षात येत नाही, तर त्या वाहनाच्या पाटीवरील क्रमांकाऐवजी ‘दादा’, ‘बाबा’, ‘काका’, ‘मामा’, ‘आई’, ‘राजे’, ‘वाघ’ असे लिहिलेले आपण वाचतो. या कलाकारीला आता अन्य शहरांतही मागणी येत असल्यामुळे वाहन क्रमांक ओळखणे कठीण होऊन बसले आहे. हे प्रकार आता टाळता येणार आहेत.

ई. क्रमांक पटकन ओळखता येणे : बर्‍याच वेळा वाहनाचा क्रमांक पूर्ण दिसत नाही किंवा ओळखता येत नाही. विशेष करून जेव्हा वाहन द्रूतगती महामार्गावरून गतीने पुढे जात असेल, तेव्हा सीसीटीव्ही किंवा उच्च क्षमतेच्या छायाचित्रकांमध्येही वाहनांचे क्रमांक टिपले जात नाहीत. त्यामुळे ते ओळखून संबंधित वाहनांवर काही कारवाई करायची असल्यास ती करता येत नाही; मात्र या पाट्यांमुळे ती कारवाई शक्य आहे. संपूर्ण भारतात एकसमान, एकसारखे नोंदणी क्रमांक असतील.

उ. वाहनांशी संबंधित गुन्हे न्यून होणे : चोरीची, नोंदणी रहित झालेली वाहने वापरणे या पद्धतीने टाळले जाईल.

ऊ. बनावटीपासून संरक्षण : बनावट क्रमांक वापरण्यावर यामुळे आळा बसेल.

४. नवीन पाट्या लावतांना होणारी फसवणूक टाळा !

वाहनांना या क्रमांकाच्या पाट्या लावतांना अनेक ठिकाणी अधिक पैसे घेतले जात आहेत, याच्या तक्रारी वाहनधारकांकडून आलेल्या आहेत, म्हणजे या पाट्या लावण्यासाठी राज्यामध्ये १ सहस्र ते १ सहस्र २०० रुपये घेतले जात आहेत. नवीन पाट्या मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करणारी काही बनावट संकेतस्थळे निर्माण झाली असून त्यावर सर्व माहिती देऊन पैसे भरले की, त्याची कोणतीच पावती मिळत नाही आणि नंतर ग्राहकाला स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे अधिकृत शासकीय संकेतस्थळावर जाऊनच अर्ज भरणे आवश्यक आहे.  या क्रमांकाच्या पाट्यांचे मूल्य अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक आहे, तर त्याविषयी खरेतर अभ्यास होणे आवश्यक आहे. भारताच्या व्यतिरिक्त काही देश या क्रमांकाच्या पाट्यांमध्ये ‘लॉकिंग सिस्टम’ वापरतात. जपान, कोरिया, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांत ‘लॉकिंग सिस्टम’ वापरली जाते.

भारतात या नवीन पद्धतीच्या पाट्या गाड्यांना लावणे आता बंधनकारक आहे. या पाट्यांविना गाडी चालवल्यास किमान ५ सहस्र ते १० सहस्र रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आणि वाहन जप्तही होऊ शकते. एकदा का परिवहन विभागाने दिलेली वाढीव मुदत संपली की, परिवहन विभाग कारवाई करण्यास प्रारंभ करणार आहे.

५. वाहनांना क्रमांक बसवण्यासाठी प्रक्रिया, खर्च आणि अन्य तपशील

अ. https://transport.maharashtra.gov.in हे शासकीय संकेतस्थळ आहे, ज्यावरून ऑनलाईन अर्ज करावा लागतो. प्रत्येक राज्यनिहाय वेगवेगळे संकेतस्थळ आहे.

आ. वरील संकेतस्थळावर गेल्यानंतर एच्.एस्.आर्.पी. नावाचा ‘ब्लॉक’ संकेतस्थळावर खालच्या बाजूला दिसतो. त्यावर क्लिक केल्यानंतर पुढील प्रक्रिया चालू करता येते. यामध्ये प्रथम प्रादेशिक परिवहनाच्या सर्व कार्यालयांची नावे दिसतात. वाहन ज्या शहर अथवा भागातील आहे ते कार्यालय निवडून अर्ज करावा.

इ. स्वत:जवळील वाहनाच्या आर्.सी. पुस्तकावरून ‘रजिस्ट्रेशन क्रमांक’ (नोंदणी क्रमांक), चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांकाच्या शेवटचे ५ आकडे द्यावेत आणि भ्रमणभाष क्रमांक द्यावा.

ई. ‘कॅप्चा’ (अर्ज यंत्रमानवाद्वारे नसण्याची निश्चिती करण्यासाठी असलेले छोटे कोडे अथवा संख्या) दिल्यावर तेथे वाहन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या मालकाचे नाव दिसते.

