इतरांना साहाय्य करणार्‍या आणि तळमळीने सेवा करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधा घनश्याम गावडे (वय ५१ वर्षे) !

‘भाद्रपद शुक्ल चतुर्थी (७.९.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) सनातनच्या आश्रमातील सौ. राधा घनश्याम गावडे यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. राधा गावडे

सौ. राधा गावडे यांना ५१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. ‘सौ. राधाताई नेहमी आनंदी असते.

२. ती नेहमी शिकण्याच्या स्थितीत असते.

३. ती जे मिळेल, त्यात समाधानी असते.

श्रीमती संध्या बधाले

४. प्रेमभाव

ती नेहमी इतरांचे कौतुक करते. एखादा साधक रुग्णाईत असल्यास ‘त्याला कोणता खाऊ आवडतो’, ते राधाताईला ठाऊक असते. राधाताई संबंधित साधकाला त्याला आवडणारा खाऊ नेऊन देते.

५. इतरांना साहाय्य करणे

साधकांना राधाताईचा आधार वाटतो. तिच्याकडे कुणी साहाय्य मागितल्यास ती लगेच साहाय्य करते.

६. तिच्या बोलण्यात कधीच मायेचे विचार नसतात.

७. सेवेचे दायित्व लीलया सांभाळणे

७ अ. तिच्यामध्ये एकाच वेळी अनेक सेवा करण्याचे कौशल्य आहे.

७ आ. सेवा चांगली होण्यासाठी इतरांना विचारण्याची वृत्ती : कोरोना कालावधीत आश्रमात बाहेरून खाऊ येत नव्हता. तेव्हा पू. वैद्य विनय भावे यांनी (३५ वे संत, आताचे पू. (कै.) विनय भावे) राधाताईला अनेक पदार्थ मोठ्या प्रमाणात करायला शिकवले. ती भडंग, चिवडा, तसेच अन्य पदार्थ उत्तम प्रकारे बनवते. ‘पदार्थ चांगले व्हावेत’, यासाठी ती अनेक साधकांना त्यांची चव पहाण्यास देते आणि त्यात कुणी काही पालट सांगितला, तर ती लगेच पालट करते.

७ इ. भावपूर्ण सेवा करणे : राधाताईकडे महत्त्वाच्या सेवांचे दायित्व आहे. मी तिला विचारले, ‘‘तू एवढ्या मोठ्या सेवा कशी करतेस ?’’ तेव्हा ती नेहमी म्हणते, ‘‘काकू, मी काहीच करत नाही. प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्याकडून करून घेतात.’’

८. स्वत:त पालट करण्याची तळमळ

राधाताईला सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या वेळी बसायला सांगितले. तेव्हा तिला पुष्कळ आनंद झाला. ती मला म्हणाली, ‘‘सुप्रियाताई घेत असलेला व्यष्टी साधनेचा आढावा, म्हणजे ज्ञानगंगा आहे. त्यातून मी जेवढे घेईन, तेवढे अल्पच आहे.’’ राधाताईने ३ मास मनापासून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवली. त्यामुळे तिच्यामध्ये पुष्कळ पालट झाला. पूर्वी तिला कुणी चूक सांगितली, तर तिच्या मनाचा संघर्ष होत असे; मात्र आता ती स्वतःहून चूक विचारते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तुमच्या कृपेमुळेच मला राधाताईचे गुण लक्षात आले आणि तुम्हीच ते लिहून घेतले. ‘राधाताईकडून मला सतत शिकता येऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’

– श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२४)