गोवा येथील पूर्वीच्या काळचा विवाह समारंभ आणि सध्या त्याचे पालटलेले स्वरूप !

विवाह हे पवित्र बंधन आहे. सनातन हिंदु धर्मात जिवावर केलेल्या १६ संस्कारांपैकी विवाह संस्कार महत्त्वपूर्ण विधी आहे. त्याचे पावित्र्य टिकवून ठेवणे हे धर्मकार्यच ! याचा लाभ वधू-वर आणि समाज अशा दोघांनाही होतो. लेख लिहिण्याचा उद्देश एकच आहे, तो, म्हणजे विवाह संस्कार धार्मिक रितीने व्हावेत. त्यात अनाचार होऊ नये, म्हणजे वधू-वर अथवा हिंदु समाजाची हानी होऊ नये, उलट धर्मपालन करून देवतांची कृपा संपादन करून समाज सुखी आणि समृद्ध व्हावा अन् समष्टी स्तरावर सगळ्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी ! लहानपणापासून आतापर्यंत मी गोवा येथील पाहिलेले पूर्वीच्या काळचे विवाह समारंभ आणि सध्या त्याचे पालटत चाललेले स्वरूप यांविषयीचे तुलनात्मक विवेचन येथे केले आहे.

१३ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘विवाह ठरवणे आणि त्याच्याशी संबंधित सूत्रे, विवाहाशी निगडीत सिद्धता आणि मंगळसूत्र’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/902319.html

फुलांनी सजवलेल्या आच्छादनातून वधूला आणतांनाचा क्षण

३. लग्नातील जेवण 

अ. पूर्वीच्या काळी खाली भूमीवर बसून पंगतीत जेवण वाढले जाई. ते जेवण सात्त्विक असायचे. त्यात वरण-भात, सार, मूगभजी, पुरी, सुजी/खीर इत्यादी प्रकार असत. आचारी केळीच्या पानावर जेवण वाढत असे.

आ. आचारी ब्राह्मण असून त्यांना गोव्यात ‘रानपी’ असे संबोधत. त्यांना सगळे आदराने वागवायचे. आता तसे आचारी मिळणे कठीण आहे. त्यांची जागा ‘केटरर्स’ने (जेवण पुरवणार्‍यांनी) घेतली आहे. गोव्यात ‘बुफे’ (स्वतःच जेवण वाढून घेणे) पद्धतही चालू झाली आहे.

डॉ. रूपाली भाटकार

इ. विवाहाच्या दिवशी कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ न वापरता स्वयंपाक करायचा असतो; पण सध्या पाहुण्यांना चविष्ट जेवण हवे असते. त्यामुळे जेवण देणारे त्यात कांदा-लसणाचा अधिक वापर करतात. वधू-वर आणि यजमान हेसुद्धा तेच अन्न ग्रहण करतात. जेवणात ‘फ्राईड राईस’, ‘मंच्युरियन’ यांसारखे असात्त्विक पदार्थही ठेवले जातात. सरबताऐवजी शीतपेये (कोल्ड ड्रिंक) असतात.

ई. विवाह समारंभात पूर्वी केवळ नातेवाइकांसाठी जेवण असायचे. सभागृहात लग्न लागल्यावर सगळ्यांना चिमूटभर साखर आणि पाणी दिले जायचे. मग काचेच्या बशीत लाडू, केळं आणि शेव/चिवडा, त्यानंतर चहा अथवा सरबत देत. कालांतराने ‘कसाटा’ आईस्क्रीम देण्याची पद्धत रूढ झाली. त्यानंतर एखाद्या खोक्यात सात्त्विक खाऊ देण्यात येऊ लागला, म्हणजे तो घरीही नेता येत असे.

आता दुपारचा मुहूर्त निवडून सर्वांना जेवणच दिले जाते. त्यामुळे जेवणाचा खर्च वाढतो. अन्न देणारे प्रती ताट रुपये घेत असल्यामुळे कुणी जेवले नाही किंवा अन्नपदार्थ टाकून दिले, तरीही यजमानांना त्याचे पैसे द्यावेच लागतात. अशा प्रकारे जेवणाचा अपव्यय होतो.