उ. यानंतर शुल्क भरण्यासाठी एक विंडो येते. त्यावर दिलेला ‘क्यू.आर्. कोड स्कॅन’ करून पैसे भरता येतात. त्यासाठीही वाहनानुसार शुल्क निर्धारित केले आहे.

ऊ. परिवहन अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार दुचाकीसाठी ४५०+१८ टक्के ‘जी.एस्.टी.’ (वस्तू आणि सेवा कर), म्हणजे ५३१ रुपये, चारचाकी आणि जड वाहनांसाठी ७४५+१८ टक्के ‘जी.एस्.टी.’ अन् तीनचाकी वाहनांसाठी ५००+१८ टक्के ‘जी.एस्.टी.’ असे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. वाहनाची पाटी घरपोच हवी असेल, तर वेगळे शुल्क भरावे लागते, तसेच दिलेल्या केंद्रावर जाऊन क्रमांक पाटी बसवायची असेल, तर शुल्क आकारले जात नाही. या शुल्काहून अधिक शुल्क घेतले जात असेल, तर त्याविषयी परिवहन विभागाकडे तक्रार करू शकतो.

ए. शुल्क भरल्यावर वाहनधारकाच्या भ्रमणभाषवर ‘ओटीपी’ (एक प्रकारचा संकेतांक) येईल. तो दिल्यानंतर घरपोच कि केंद्रावर ? जाऊन पाटी बसवण्याचा पर्याय येतो. तो निवडावा.

ऐ. यानंतर पाटी बसवण्याचा दिनांक आणि वेळ दिली जाते. त्याची पावती सिद्ध होऊन आपल्या भ्रमणभाष क्रमांकावर ही पावती पाठवली जाते.

औ. परिवहन विभागाकडून साहाय्यता केंद्रेही ठिकठिकाणी उभारली आहेत, जेणेकरून ज्यांना संगणकीय अर्ज भरण्यास अडचण आहे, त्यांना तेथे जाऊन वरील सर्व प्रक्रिया करता येते.

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१५.४.२०२५)

माजी परिवहन अधिकाऱ्याचा अनुभव

श्री. अनिल जठार

यापूर्वी ‘आर्.टी.ओ.’मध्ये (प्रादेशिक परिवहन विभागामध्ये) झालेल्या प्रकरणाविषयी मी सांगू इच्छितो. ते म्हणजे वर्ष १९९५ मध्ये एक प्रकरण रत्नागिरीमध्ये (आणि संपूर्ण महाराष्ट्रात) झाले होते. महाराष्ट्रातील काही गाड्या चोरून त्या इतर राज्यांमध्ये त्यांची नोंदणी केल्याप्रमाणे बनावट कागदपत्रे सिद्ध करून नंतर त्या पुन्हा महाराष्ट्रात विकण्यात आल्या. अशी इतरही प्रकरणे, म्हणजे एकाच क्रमांकाच्या २ पाट्या वापरणे वगैरे गुन्हे जे केले जातात, त्याच्यामध्ये असा भाग व्हायचा की, पूर्वीच्या क्रमांक पाटीवरून (‘नंबर प्लेट’वरून) ओळखता यायचे नाही की, ती पाटी खरी आहे कि बनावट ? सारख्याच क्रमांकाची एक गाडी समजा नागपूरला आणि दुसरी पुण्यामध्ये चालते, तर ते काही लक्षात यायचे नाही. त्यासाठी त्या क्रमांकाचा तपशील (रेकॉर्ड) काढून प्रत्यक्षात चेसिस, इंजिन क्रमांक त्या गाडीवर पडताळायला हवा. वाहनाची निर्मिती (मेक), मॉडेल, टाईप वगैरे वेगळे असेल, तरच लगेच कळणार; मात्र सारख्याच मेक, मॉडेल, टाईपची, म्हणजे एकाच आस्थापनाच्या २ गाड्या २ ठिकाणी वापरू शकता येऊ शकायच्या. चेसिस क्रमांक पडताळला, तरच फसवणूक कळू शकत होती. आताची ‘एच्.एस्.आर्.पी.’ पद्धत संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात येत आहे, तर त्यामध्ये त्या क्रमांक पाटीच्या समवेत ही इतर माहितीसुद्धा त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे ‘नंबर प्लेट’ स्कॅन केल्यानंतर त्यातून वाहनाची पूर्ण माहिती मिळणार आहे. जर ते वाहन त्या माहितीशी जुळणारे नसेल, तर ते वाहन बनावट आहे, हे त्वरित लक्षात येणार आहे. ‘एच्.एस्.आर्.पी. नंबर प्लेट’मुळे चोरीची वाहने, बनावट क्रमांकाची वाहने ओळखणे सोपे होणार आहे. हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा या पाट्यांचा लाभ आहे.

– श्री. अनिल जठार, माजी परिवहन अधिकारी, महाराष्ट्र.