४. लग्नातील पाहुण्यांचे वर्तन

अ. पाहुण्यांना मंचावर जाऊन वधू-वरासह छायाचित्रे काढायची असतात. खरे म्हणजे दांपत्याला आशीर्वाद देण्यासाठी विवाहप्रसंगी उपस्थित रहायचे असते; पण सध्या वधू-वराच्या मस्तकावर अक्षतासुद्धा घातल्या जात नाहीत. मंगलाष्टके चालू असतांना दुरूनच अक्षता फेकल्या जातात. त्यामुळे त्या वधू-वराच्या मस्तकावर न पडता अन्यांच्याच डोक्यात पडतात.

आ. व्यासपिठावर विवाहविधीच्या ठिकाणी अनेक जण चपला घालून जातात. तेथील पावित्र्य टिकवले जात नाही.

५. गोव्यातील हिंदु विवाह समारंभात आढळलेल्या त्रुटी ! 

वधू-वर यांना पुष्पहार घालण्यासाठी उचलतांनाचा क्षण

अ. वधू-वर घरी जाण्यास निघतांना वराची पादत्राणे लपवून ती परत करण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेण्याची प्रथा याआधी गोमंतकात नव्हती; पण आता ही प्रथा (जिला काही आध्यात्मिक पाया नाही) प्रचलित झाली आहे. ती कदाचित हिंदी चित्रपटसृष्टीतून आलेली असावी. (‘हम आपके है कौन’ या चित्रपटात हा प्रकार दाखवला होता.)

आ. मुहूर्ताच्या वेळी लग्न लागल्यावर वधू-वर यांना त्याचे नातेवाईक अथवा मित्रमंडळी वर उचलतात. एकमेकांच्या गळ्यात पुष्पहारही घालायला देत नाहीत. विवाह विधींच्या प्रसंगी अशी मस्करी करणे अपेक्षित नाही. ही प्रथा याआधी गोव्यातील ख्रिस्ती समाजात दिसून यायची. आता हिंदूंच्या विवाहातसुद्धा ही प्रथा पहायला मिळते.

इ. पूर्वी वधूचा हात धरून तिचा मामा तिला विवाह मंडपात आणत असे; पण सध्या नवीनच पद्धत चालू झाली आहे. लाकडी पलंगाला फुलांच्या माळांनी सजवले जाते. ४ पुरुष वधूच्या डोक्यावर तो पलंग धरून तिला लग्नस्थळी आणतात. ‘हिंदु धर्मात ही प्रथा अभद्र आहे’, असे मला वाटते; कारण मृत माणसाला चारपाई किंवा शिडी यांच्यावर ठेवले जाते आणि त्याला ४ पुरुष खांदा देतात. एकाने चुकीचे कर्म केले आणि फॅशन (रूढी) म्हणून अन्य जणांनी तिचे अंधानुकरण केले !

ई. सध्या तारांकित हॉटेलमध्ये विवाह समारंभ साजरे केले जातात. होमातून धूर आल्यावर ‘फायर अलार्म’ (आगीची चेतावणी) वाजेल; म्हणून सप्तपदी शास्त्रोक्त पद्धतीने केली जात नाही. नावापुरते छोट्याशा अग्निहोत्र कुंडात कापूर घालून होम केला जातो.

उ.  वधू-वरांसाठी महागड्या गाड्या भाड्याने घेऊन त्या सजवण्यात येतात. त्यासाठीही भरपूर पैसा लागतो. जेवढी महागडी गाडी, तेवढे पैसे अधिक ! पाश्चात्त्य पद्धतीच्या गाड्यांसाठी लाखभर रुपयेसुद्धा व्यय केले जातात. आधी वधू-वरासाठी झेंडूच्या फुलांनी चारचाकी सजवली जायची. आता असात्त्विक पद्धतीची फुले गाडीवर चिकटवली जातात किंवा थर्माकोल यांपासून कलाकृती करून ती गाडीवर लावली जाते. (यामुळे लग्नासाठी सध्या ४०-५० लाख रुपयेही व्यय करावे लागतात.)

ऊ. ‘हळद लावल्यानंतर वधू-वराने घरातून बाहेर पडू नये’, असे म्हणतात; पण सध्या उलटच होते. दुसर्‍या दिवशी लग्न असतांनाही दोघे हळदीच्या अंगानेच बाहेर फिरायला जातात. हे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य आहे; कारण अविवाहित अतृप्त आत्मे भावी वधू-वराला पछाडू शकतात; म्हणूनच शास्त्रात असे करणे वर्ज्य आहे.

ए. पूर्वीच्या काळी विवाह समारंभ २ किंवा ३ दिवसांचा असायचा. पहिल्या दिवशी देवकार्य आणि केळवण (वधू आणि वर यांच्या घरात), दुसर्‍या दिवशी हळद समारंभ असे. यात वराकडील लोक वधूच्या घरी तिला हळद लावायला जायचे आणि वधूकडील लोक वराच्या घरी यायचे (आता तोच समारंभ विवाहाच्या सभागृहात केला जातो) अन् तिसर्‍या दिवशी विवाह पार पडत असे. सध्या ५ दिवस विवाह समारंभ साजरा केला जातो. यात पुष्कळ पैसे व्यय होतात.

ऐ. ‘इव्हेंट मॅनेजमेंट’मुळे (कार्यक्रमाच्या व्यवस्थापनामुळे) जेवणाचा व्यय, छायाचित्र, िव्हडिओ यांत पैशांचा पुष्कळ अपव्यय होतो. सगळेजण एकाच प्रकारची वेशभूषा परिधान करतात. त्यासाठी पैसा व्यय केला जातो.

ओ. मेंदी समारंभात भरमसाठ पैसे व्यय करून मेंदी काढणार्‍यांना बोलावले जाते. या वेळी काही ठिकाणी नाच-गाण्याचा कार्यक्रम असतो. मेंदीचे प्रकार सात्त्विक असले, तर उत्तम; पण असात्त्विक आणि अरेबिक पद्धतीची मेंदी काढणे अशा विचित्र प्रथा सध्या चालू आहेत.

६. गोमंतकातील विवाह संस्कारातील चांगल्या प्रथा ! 

अ. वधू हिरव्या बांगड्यांचा चुडा हातात घालते. हिरवा रंग, म्हणजे समृद्धीचे लक्षण आहे.

आ. वधू सोन्याचे दागिने घालते. त्यातून सकारात्मक दैवी स्पंदने तिच्यात आकर्षित होतात.

इ. हुंडा मागितला जात नाही. काही वेळा वधूच्या आई-वडिलांनी काही दिले, तर ते स्वीकारले जाते.

ई. पुरोहित ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लावतात आणि सगळे विधी पूर्ण करतात.

अशा प्रकारे पैशांचा अपव्यय न करता विवाह साजरा केला पाहिजे. केवळ दिखाव्यासाठी नव्हे ! खरे म्हणजे येथे ‘मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे’, हे दाखवण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू असते; म्हणून तत्त्वनिष्ठता नसते. सर्वच स्तरांवर पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केले जाते. आध्यात्मिकदृष्ट्या योग्य पद्धत विचारून घेतल्यास विवाह संस्कार चांगल्या प्रकारे पार पडतील. पैशांचा अपव्यय न करता विवाह समारंभ साजरा करण्याविषयी हिंदु समाजाने चिंतन करावे. वधू-वराच्या भावी आयुष्यासाठी पैसे संग्रही ठेवू शकतात, तसेच ते धर्मकार्यासाठीही अर्पण करू शकतात. मंदिरात अन्नदान करणे, मंदिरे बांधायला साहाय्य करणे, धर्मप्रचार करणे, हिंदु मुलांना पौरोहित्य शिकवणे, हिंदु वृद्धाश्रमाला देणगी देणे इत्यादी कार्यासाठीही पैशांचा वापर करता येईल. इतरांकडे पाहून कृती करण्यापेक्षा जे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या योग्य आहे, त्याप्रमाणे विवाह करावा. त्यातूनच कल्याण साधले जाईल.

विवाह संस्कारांविषयीची अधिक माहिती सनातननिर्मित ‘सोळा संस्कार आणि व्रते’ या ग्रंथात अवश्य वाचा. जे हिंदू धर्मपालन करून विवाह विधी करतात, त्यांचे अभिनंदन ! असेच हिंदू हे हिंदु राष्ट्रासाठी पूरक आहेत. आपण धर्मपालन केले, तरच आदर्श हिंदु राष्ट्र येईल.                                              (समाप्त)

– आधुनिक वैद्या डॉ. रूपाली भाटकार, फोंडा, गोवा.

(१८.३.२०२५)